२५ नोव्हेंबर हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शाब्दिक सन्मान करून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न. यशवंतराव चव्हाण हे राजकारणी असले, तरी ते सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी होते. त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राचे चित्र पाहिले होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांची कार्यपद्धती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असे वाटते. असे कोणतेच क्षेत्र नव्हते की, त्या क्षेत्रातील दिग्गजांबरोबर यशवंतरावांचा वावर नव्हता. त्यामुळे त्यांच्या समृद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन नव्या पिढीने करणे काळाची गरज आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच केंद्रातील संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळत काही काळ त्यांनी उपपंतप्रधानपदही सांभाळले होते. वित्त आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पण, वरच्या पदावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. क्षमता असूनही काँग्रेसच्या महाराष्ट्राला डावलण्याच्या भूमिकेमुळे त्यांना पंतप्रधानपदावर जाता आले नाही, ही महाराष्ट्राला असलेली कायमची खंत असेल. ही खंत त्यांनी बोलून दाखवली नाही. पण, ती महाराष्ट्राला वाटते हेच त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म तत्कालीन सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात; परंतु त्यांच्यामागे लावलेली ही बिरुदावली दिवंगत व्यक्तींच्या मागे लावतात तशी कृत्रिम नाही, तर अगदी मनापासून अशी आहे. ज्या मोठेपणाने आपण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून पु. ल. देशपांडेंचे नाव घेतो, तसेच निर्मळपणे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतरावांचे नाव घेतले जाते. ते त्यांचे विरोधकही मान्य करतात. याचे कारण यशवंतराव चव्हाण हे प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. राजकारणात पडले नसते, तर कदाचित यशवंतराव चव्हाण हे महान साहित्यिक झाले असते. त्यांची भाषणे, लिखाण वाचून त्यातील सहजसुंदर भाषाशैलीवरून ते अगदी साहित्य क्षेत्रात गेले असते, तर ज्ञानपीठापर्यंत पोहोचले असते इतकी त्यांची प्रतिभा होती. पुस्तकांवर त्यांनी प्रचंड प्रेम केले. त्यांच्या खजिन्यातील पुस्तके ही आजही कराडच्या वाचनालयात आणि संग्रहालयात पाहायला मिळतात. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा अत्यंत अनमोल अशी आहे. प्रत्येकाने ती वाचली पाहिजे अशीच आहेत. यशवंतराव चव्हाण काय होते, हे समजण्यासाठी आणि महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे कळण्यासाठी ही पुस्तके प्रत्येकाने वाचली पाहिजेत.महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. पण, १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी जेव्हा यशवंतराव चव्हाण गेले, तेव्हा त्यांच्या या कार्याचा उल्लेख ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ असा केला जातो.महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्नयशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडित आहेत. नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्राचा विकास सहकाराच्या माध्यमातूनच होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी सहकारी चळवळीला उत्तेजन दिले. ही चळवळ ग्रामीण भागातून उभी करण्याचे काम त्यांनी केले. हे करत असताना राज्यातील महत्त्वाच्या उद्योजकांनाही त्यांनी चांगले प्रोत्साहन दिले. खासगी क्षेत्रातूनही उद्योग चालले पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिले. कारण, उद्योग वाढला तर रोजगार वाढणार आहे, हे यशवंतरावांचे धोरण होते. महाराष्ट्राचा विकास हा शेतीचा विकास, रोजगार आणि उद्योग वाढीवर आहे, हे ओळखून त्यांनी काम केले.कृषीविषयक यशवंतरावांची भूमिकायशवंतराव चव्हाण यांनी कृषीविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहिनांचा प्रश्न आणि कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. याकडे जर आजच्या सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले, तर आमच्या शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागणार नाहीत. यशवंतरावांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहिनांची संख्या अधिक आहे म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणा-या लोकांनी त्यांच्या जमिनीच्या एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी, ही भूमिका त्यांनी धाडसाने मांडली होती. यावर आपल्याला टीकेला, कोणाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याचा विचार त्यांनी केला नाही. याचे कारण, यशवंतराव चव्हाण हे मूठभरांपेक्षा सामान्यांचा विचार करणारे होते. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. यावर यशवंतरावांचा भर होता. त्यामुळे शेतक-यांना समाधान होते. आज शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या, त्यांना करावी लागणारी आंदोलने, त्यांचे विधान भवनावर येणारे मोर्चे पाहिले, तर वाटते की, या राज्यकर्त्यांनी एकदा यशवंतरावांच्या विचारांचा अभ्यास करावा. शेतकरी जगला पाहिजे, तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे हे सांगण्याची आता वेळ आली आहे.समतोल विकासाचे पुरस्कर्ते नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणा-या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतक-यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत यशवंतरावांनी मांडले होते. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना त्यांनी मांडली. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. हे सगळे आपल्या सरकारच्या बळावर शक्य आहे. फक्त सरकारची इच्छाशक्ती आवश्यक आहे. आज मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या कल्पना सरकार करते आहे. पण, जुने प्रकल्प आज मोडकळीस येत आहेत. त्यांना कसले संरक्षण नाही, त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. औद्योगिक रोजगार संपुष्टात येत आहे, अशा परिस्थितीत नव्या योजना आणण्यापेक्षा जुन्यांकडे नीट लक्ष दिले, तर आपोआपच अच्छे दिन येतील. यशवंतरावांनी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. सहा दशके ग्रामीण भागात काँग्रेस रुजण्याचे कारण यशवंतराव चव्हाणांचे धोरण हे आहे. कारण, या विकासाच्या धोरणामुळे एक काळ असा होता की, ग्रामीण भागात काँग्रेसशिवाय कोणता पक्ष आहे हे तिथल्या जनतेला माहीत नव्हते. तशी आवश्यकताच भासली नाही.पंचायत राजपंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात ही यशवंतराव चव्हाणांची संपूर्ण देशाला असलेली फार मोठी देणगी आहे. सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घालून विकेंद्रीकरणाची योजना या योजनेतून यशवंतरावांनी निर्माण केली. आज त्याच पायावर सामान्यांना विविध सभागृहांची दारे खुली झाली आहेत. लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळत आहे. या योजनेतून त्यानी प्रशासकीय विकास करण्याचे धोरण अवलंबले होते. हे समजणे आवश्यक आहे.आर्थिक विकासराज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ करून यशवंतराव चव्हाण यांनी आर्थिक विकासाचे नियोजन केले होते. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या देशाला झाला पाहिजे, कृषी आणि सामान्य घटकाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, हे यशवंतरावांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने त्यांनी आर्थिक विकासावर भर दिला होता. यातूनच त्यांनी कोल्हापूर प्रकारच्या बंधा-यांचा प्रचार केला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या कोयना धरणाच्या निर्मितीसाठी यशवंतरावांचे नियोजन महत्त्वाचे होते. कोयना आणि उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती त्यांनी दिली. त्यातून मूलभूत सोयी-सुविधांचा विकास साधण्यावर भर दिला.सहकाराला चालनायशवंतरावांनी आपल्या काळात एकूण १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले. हे साखर कारखाने म्हणजे विकासाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. कारण, एका सहकारी साखर कारखान्याच्या जोरावर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची फार मोठी ताकद निर्माण झाली होती. फार मोठी आर्थिक गणिते तिथे होती. साखर कारखान्यामुळे सहकारी बँका, सहकारी कुक्कुटपालन केंद्रे, बझार यातून शेतीचे मार्केटिंग आणि रोजगाराची निर्मिती झाली होती. आज ते संपुष्टात आणले जात आहेत, याचे वाईट वाटते.शैक्षणिक धोरणमराठवाडा (आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना हे फार मोठे काम यशवंतरावांच्या काळातील आहे. त्याशिवाय कृषी विकासासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग त्यांचा होता. केवळ इथेच न थांबता त्यांनी मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना केली. आज मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्यासाठी झगडावे लागते आहे. पण, त्याची पार्श्वभूमी कित्येक वर्षापूर्वी यशवंतरावांनी केली होती. कारण, त्यांना साहित्याबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना. धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा