सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८
काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वचननामा ऊर्फ जाहीरनामा जाहीर केला आहे. त्यात सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात सत्ता आल्यास सरकारी इमारत आणि परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा या वचननाम्यातून करण्यात आली आहे. या एकूणच जाहीरनाम्याकडे पाहिल्यावर लक्षात येते की, बदलाचे वातावरण असतानाही ते कॅश करण्याची धमक काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे जाहीरनाम्यातच काँग्रेस फसली असे आजचे चित्र आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावरून काँग्रेस पुरती भरकटलेली दिसते. आपल्या विचारांपासून दूर गेलेली दिसते किंवा स्पष्टच बोलायचे, तर सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी आता केल्याचे दिसून येते आहे. वाटेल त्या तडजोडी करताना आपल्या विचारापासून दूर जाण्याचा विचार काँग्रेस करते आहे.त्यामुळे सत्तेपासून आपण फार काळ दूर राहू शकत नाही. हा राजकीय वनवास संपुष्टात आणण्यासाठी आम्ही विरोधकांच्या मुद्दय़ांनाही जवळ करू शकतो हे स्पष्टपणे काँग्रेसने दाखवून दिले आहे. त्याचा परिणाम आता काँग्रेसमधील विचारवंतांची पिढी नष्ट झाली याचीच ही कबुली म्हणावी लागेल. हा जाहीरनामा नाही, तर काँग्रेसचा विचार संपुष्टात आला याचा हा कबुलीनामा आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातच काँग्रेसची हार स्पष्टपणे दिसून येते. प्रत्येक राज्यात काँग्रेसचा विचार वेगळा हा फार मोठा विनोद समोर येताना दिसतो आहे. म्हणजे छत्तीसगडमध्ये जाहीरनाम्यात स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा काँग्रेसने उचलला आहे. परप्रांतीयांना रोखण्याची भाषा राहुल गांधी करतात. मग महाराष्ट्राचे काय? महाराष्ट्राने परप्रांतीयांविरोधात आवाज उठवला, मुंबईत त्याविरोधात आवाज उठवला, तर काँग्रेस परप्रांतीयांची बाजू घेते. संजय निरुपमसारखे नेते मुंबईवर हक्क सांगू लागतात. मुंबईतील स्थानिकांचा रोजगार खेचू पाहतात. अशावेळी महाराष्ट्र काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मध्य प्रदेशातील निवडणुकीसाठी जो जाहीरनामा काँग्रेसने दिला आहे त्यात प्रभू राम, नर्मदा, गोवंश आणि गोमूत्राचा उल्लेख करून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे.म्हणजे आता भारतीय जनता पक्षाची वाट धरण्याशिवाय, भाजपच्या मार्गावरून जाण्याशिवाय पर्याय नाही असेच काँग्रेसला वाटू लागले असावे असेच दिसते. गोरक्षकांच्या भाजपच्या भूमिकेला यापूर्वी हिंदुत्ववादी संकुचित ठरवण्याचे काम काँग्रेसने केले होते. गोहत्या बंदीबाबतही काँग्रेस हा जनसंघाचा, भाजपचा राजकीय डाव असल्याचे बोलत आली आहे. आता मात्र गोरक्षणासाठी गोशाळा काढण्याची मजल काँग्रेसने मारलेली आहे. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा म्हणायचा की, काँग्रेस आता विदेशीकडून स्वदेशीकडे वाटचाल करताना दिसते आहे असे म्हणायचे? राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील जाहीरनामा घोषित करताना म्हटले आहे की, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी इमारती आणि परिसरात संघाला शाखा उभारण्यास मनाई केली जाईल. तसेच सरकारी कर्मचा-यांना संघाच्या शाखेत भाग घेण्याची परवानगी देणारा सरकारी अध्यादेश रद्द करण्यात येईल, असे आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आले आहे.संघ देशवासीयांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. काँग्रेसने या वचननाम्यातून राहुल गांधी यांच्या या आरोपांना एकप्रकारे बळकटी दिल्याचे दिसून येते. पण संघाची राहुल गांधींना एवढी भीती का वाटते आहे? सरकारी इमारतीच्या जवळ संघाच्या शाखा कुठे असतात? संघाच्या शाखा या मोकळय़ा मैदानावर घेतल्या जातात. सरकारी कार्यालयाशेजारी दुकाने असतात. संघाची शाखा म्हणजे काही छोटे दुकान किंवा टपरी नसते हे राहुल गांधींना सांगायची वेळ आलेली आहे. संघावर बंदी घालणारे राहुल गांधी कोण? संघावर बंदी घालण्याचा आततायीपणा इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात केला होता. त्यावेळी काँग्रेसची दीर्घकाळची सत्ता खेचण्याचे काम याच संघाने केले होते. काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्याचे काम संघावरची बंदी आाणि आणीबाणीचा काळ ठरला आहे, हे ज्ञान बहुधा राहुल गांधींना नसावे. संघावर कोणत्या कारणाने बंदी घालणार आहेत, याचे स्पष्टीकरण तरी ते देऊ शकतात का? दिग्विजयसिंगांसारख्या भंपक माणसांच्या कोंडाळय़ात राहून ते बोलतील ते बोबडे बोल बोलण्याचे काम राहुल गांधींनी थांबवले पाहिजेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा