१९७० च्या दशकात देवानंदचा ‘हरे राम हरे कृष्ण’ हा चित्रपट आला होता. त्यात ‘हरे राम हरे कृष्ण’ म्हणत दम मारणा-या म्हणजे नशा करणा-यांना ‘राम का नाम बदनाम ना करो’ असे गाणे गाऊन देवानंद आवाहन करतो. ते गाणे आजही राम मंदिर प्रश्नावरून पुन्हा लागू पडते आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि अन्य काही संघटना ज्याप्रकारे सध्या रामाच्या नामाचा आणि मंदिराचा जप करत आहेत, त्यावरून राम मंदिर होण्यापेक्षा त्याचे राजकारण करणे हेच त्यांचे ध्येय दिसून येते. हे ना रामभक्त आहेत, ना त्यांना त्याबाबत आस्था आहे, फक्त हिंदू व्होट बँकेवर वर्चस्व मिळवण्याची ही धडपड दिसून येते. एखाद्या सहकारी बँकेची सत्ता मिळवण्यासाठी अनेक पॅनेल प्रयत्न करतात, तसा प्रकार या पक्षांकडून होताना दिसतो आहे.शिवसेनेने शिवनेरीची माती घेऊन राम जन्मभूमीत आपली ताकद दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. भारतीय जनता पक्षाने राम जन्मभूमी आणि मंदिरासाठी रथयात्रा काढल्या, देशभर वातावरण ढवळून काढले आणि आता त्याबाबत चुप्पी साधली आहे, तर काँग्रेसने आजवर या मुद्यावर ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेत आपली मुस्लीम व्होट बँक सुरक्षित ठेवत हिंदू मते कशी मिळवता येतील याचा प्रयत्न केला. पण आज प्रत्येकजण या राम मंदिराचा प्रश्न हिंदू व्होट बँक म्हणून हाताळू पाहत आहे. मंदिर झाले काय किंवा नाही झाले काय याच्याशी कोणाला काही पडलेले नाही. उलट मंदिर होण्यापेक्षा ते न होण्यासाठीच या सर्वाचे प्रयत्न असतील. कारण एकदा का अयोध्येत मंदिर झाले की मग राहिले काय? निवडणुकीचा भावनिक मुद्दा संपुष्टात येईल. तो संपुष्टात येऊ नये यासाठीच हा राजकीय उपद्व्याप असेल असे वाटते. म्हणूनच आता पुन्हा म्हणावेसे वाटते की, ‘राम का नाम बदनाम ना करो।’अयोध्येतील बाबरी मशीद पाडली एवढेच बहुसंख्य जनतेला माहिती आहे. पण त्याचा नेमका इतिहास कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, की त्याचा घटनाक्रमही समजून घेतलेला नाही. हा मुद्दा देशातील ८० टक्के लोकांना ६ डिसेंबर १९९२ नंतर आला असे वाटते. पण त्यापूर्वीही शंभर वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे त्या घटनाक्रमावरून थोडक्यात नजर मारली, तर लक्षात येईल की नेमकी कोणाची चूक आहे. नेमका स्वार्थ कोणी साधला ते. रामाच्या नावाचा गैरवापर कोणी केला ते.इतिहासातील माहितीनुसार १५२८ मध्ये अयोध्येतील राम जन्मभूमीवर बाबरी मशीद उभारण्यात आली. त्यानंतर तब्बल सव्वातीनशे वर्षे याबाबत कोणालाही त्यावर बोलणे शक्य झाले नाही. याचे कारण देशभर मोगल राजवटी होत्या; परंतु इंग्रजांची राजवट सुरू झाली आणि येथील भारतीयांना आपल्या हक्काची जाणीव झाली. १८५३ ला रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद यावरून त्या जमिनीचा वाद हिंदू- मुसलमान यांच्यात सुरू झाला. या जमिनीचा वाद सहा वर्षे सुरू राहिला. त्यावर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिशांनी १८५९ ला या जमिनीचे दोन हिस्से केले. त्याप्रमाणे पूजा आणि नमाजसाठी इंग्रजांनी या जमिनीचा आतला भाग मुसलमानांना दिला, तर बाहेरचा भाग हिंदूंना दिला. वादग्रस्त जमिनीत नमाज पढायची नाही म्हणून तिथे कोणीच नमाज पढत नव्हते. तो वाद तात्पुरता सुटला होता व निकाली काढला होता. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात यावरून दंगे झाले नाहीत. ब्रिटिशांनी आपल्यापरिने वाटणी करून तो विषय संपवला होता.भारत-पाक स्वतंत्र झाल्यानंतर हाच आता हिंदुस्थान आहे अशी समजूत झाली. त्यामुळे अयोध्या ही भारतात असल्यामुळे राम मंदिरावर किंवा या जागेवर आपलाच अधिकार आहे असे अनेकांना वाटू लागले; परंतु सर्वच मुसलमान पाकिस्तानात गेलेले नव्हते; परंतु १९४९ ला काही हिंदूंनी आतल्या भागात रामाची मूर्ती नेऊन ठेवली. त्यामुळे तणाव वाढेल असे वातावरण काँग्रेसने तयार केले. हिंदू-मुस्लिम दंगे यामुळे होऊ नयेत म्हणून आम्ही या राम मंदिराला टाळे ठोकतो, असे सांगून राम बंदीवान झाले. वास्तविक पंडित नेहरू हे शांतपणे मुसलमानांना समजावून सांगू शकले असते कदाचित. मुस्लीम तिथे नमाज पढत नव्हते किंवा त्या जागेचा वापर करत नव्हते. पण घटनेचे राज्य आल्यानंतर आपली व्होट बँक पक्की असली पाहिजे या दूरदृष्टीने मुस्लिमांचे काँग्रेसप्रेम वाढावे हा हेतू ठेवून त्यांनी रामाला बंदीवान केले. भारत-पाक फाळणीची पार्श्वभूमी, त्यानंतरचे युद्ध आणि हिंसाचार या पार्श्वभूमीवर भारतातील मुसलमानांच्या भावना दुखावल्या असाव्यात. ते सरकारपासून किंवा काँग्रेसपासून दूर जातील या शंकेने काँग्रेसने मुसलमानांना विशेष महत्त्व देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हिंदू-मुसलमान ही दरी वाढत गेली. त्याची शिक्षा रामाला झाली आणि रामाचे नाव तिथे बदनाम झाले. स्वातंत्र्यापूर्वी सुटलेला वाद ९० वर्षानी पुन्हा पेटला. तेव्हापासून १९८६ पर्यंत म्हणजे तब्बल ३७ वर्षे राम हे बंदीवानात होते. कैकयीच्या हट्टाने मुलाला सिंहासन मिळण्यासाठी रामाला १४ वर्षे वनवासात जावे लागले, पण काँग्रेसच्या हट्टाने ३७ वर्षे बंदीवान व्हावे लागले.विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी १९८० पासून या मुद्यावर लक्ष केंद्रित केले. म्हणजे जनता पक्षाची १८ महिन्यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आता सत्तेचा मार्ग महागाई, गरिबी हटाव असल्या गोष्टीतून जाणार नाही याची जाणीव झाली आणि त्यांनी अयोध्येतील राम बंदीवानातून मुक्त करण्याची चळवळ सुरू केली. संघ परिवाराने त्यासाठी गुप्त बैठका, नियोजन सुरू केले. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्या भावनिक लाटेवर राजीव गांधी सरकार पाशवी बहुमताने सत्तेवर आले. पण ही लाट कायम राहणार नाही हे राजीव गांधींना माहिती होते. त्यांनी संघ परिवाराच्या आग्रहाने राम मुक्त झाले, तर ते त्याचा फायदा घेणार हे ओळखले आणि १९८६ साली आपल्या कारकिर्दीत रामाला बंदीवानातून मुक्त केले.त्यामुळे आता राममुक्त केल्याचे श्रेय काँग्रेसला मिळेल, त्याचा फायदा ते उठवतील याची भीती संघ परिवारात, भाजप गोटात वाटू लागली. त्यामुळे लगेचच त्यांनी ‘मंदिर वही बनाएंगे’ अशी घोषणा दिली. त्यासाठी बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधायची योजना आखली. या घोषणेचा भाजपला १९८९ च्या निवडणुकीत अपेक्षित फायदा झाला. संसदेत अवघी २ सदस्य संख्या असलेल्या भाजपला ८५ पर्यंत मजल मारता आली. केवळ दुसरीच निवडणूक होती भारतीय जनता पक्षाची ती. राजीव गांधी सरकार उलथवले आणि जनता पक्षाचे व्ही. पी. सिंग सरकार भाजपच्या पाठिंब्यावर आले. अर्थातच हे सरकार फार काळ टिकणार नव्हते. कारण, अयोध्येचा मुद्दा घेऊन स्पष्ट बहुमत मिळवायचे उद्दिष्ट भाजपचे होते. त्या हेतूने लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा सुरू झाली. ती रथयात्रा व्ही. पी. सिंग सरकारने अडवली आणि भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सरकार कोसळले. पण, काँग्रेसने जनता दलाचा तुकडा पाडून चंद्रशेखर यांना पंतप्रधान केले आणि पाठिंबा दिला. हे सरकारही काही दिवसच चालणार होते. पण, लगेच निवडणुका लागल्या तर सगळी हिंदू मते भाजपकडे झुकतील म्हणून काँग्रेसच्या सोयीसाठी लोकसभा बरखास्त होऊ न देता काँग्रेसच्या इच्छेने सरकार स्थापन केले. आपल्या योग्य परिस्थिती झाल्यावर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि निवडणुका लागल्या.या निवडणुकीत पूर्णपणे भाजपची लाट होती. त्यावेळी पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका या दोन टप्प्यात घेतल्या गेल्या होत्या. त्या अगोदर बहुतेक निवडणुका या एकाच टप्प्यात घेतल्या गेल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आणि दुस-या टप्प्याच्या अखेरच्या प्रचारसभेदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. उर्वरित निवडणुका १ महिना पुढे ढकलल्या गेल्या. त्या उर्वरित टप्प्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. भाजपचा तोंडचा घास तेव्हा सहानुभूतीच्या लाटेने काढून घेतला. कारण, पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या. पण, नंतरच्या टप्प्यात काँग्रेसची सरशी झाली. भाजप ८५ वरून ११७ पर्यंत पोहोचले. पण, बहुमतापर्यंत पोहोचण्याची संधी नव्हती. अशा परिस्थितीत राम मंदिर मुद्दा पेटत ठेवणे हेच भाजपच्या हातात होते. आता या राम मंदिर राम मुद्यामुळे फक्त काँग्रेस किंवा भाजपला फायदा होत होता. बाकीचे पक्ष चर्चेतून लांब जात होते. अशावेळी अनेकांना हिंदुत्व आठवायला लागले. मराठी माणसाकडून शिवसेना हिंदुत्ववादाकडे झुकली. कारण, आता हाच मुद्दा आपल्याला उपयोगी पडणार हे भाजप, काँग्रेस शिवसेना सगळय़ांनी ओळखले होते. नरसिंहराव सरकारला वर्ष सव्वावर्षही पूर्ण झालेले नसेल, तेव्हाच भाजपने वातावरण ढवळून काढले. करसेवा म्हणून फलक देशभर लागले. ६ डिसेंबरला करसेवेला करसेवक येणार, असे दाखवून लाखो करसेवक करसेवेसाठी दाखल झाले. अवघ्या काही मिनिटात त्यांनी बाबरीचा ढाचा जमीनदोस्त केला. प्रत्येकाच्या मनात राम मंदिर झाले पाहिजे, या भावनेने जोर पकडला होता. त्यानंतर मात्र देशभर दंगली झाल्या. लिब्रहान आयोग आला. प्रकरण न्यायालयाकडे गेले. पण, भाजपला जे करायचे होते ते केले.नंतरच्या निवडणुकांत १९९६, १९९८ आणि १९९९ भाजप रामाच्या नावावर चढत्या क्रमाने संख्याबळ वाढवत सत्तेवर आले; परंतु प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून त्यांनी वाजपेयी सरकार चालवले. २००४ ला हा मुद्दाच लांब पडला आणि भाजपची सत्ता गेली. काँग्रेसची सत्ता दोन वेळा आली. तोपर्यंत भाजपची विश्वासार्हता कमी होत गेली; परंतु गोध्रा हत्याकांड आणि दंगलीमुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मात्र, कडवे हिंदुत्ववादी नेते अशी झाली. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने मोदींचे प्रमोशन सुरू केले. १० वर्षात मोदींची प्रतिमा उंचावत नेली आणि काँग्रेस भ्रष्टाचाराच्या गर्तेत रूतत गेली. मोदी आले की, नक्की मंदिर बनणार असे वाटून एक लाट तयार झाली. त्यामुळे २०१० ला जरी जमिनीचे वाटप न्यायालयाने केले असले, तरी मंदिराबाबत भूमिका स्पष्ट नव्हती. हा मुद्दा भाजपने निवडणुकीत केला. मोदी लाट राम मंदिरासाठी आली. पण, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. साहजिकच त्यांच्यावर अंकुश असणा-या संघाने दसरा मेळाव्याला राम मंदिरासाठी कायदा करावा, अशी मागणी केली. त्याचवेळी शिवसेनेकडे कसलेही मुद्दे नव्हते, विश्वासार्हता लयाला गेलेली असल्यामुळे त्यांनी राम मंदिराची घोषणा केली. त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेसनेही राम आम्हीच मुक्त केले म्हणून रामाशी जवळीक सुरू केली.राम मंदिर व्हावे, असे यापैकी एकालाही वाटत नाही. पण, सत्तेसाठी रामाला बदनाम करण्याचा प्रकार हे पक्ष आणि संघटना करत आहेत. अनेक मुद्दे आहेत पण, हा भावनिक आहे. तो आपल्याला कॅश करता आला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. शेवटी सामान्य माणसाला मात्र वाटते की,माझा राम, तुझा राम।माझ्या देशाचे दैवत।जय श्रीराम श्रीराम।कुणी म्हणाले, श्रीराम।कुणी म्हणाले, हे राम।अरे रामा रामा रामा।बोले मनातील राम।मनातील राम माझा।माझ्या मनात बोलला।बोल मनीची आकांक्षा।करील रे रामरक्षा।रक्षा राम माझा येता।काय कांक्षावे कळेना।प्रश्न अनंत असता।यक्ष प्रश्न आठवेना।आठवता यक्ष प्रश्न।मन म्हणाले हे राम।लाखो असती देशात।बेकार रे नाकाम।देवा द्यावे त्यांना काम।मुखी घेतील रे नाम।जय श्रीराम जय श्रीराम।मनातील राम माझ्या।माझ्या मनात बोलला।ज्याचे अंगी नाही राम।ज्याचे मुखी नाही राम।सदा करील आराम।देवा करी बदनाम।पैसा मिळवी हराम।त्याला माझा राम राम।त्याला माझा राम राम॥