कोणत्याही संकटानंतर लगेच सावरायचे असते हे शिकवते ती मुंबई. आघातानंतर ढासळायचे नाही, तर उभे राहायचे हे शिकवते ती मुंबई. म्हणूनच सतत संकटे येऊनही मुंबई धावतेच. कधी संकट २६ जुलैचे नैसर्गिक असो वा २६/११ चे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचे असो. मुंबई धावतच असते. रडत बसत नाही, लढत राहते, आपला संघर्ष चालूच ठेवते म्हणूनच या मुंबईला आज सलाम. हो, २६/११ ला आज दहा वर्ष झाली, त्यातून सावरली आणि नवी आव्हाने स्वीकारायला तयार झाली त्या मुंबईला सलाम. कधी कुणी याच मुंबईला बॉम्बे म्हणायचे, तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी. असंख्य नावाने ही ओळखली जाते. गेल्या तीन-चारशे वर्षात मुंबईने अनेक बदल पचवले आहेत. पण बदल कितीही झाले असले आणि काहीही पचवले असले तरी मुंबईचा स्वभाव, वृत्ती मात्र तशाच आहेत. मुंबईची हीच वृत्ती तिच्या लेकरांमध्येही सामावलेली दिसून येते. त्यालाच कदाचित अनेकजण म्हणतात की, मुंबई स्पिरीट. होय, त्याच मुंबई स्पिरीटला हा सलाम. वर्षे सरलीत. कॅलेंडरची पाने एकामागोमाग उलटत गेलीय, पण इतक्या वर्षाच्या मुंबईच्या आयुष्यांत २६ नोव्हेंबरचा दिवस मात्र विसरू म्हणता विसरता येत नाही. जणू भूतकाळ ठप्प होऊन स्तब्ध झालाय. धाड.. धाड गोळ्यांचे आवाज.. बॉम्बस्फोट आणि काळजाचा थरकाप उडवणा-या किंकाळ्या. सगळे कसे आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसते आहे. तो दिवस, ती रात्र.. सगळे जणू अंगावर येते आहे. चहूकडे जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटलेले जीव. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुंबईची लेकरे. ग्रेनेड, बॉम्ब नि गोळीबाराचे आवाज. जळालेल्या मानवी मांसाचा दर्प. मृत्यूचे तांडव चालले होते नुसते. अभिमानाने मिरवावे अशा मुंबईच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणांवरच त्या नापाक मंडळींनी घाला घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज आणि ओबेरॉय इतकेच काय ज्यू धर्मीयांचं नरिमन हाऊस. या इमारतींत घुसून या दुष्टांनी धाडधाड गोळीबार करत निष्पाप, निरपराध आणि निरागस जीवांना निर्दयपणे ठार केले. नृशंस हत्याकांडाचीही परिसीमा म्हणावी असेच हे चालले होते. जोडीला ग्रेनेडने हल्ले सुरूच होते. मुंबईतील नामांकित अशा ताजला तर विद्रुप करण्याचा जणू चंगच बांधला होता. माणसांना तर मारलेच, पण नंतर या वास्तूला आग लाव, हातबॉम्ब फोडण्याचा प्रकार घडला. तब्ब्ल ६० तास मृत्यूचे हे तांडव सुरू होते आणि हतबल होऊन सगळे काही पाहत राहण्याशिवाय मुंबईकर काहीही करू शकत नव्हते. कोणीही संपून जाईल अशा परिस्थितीतून मुंबई सावरली, म्हणूनच या मुंबईला सलाम. हे मुंबई तुला सलाम. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंज्या शस्त्रांसह धावून आलेले आपले ते पोलीस आणि रक्षक वीरही अतिशय महान आहेत. कारण या मुंबईतील समुद्राप्रमाणेच त्यांची मनेही अथांग आणि मोठी होती. म्हणूनच जीवाची पर्वा न करता या हल्ल्याला परतवण्यासाठी हे लोक जमिनीवर आले. निधडय़ा छातीने दहशतवादाचा तो राक्षसी डाव उधळून लावण्यासाठी निघालेल्या त्या हेमत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे नि त्यांना साथ देणारी त्यांच्या दलातली मंडळीही या मुंबईच्या सागरात होती. नापाक इरादे जगापुढे उघड करणारा पुरावा आपल्या पोलादी हातांनी पकडून ठेवताना रक्त सांडलेले तुकाराम ओंबळेही अतिशय महान होते. ताजची प्रतिष्ठा राखून तिथे लपलेल्या त्या भेकड दहशतवाद्यांवर तुटून पडलेला संदीप उन्नीकृष्णन नि कॅप्टन गजेंद्रसिंगही मुंबईसाठी लढले. या सगळ्यांच्या पराक्रमामुळेच मुंबई वाचली. भर दरबारात द्रौपदीची अब्रू काढण्याचा प्रसंगच जणू होता. पण या वीरांनी आपले प्राण लावून मुंबईची अब्रू वाचवली. आज पुन्हा ताठ मानेने मुंबई दिमाखात आहे, त्या मुंबईला सलाम, त्या लढवय्या मुंबई रक्षणकर्त्यांना सलाम. या साठ तासांत मुंबईने आतली १७३ लेकरे गमावली. कित्येक जायबंदी झाली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कित्येक अनाथ झाले. नि कित्येक अपंग. कितीकांची कितीक दु:ख. या जगात मुंबईचे महत्त्वच इतके वाढले होते की, मुंबईची ही प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी हा कट रचला गेला नि त्यात या निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांना मारले, पण मुंबईला सावरायला किती वेळ लागेल असा जगाला प्रश्न पडला होता. पण हा प्रश्न मुंबईला कधीच पडत नाही. याचे कारण उभं कसं राहायचे हे मुंबईला कळते. ढासळणे मुंबईला माहितीच नाही. कोणतेही शहर किंवा व्यक्ती खचून गेली असती पण मुंबईकरांच्या स्पिरीटमुळेच मुंबई सावरली, त्या मुंबईकरांच्या स्पिरीटला आणि मुंबईला सलाम. मुंबईला धीर दिला, मुंबईच्याच लेकरांनी. मुंबईकरांनी. मुंबईसाठी हा घाव मोठा होता, पण नवीन नव्हता. १९९३ मध्येही कुण्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. त्या आधी दंगलही झाली. त्यानंतरही पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट होतच राहिले. २००५ च्या २६ जुलैलाच महापूरही आला. संकटे मुंबईला नवीन नाहीत नि त्यांच्या मालिकाही. पण त्या प्रत्येकातून मुंबई उभी राहिली. चालत राहिली. धावत राहिली. मात्र, २६/११चा हल्ला मुंबईच्या अगदी वर्मी लागला होता. पण तरीही दुस-या दिवशी याच मुंबईने डोळे उघडून त्याच छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे पाहिले. नेहमीप्रमाणे लोकल आली होती, लोक येत होते. लोकल येतच गेल्या नि लोकही येत गेले. मुंबईचे चैतन्य परत आले. दहशतवाद्यांना वाटले एका हल्ल्यात मुंबई संपून जाईल. मुंबईचे वैराण वाळवंट होईल. पण तसे काहीच झाले नाही. तो हल्ला उरात ठेवूनही माणसे येतच राहिली. काम करतच राहिली. माणसांचा समुद्र पुन्हा एकदा काठोकाठ भरला. मुंबईचे स्पिरीट इथल्या लोकांमध्ये शिगोशिग भरलेले होते. एका हल्ल्याने ते विरून जाणार नाही, याची मुंबईला खात्री होती, म्हणूनच या मुंबईला सलाम. मुंबई ही मुंबई आहे. कधीच न थांबणारी. कुणी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबतील, संपतील पण मुंबईच आहे तशीच राहील. कारण कोसळणे, ढासळणे, रडणे, कुढणे हे मुंबईला माहिती नाही. मुंबईतील स्पिरीट हे वर जाणारे आहे, पुढे जाणारे आहे या स्पिरीटला, मुंबईला सलाम.