मुंबईकरांवर गेल्या दोन दिवसांपासून जे पाणीकपातीचे संकट ओढवले आहे, त्याला राज्यातील दुष्काळी परिस्थिती जबाबदार नसून मुंबई महापालिकेचे प्रशासन आणि महापालिकेचे कारभारी, शिवसेनेचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, हे दिसून येते आहे. अधिकारी आणि सत्ताधा-यांचे साटेलोटे आणि पाण्यातील भ्रष्टाचार हेच यामागचे कारण आहे. त्याचा फटका मात्र मुंबईकरांना बसत आहे, हेच यातून स्पष्ट होताना दिसते आहे. आज मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी प्रत्यक्षात ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात करणे क्रमप्राप्त असल्याचा दावा महापालिका करीत असली तरी ही पाणीकपात कमी पुरवठय़ामुळे किंवा धरणातील साठा कमी झाल्यामुळे नाही. पाण्याचा अनागोंदी वापर आणि पाण्याची होणारी चोरी याकडे महापालिका गंभीरपणे पाहताना दिसत नाही हेच यातील सत्य आहे.आज पाणीचोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते हे समोर आले आहे. या गळती आणि चोरीला नेमके कोण जबाबदार आहे? ही जबाबदारी महापालिका झटकणार आहे का? शिवसेनेच्या निष्क्रिय नेतृत्वाने याकडे लक्ष दिले नाही हेच यातून स्पष्ट होते आहे. ही पाणीचोरी करणारे कोण आहेत? पाणी गळतीचे नेमके कारण काय आहे? याची उत्तरे महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेकडून मिळणे गरजेचे आहे. कारण, पाणी गळती आणि चोरीला निव्वळ सत्ताधारी शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. आपले पाप आणि निष्क्रियता लपवण्यासाठी शिवसेना आता काय करणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. कारण, मुंबईतील सा-याच समस्यांना राज्य सरकार जबाबदार आहे, असा घोषा शिवसेनेकडून सतत होत असतो. सत्तेत राहून सरकारवर सातत्याने तोंडसुख घेऊन आपण कर्तबगार असल्याचे दाखवण्याचा राणा भीमसेनी आव शिवसेना आणते. पण, प्रत्यक्षात शिवसेनेकडून स्वत:च्या निष्क्रियतेबद्दल अवाक्षर काढले जात नाही. प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. यातील २५ टक्के होत असलेली पाणीचोरी नेमकी कोणामुळे आहे, याची चौकशी कोणामार्फत केली पाहिजे याचे उत्तर आता शिवसेनेनेच दिले पाहिजे.मुंबईत चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते देण्यात शिवसेनेची सततची सत्ता असलेली महापालिका अपयशी ठरली आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांच्या पापाचे खापर शिवसेना राज्य सरकार आणि एमएमआरडीएवर फोडते. प्रत्यक्षात मेट्रो किंवा एमएमआरडीएची कामे नसलेल्या भागातील रस्त्यांची त्याहून अधिक वाट लागलेली आहे. पण, आपल्या निष्क्रियतेचे खापर फोडण्यासाठी सेनेला सरकार सापडते आहे. पण, मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना पाणीकपातीच्या संकटाला का तोंड द्यावे लागत आहे, याबाबत शिवसेना आज मूग गिळून गप्प आहे. अवाढव्य वाढलेल्या झोपडपट्टय़ा आणि ठिकठिकाणी फुटलेले पाईप यामुळे उडणारी मोठी कारंजी पाहणे, हे मुंबईकरांना नित्याचे झाले आहे. ते वाया जाणारे पाणी अडवण्याबाबत, फुटलेले पाईप दुरुस्त करण्याबाबत महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. झोपडपट्टीतून असलेले मतांचे गठ्ठे वाचवण्यासाठी या पाणीचोरीला शिवसेनेचेच नेते, कार्यकर्ते प्रोत्साहन देताना दिसतात. आज मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईकरांना दररोज पाणीपुरवठा केला जातो. मुंबईतील पाणी माफिया व रोजची पाणी गळती यामुळे दररोज सुमारे ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. सत्ताधारी शिवसेनेने मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्याचे गाजर दाखवले.मात्र, पालिकेचा जल विभाग व सत्ताधारी शिवसेना पाण्याचे नियोजन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पाणी गळती व चोरी रोखण्यासाठी जल विभागाकडून सतत पाठपुरावा केला जात असल्याचा दावा महापालिका करते. पण, हा दावा खोटा आहे. विभाग स्तरावर पाणी माफियांवर कारवाई करत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जातो, असे महापालिका म्हणत असेल, तर प्रत्यक्षात कितीजणांवर आणि काय कारवाई केली हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोसह विविध प्राधिकरणाची कामे सुरू असल्याने, जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडतात आणि पाणी वाया जाते, असे सांगून महापालिकेने आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मुंबईतील पाणी माफिया आणि गळती रोखली, तर मुंबईत पाणीकपात करण्याची आवश्यकताच भासणार नाही. मुंबईतल्या पाणी माफियांवर कारवाई केली आणि पाणी गळतीवर नियंत्रण ठेवले, तर ही वेळच येणार नाही. तसेच महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेच्या अपयशामुळेच मुंबईचा कारभार अनागोंदी चालल्याचे दिसते. प्रत्येकजण जनतेसाठी नाही, तर स्वत:साठी काम करताना दिसतो आहे. ठेकेदारी करण्यासाठी आणि आपले टँकरचे पाणी खपवण्यासाठी अनेकजण धंदा करताना दिसत आहेत.मुंबईतील अनेक उपनगरात आणि पाडय़ांमध्ये टँकर आणले जातात. या टँकर माफियांचे भले करण्यासाठी आणि पाणी चोरांचे भले पाहण्यात शिवसेना गुंतलेली दिसते. मुंबई महापालिकेत टँकर माफिया, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे लागेबांधे असल्याचेही अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. मुंबईतील शिवसेनेच्या काळात होत असलेल्या पाणी चोरी आणि टंचाईविरोधात आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा पाणी चोरी व गळतीविरोधात तीव्र आंदोलन केले होते. मुंबईत जवळपास ४ हजार खासगी टँकर्स आहेत. टँकर माफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. मात्र, त्याचाही काही उपयोग झालेला नाही. पालिका प्रशासन, स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरू आहे. त्या टँकर लॉबीला जगवण्यासाठी पाणीकपातीचे खोटे संकट दाखवले जात आहे. या फार मोठय़ा भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका मात्र, मुंबईकरांना बसत आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आता त्यात पाणी पिण्याचेही त्यांचे हात वेगळे आहेत. पाणी माफिया आणि टँकर लॉबीच्या जोरावर शिवसेनेची उडी आहे, त्यामुळे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे.