शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-यापासून राम मंदिराचा विषय हाती घेतला. पण त्यांचा या मागचा हेतू शुद्ध नसल्याने त्यांना संत- महंतांनी नाकारले असून शिवसेनेला बसलेली ही चांगलीच चपराक आहे, असे दिसून आले आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला नेण्याचा, पक्ष मोठा करण्याचा आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्याच्या या हेतूने शिवसेना नेत्यांनी राम मंदिराचा प्रश्न हाती घेतला होता. राम मंदिर बांधणे हे काही शिवसेनेच्या आवाक्यातील नाही. तरीही बेडक्या फुगवून त्यांनी आव आणला होता आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या मोहिमेवर ही स्वारी जाणार होती. पण त्यांच्यातील कुवत, हेतू याबाबत सर्वानाच साशंकता असल्याने अयोध्यावासीयांनी त्यांना नाकारले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याआधीच शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. साधू-संतांची सर्वात मोठी संस्था, अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे आमंत्रण केवळ धुडकावलेच नाही, तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. आखाडय़ाशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही, तर २५ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत, असे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेला पहिल्याच प्रयत्नात फार मोठे अपयश येणार हे स्पष्ट झाले आहे. अयोध्येत हिंदीतून भाषण करण्यासाठी सध्या हिंदी भाषेचा क्लास लावून हिंदी बोलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता. पण त्यांचे आता पुरते अवसान गळून पडण्याची वेळ आली आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले आहे की, या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार करण्यासाठी आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत, असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. जर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांचा मंदिर बनवणे हाच हेतू असेल, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन का? असा प्रश्नही महंत नरेंद्र गिरी यांनी विचारला आहे.त्यामुळे शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांमुळे मंदिर बांधण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही, असे महंद नरेंद्र गिरी म्हणाले आणि शिवसेनेच्या दौ-यातील हवाच काढून घेतली. महंत नरेंद्र गिरी यांच्या माहितीनुसार, शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेऊन आखाडा परिषद ४ आणि ५ डिसेंबर रोजी अयोध्येत वेगळी बैठक घेणार आहे. या बैठकीत अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांसह अनेक मुस्लीम धर्मगुरूंना आमंत्रण देण्यात आले आहे. जर राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले, तर परस्पर सहमतीने काहीतरी तोडगा नक्कीच निघेल. ही भूमिका इतकी स्पष्ट असल्याने शिवसेनेच्या खोटय़ा प्रयत्नांची महंतांना गरज वाटेनाशी झाली आहे. कोणत्याही आंदोलनासाठी हेतू शुद्ध असावा लागतो. पण शिवसेनेचा राम मंदिराबाबत हेतू शुद्ध नाही. केवळ निवडणुका आल्यावर शिवसेनेला राम आठवला आहे. भावनिक लाट निर्माण करायची आणि मतदारांना फसवायचे ही शिवसेनेची नीती झालेली आहे. महापालिका निवडणुका आल्या की महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही म्हणायचे. कोण तोडायला चालले आहे? पण उगाचच पोरकटपणाने इशारा द्यायचा. महाराष्ट्रापासून मुंबई कोणी तोडली असेल, तर ती शिवसेनेनेच तोडली आहे.मुंबईतला मराठी माणूस ठाणे, रायगड उपनगरात ढकलून परप्रांतीयांच्या घशात मुंबई घालवली ती शिवसेनेच्या काळातच. आज मराठी माणसाला इथे घर घेणे शक्य नाही. त्यामुळे फक्त भावनिक खोटे आवाहन करायचे हाच सेनेचा हेतू असतो. हा हेतू राम मंदिराबाबत साध्य होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आजच का शिवसेनेला राम मंदिर आठवले. चार र्वष सत्तेत, अगदी केंद्रात आणि राज्यात सहभागी असताना चार वर्षात एकदाही याबाबत अवाक्षर सेनेने काढले नाही. चार वर्षात उद्धव ठाकरेंना राम आठवला नाही आणि अचानक कसा काय आठवला? हा खोटेपणा संत- महंतापासून लपून राहिला नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे चक्क पाठ फिरवून त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आज शिवसेनेला नेमके काय केले पाहिजे हे समजत नाही. महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला हा पक्ष अजून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. मुंबई ठाण्यापलीकडे कोणी जवळ करत नाही. महाराष्ट्रातले विषय घ्यायचे सोडून चालले आहेत अयोध्येला. हा प्रकार म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास न होताच पदवीच्या परीक्षेची पुस्तके खरेदी करण्याचा प्रकार आहे. मुंबईतील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा पाच वर्षात काही निर्णय घेतला नाही. चालले आहेत राम मंदिर बांधायला. बेळगाव सीमाप्रश्न रखडला आहे. तिथल्या मराठी माणसांचे हाल होत आहेत. त्याबाबत आता विस्मरण झाले आहे. तो प्रश्न वा-यावर सोडून दिला अन् चालले आहेत राम मंदिर बांधायला. मुंबई महापालिकेची सत्ता नीट सांभाळता येत नाही.मुंबईतील रस्ते, पाणी, खड्डे या समस्या सोडवायला येत नाहीत अन् चाललेत राम मंदिर बांधायला. रस्त्यावर किती खड्डे आहेत हे माहिती नाही अन् अयोध्येत चाललेत राम मंदिर बांधायला. असला कारभार संत-महंत कसे सहन करतील. आधी आपलं घर सुधारा, मग जग सुधारायला बाहेर जा. राजकीय हेतूने प्रेरित होऊन राम मंदिर बांधायला येऊ नका. राम मंदिर बांधायला अनेकजण आहेत तयार. त्यासाठी शिवसेनेची गरज नाही. पण अगोदर न्यायालयाचा निकाल, तर येऊ देत. न्यायालयाचा निकाल आलेला नाही अन् चाललेत राम मंदिर बांधायला. हा प्रकार म्हणजे लग्न ठरले नाही, मुलगी पाहिलेली नाही अन् कार्यालय बुक करायला निघाले आहेत, तसा आहे. राम मंदिर बांधणे म्हणजे परदेशातून पेन्ग्वीन आणण्याइतके सोपे आहे का? तो आणलेला पेन्ग्वीनही जगवता आला नाही अन् चाललेत राम मंदिर बांधायला. कोणत्याही कार्यात हेतू शुद्ध असेल, तर ते कार्य अडथळय़ांशिवाय पूर्ण होते. निवडणुका आल्यावर राजकीय हेतूने राम मंदिराची केलेली घोषणा संतमंडळी खपवून घेणार नाहीत हे सांगून शिवसेनेला चांगलीच चपराक दिली आहे.