मंगळवार, १९ जानेवारी, २०१६
लातों के भूत
लातों के भूत बातोंसे नही मानते अशी एक म्हण आहे. संक्रांतीला तीळगूळ देवून, गोड बोला असे सांगून भारत पाक प्रश्न सुटेल असे समजणे अत्यंत बाळबोधपणाचे ठरले. कारण काही प्रश्न असे असतात की, त्या त्या वेळीच ते न सोडवल्यास गुंतागुंतीचे आणि किचकट बनतात. नंतर ते सोडवणे कमालीचे त्रासदायक ठरतात. तसा या देशापुढचा प्रश्न म्हणजे भारत पाक संघर्ष.
देशापुढचा १९४७ पासून अनुत्तरीत असलेला प्रश्न म्हणजे पाकीस्तान. हा आपला शत्रू देश असला तरी शेजारीही आहे. त्यामुळेच ते अवघड जागचे दुखणे झाले आहे. पाकिस्तानने निर्मितीपासूनच समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. १९७१ साली पाकिस्तानने अशीच एक प्रचंड समस्या भारतापुढे निर्माण केली. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या समस्येचा निपटारा केला. शिवाय पाकिस्तानला कामयची अद्दलही घडवली होती.
डिसेंबर १९७० साली, पाकिस्तानमध्ये तेथील संसदेच्या ३३० जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालाने केवळ पाकिस्तानमधीलच नव्हे तर जगभरातील राजकीय धुरीणांना आश्चर्यचकित करून टाकले. या निवडणुकीत झुल्फीकार अली भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी मोठया बहुमताने जिंकून येईल आणि भुट्टोंच्या ताब्यात पाकिस्तानची सत्ता जाईल, अशी सर्वानाच खात्री होती. पण शेख मुझिबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पार्टीने बहुमत मिळवून सगळ्या जगाला धक्का दिला होता. तेव्हापासून भारतीय राजकारणानेही एक प्रकारचा धसका घेतला होता. या
निवडणुकीत बहुमत मिळताच शेख मुझिबूर रेहमान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर दावा केला. पण कोणत्याही परिस्थितीत मुझिबर रेहमान पाकिस्तानच्या प्रमुखपदी येणार नाहीत, यासाठी अन्य सर्वच पक्षांच्या नेत्यांनी लष्कराला हाताशी धरून पाकिस्तानात अशांतता माजवून बांगलादेशी नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली.
बांगलादेशी नागरिकांनी मोठे आंदोलन उभारले. शेख मुझिबूर यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपद देणार नसाल तर पाकिस्तानचे विभाजन करून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र बांगलादेश म्हणून मान्यता द्या, ही मागणी मुझिबूर रेहमान यांनी लावून धरली. अशी मागणी होताच पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशींचा अनन्वित छळ सुरू केला. या छळाला कंटाळून मोठया प्रमाणावर बांगलादेशी नागरिक भारताच्या आश्रयाला यायला सुरुवात झाली. दुखणं पाकीस्तानचे पण घेतले भारताने असा तो प्रकार तेव्हापासून सुरू झाला. जवळपास एक कोटी बांगलादेशींनी भारतात निर्वासित म्हणून शिरकाव केला. इतक्या प्रचंड संख्येने आलेल्या बांगलादेशींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवणे भारताला शक्य नव्हते. त्यामुळे या नागरिकांचा प्रश्न पाकिस्तानने आपल्या स्तरावर सोडवावा, या लोकांना पाकिस्तानमध्येच सामावून घ्यावे, अशी मागणी करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रश्नाची तड लावण्यासाठी तत्कालीन पाकिस्तानी राज्यकर्ते आणि राजनैतिक अधिकारी यांच्याशी सामोपचाराने चर्चा सुरू केली. पण पाकिस्तानने इंदिरा गांधी यांना अजिबात दाद दिली नाही.
सरळ मार्गाने पाकिस्तानकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर थेट कारवाई करूनच हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. लष्कराचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी आणि अत्यंत विश्वासू मंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन इंदिराजींनी विचारविनिमय केला आणि पाकिस्तान पूर्णपणे गाफील असताना लष्करी कारवाई करून या प्रश्नाची तड लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाकिस्तानचे लष्कर बांगलादेशी नागरिकांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनाचा बंदोबस्त करण्यात गुंतले असतानाच थेट पाकिस्तानमध्ये लष्कर घुसवण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या मदतीला भारतीय लष्कर आले आहे, हे लक्षात आल्यानंतर बांगलादेशींनीही आपले आंदोलन अधिकाधिक तीव्र केले. आतून आणि बाहेरून इतके मोठे आणि सशस्त्र आव्हान मिळाल्यानंतर धारातीर्थ पडण्याखेरीज किंवा शस्त्रे खाली ठेवून भारतीय लष्करासमोर शरण जाणे एवढे दोनच मार्ग पाकिस्तानी लष्करापुढे होते. अखेर या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानच्या लष्कराकडून होणार्या छळाला कंटाळून भारतात आश्रयासाठी घुसलेले बांगलादेशी नागरिक तसेच कायम भारतात वास्तव्यास राहिले असते तर त्यामुळे भारतासमोर गंभीर आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या असत्या. पण त्या रागातून पाकीस्तानने भारतात आणि विशेषत: काश्मीरमध्ये पाकिस्तानचे अधूनमधून हल्ले सुरू असतात. पठाणकोट येथील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे आम्ही या प्रकरणी चौकशी करून, दोषी असतील त्यांना शिक्षा करू, अशी आश्वासने दिली आहेत. या पूर्वीही अनेक प्रकरणात अशी आश्वासनेच फक्त देण्यात आली होती; पण कुठल्याही पाकिस्तानी दहशतवाद्याला कधीही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतीच पठाणकोट येथे जाऊन हवाई तळाची पाहणी केली. त्या तळावरूनच त्यांनी ‘पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा दिला असता तर पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे डोळे उघडले असते. या घटनेबाबत त्यांनी इंदिरा गांधींचा आदर्श ठेवायला हवाच होता. कारण लातोंके भूत बातोंसे नही मानते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा