गेल्या आठवड्यात किंवा नेमके सांगायचे तर प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीच्या दिवशी या भारत देशाला एक नवी तृप्ती देसाई नावाची अतृत्प रणरागिणी मिळाली. शनि शिंगणापुर नावाच्या एका गावातल्या देवस्थानामध्ये शनीची पूजा करण्याचा महिलांना अधिकार आहे आणि त्यामुळे देशात पुरूष महिला समानता प्रस्थापित होणार असल्याचाही संपूर्ण देशाला साक्षात्कार झाला. यानिमित्ताने माध्यमातून कुठल्याही गोष्टीचे किती यशस्वी मार्केटींग होऊ शकते, त्याचा एक जीवंत अनुभव घेता आला. म्हणजे सलमानखान, शाहरूखखानच्या चित्रपटांवर बंदी, निदर्शने झाली की त्यांचे चित्रपट हमखास विक्रमी उत्पन्नाचे आकडे गाठतात. तसाच काहीसा प्रकार आमच्या शनीदेवांबाबत झाला का? कारण या भूमाता बाईंच्या कृतीने शनी भक्तांची संख्याच प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अशी आंदोलने करणार्या या भगिनीला शनीदेवाने भरभरून द्यावे अशीच प्रार्थना करावीशी वाटते.
याचे कारण देशाच्या कानाकोपर्यात पसरलेल्या कोट्यवधी लोकांना याच रणरागिणीमुळे शिंगणापुरचे शनिमहात्म्य कळू शकले. यापूर्वी असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. महाराष्ट्राबाहेर फारशी माहिती नसलेल्या या देवस्थानचा महिमा भूमातेने देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवला. त्यामुळे समस्त प्रसारमाध्यमांचेही कौतुक करावे लागेल. मनोजकुमारने १९७५ साली शिर्डी के साईबाबा हा सिनेमा काढला आणि नंतर साईबाबांच्या भक्तांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्याच सुमारास संतोषी माता नावाचा सिनेमा आला आणि घरोघरी व्रतवैकल्ये होवू लागली. दहा बारा बर्षांपूर्वी काळूबाईच्या नावानं चांगभल हा मराठी चित्रपट नाही तर अलकापट आला आणि तेथे न भूतो न भविष्यती अशी गर्दी जमली की अपघातात शेकडो माणसे चेंगराचेंगरीत मेली. त्यामुळे असा प्रकार केल्यावर भक्ती शक्तीचा संगम होतो आणि फुकटची प्रसिद्धी मिळते.
त्यामुळेच प्रजासत्ताकदिनी अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावात एक महान घटना घडली. देशभरच्या महिलांना एक मोठा अधिकार आपल्याला असल्याचा शोध लागला. आजवर आपण अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य असली अनेक स्वातंत्र्ये ऐकलेली होती. त्यात पूजेचे स्वातंत्र्य किंवा अधिकार भारतीय नागरिकाला असल्याचा साक्षात्कार नव्याने झाला. इथे पुजा करण्यासाठी श्रद्धा आहे की नाही हे पावण्याची गरज नाही. कारण आपल्याकडे कर्तव्यापेक्षा हक्काला जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे त्या स्वातंत्र्यासमोर देशातले विविध प्रश्न व समस्या किती नगण्य आहेत, त्याचाही अनुभव घेता आला.
महिलांना त्या चबुतर्यावर चढून शनीची पूजा करता आली, म्हणजे या देशातील महिलांना अभेद्य सुरक्षा मिळू शकेल, हे आजवर कोणाच्याच कसे लक्षात आलेले नव्हते? पण हेच जर तीन वर्षांपूर्वी या भूमातेच्या महिलांच्या डोक्यात आले असते तर कदाचित दिल्लीतील निर्भयासारखे प्रकरण घडले नसते. त्यावेळी आवाज उठवावा, महिलांच्या संरक्षणासाठी दंगा करावा असे एकाही भूमातेच्या महिलेला वाटले नाही याचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. म्हणजे पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस बाहेर पडतो, भूकंप होतो तशी अचानक ही महिला संघटना प्रकट झाली काय? कारण निर्भया आणि महिलांच्या प्रश्नांवर ही संघटना कधीच प्रकट झाली नव्हती म्हणून आश्चर्य वाटते.
तसं पाहिलं तर शनि शिंगणापूर हे तसे कुणाला ठाऊक नसलेले गाव आहे. तिथे उघडयावर एक शीळा उभी आहे आणि ठराविक निर्बंध पाळून शनी नामक देवतेची पूजा करावी, असा दंडक आहे. त्यात पुरूषांनाच शीळेपाशी जाता येते आणि महिलांना प्रतिबंध आहे. हा किती अन्याय आहे? शेकडो वर्षे तसे होत आलेले असले, म्हणून तो अन्याय न्याय्य ठरू शकत नाही. आजवर कुणा महिलेने त्याला आव्हान दिले नव्हते. पण गेल्या दोन महिन्यापासून तिथे पूजेचा अधिकार महिलांनाही असल्याचे वाद सुरू झाले. त्यापुर्वी ह्या देवस्थानाची ख्याती भलत्याच कारणास्तव होती, शनि शिंगणापूर म्हणजे जिथे चोरी होत नाही, असे गाव म्हणून प्रसिद्ध होते. तिथे लोकांच्या घराला दारे नाहीत वा कोणी कुठलीही वस्तु कडी-कुलपात बंद करून ठेवत नाही, अशी ख्याती होती. पण महिलांना तिथल्या पूजेचा अधिकार हा कधीच चर्चेचा विषय झाला नाही. पण त्यामुळे देशाला तृप्ती देसाई नावाच्या रणरागिणीचे रुप बघायला मिळाले. प्रजासत्ताकाने शनिची पूजा करण्या़चा अधिकार महिलांनाही दिलेला असल्याचा साक्षात्कार घेऊन ही महिला पुढे झाली. शनिची पूजा महिलांनी करू नये, असा दंडक अन्यत्र असल्याचे ऐकीवात नाही. पण या गावातील तशी समजूत असल्याने त्यांनी चौथर्यावर महिलांना बंदी घातलेली आहे. ती जगभरच्या शनिभक्तांनी मानावी, असा त्या गावकर्यांचा आग्रह नाही. दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्यांचा अधिकार निर्विवाद असतो. सवाल श्रद्धेचा असतो, तेव्हा यातले दंडक महत्वाचे असतात. ते झुगारून श्रद्धेचे नाटक रंगवण्यात अर्थ नसतो. म्हणूनच प्रजासत्ताकदिनी जो काही प्रकार झाला त्याला महिला अधिकाराचे नाटक म्हणावे लागेल. जिथे अधिकार मागण्याची गरज आहे तिथे या महिला कुठेही नव्हत्या हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा