लोकसत्ता या दैनिकात विद्वान लेखक आणि संपादकांची फार मोठी मांदीयाळी होती. त्यामुळे लोकसत्ता या वर्तमानपत्राचा फार प्रभाव महाराष्ट्रावर राहिला. या मांदीयाळीतील शेवटचे संपादक म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे अरूण टिकेकर. अरूण टिकेकर यांच्या निधनाने एक सभ्य, अभ्यासू साहित्यिक आणि संपादकांचे लोकसत्तामधील पर्व संपले आहे. याचे कारण लोकसत्तामध्ये त्यानंतर आलेल्या मंडळींनी विशेषत: कुमार केतकर आदी व्यक्तिंनी वर्तमानपत्राचा वापर हा जाहीरनामा म्हणून सुरू केला. विचार संपला आणि प्रचार आला. त्यामुळेच एकेकाळी असलेला लोकसत्ताचा जनाधारही संपला. कुमार केतकर यांनी लोकसत्तामध्ये केलेले सत्तांतर हे पत्रकारीतेला लागलेले गालबोट म्हणावे लागेल. कारण केवळ सोनिया गांधी आणि कॉंग्रेसची तळी उचलण्यासाठी पेपर चालवायचे धोरण आखले आणि तोच पायंडा पत्रकारीतेत पडला. त्यामुळे पत्रकारीतेतील सभ्यता, मर्यादा, नितीमत्ता धुळीला मिळाली. अगदी साहित्य संमेलनाचे मिळालेले व्यासपिठही कुमार केतकरांनी कॉंग्रेस प्रचारासाठी वापरले. त्यामुळे पत्रकारीता विकल्या गेल्याचे प्रतिक म्हणून टिकेकरांनंतरची पत्रकरीता असे स्वरूप आले आहे. यासाठीच आजच्या घडीला टिकेकरांची वैशिष्ठ्ये आणि गुण पाहणे गरजेचे आहे. अरूण टिकेकर यांनी लोकसत्ताचे दीर्घकाळ संपादकपद भूषवले. याशिवाय त्यांनी इतर काही वृत्तपत्रात संपादकपद भूषवले आहे. ज्या लोकसत्तामधून माधव गडकरी, विद्याधर गोखले यांच्यासारखे संपादक होते, ज्या लोकसत्तामधून शांताबाई शेळके, व पु काळे यांच्यासारखे स्तंभ लेखक होते त्या लोकसत्ताचा आदर जनमानसात होता. अर्थात हा इतिहास झाला. पण ही परंपरा अरूण टिकेकर यांनी आपल्या कर्तृत्वाने टिकवली होती. एका उंचीवर नेवून ठेवली होती. संपादक हा लेखक असला पाहिजे, तो चांगला अभ्यास केलेला असला पाहिजे, त्याचे वाचन सर्वदूर असले पाहिजे. या अभ्यासाचा वापर जनहितासाठी केला पाहिजे याचे ज्ञान आणि भान अरूण टिकेकरांनी जपले होते. टिकेकर यांनी व्यक्तिचित्रे लिहून आपल्याला जे वर्तमानपत्रातून व्यक्त होता येणार नाही ते यातून स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यांनी लेखणीबद्ध केला आहे. हा फार महत्वाचा टप्पा आहे. विद्यापिठालाही इतिहास असतो हे प्रत्येक विद्यार्थ्याला समजणे आवश्यक आहे. आज ज्या प्रमाणे कुमार केतकरांसारखे संपादक, पत्रकार राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेवून स्वत:ला मोठे करून घेण्याचा प्रयत्न करतात तसे टिकेकरांनी कधी केले नाही. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला पण त्यांना जे दिसले तेच त्यांनी लिहीले. म्हणूनच टिकेकर यांनी शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे फास्ट फॉरवर्डमधून केलेले संपादन हे प्रत्येकाने अभ्यासण्याची गरज आहे. जिथपर्यंत मराठी माणूस पोहोचला आहे तिथपर्यंत अरूण टिकेकर पोहोचले होते. त्यांनी लोकसत्ताचे नाव मोठे केले होते. त्यामुळेच टिकेकरांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. मराठी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. दिल्ली येथील लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमधील भाषातज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. आपल्या ज्ञानाचा आणि भाषेचा वापर त्यांनी समाजहितासाठी केला होता. कोणताही राजकीय शक्तीचा लाभ मिळावा यासाठी कोणते काम टिकेकरांनी कधी केले नाही. सध्या मिडीया, प्रसारमाध्यमे, वर्तमानपत्रातून राजकीय टिका करून स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची फार मोठी चढाओढ लागलेली दिसते. पण राजकारणातील लोकांवर जी टीका होते, टिप्पणी होते यासंबंधी काही नियमावली हवी अशी टिकेकरांची नेहमीच भावना होती. राजकीय नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा कायदा तयार करावा असेही त्यांना वाटे. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने टिकाकार होण्यापेक्षा टिकेकर होणे केव्हाही चांगले आहे. अरूण टिकेकरांचा आणखी एक गुण म्हणजे, पत्रकाराने चमकोगिरी न करता लेखन करावे व समाज बदलाला हातभार लावावा अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे इतके व्यासंगी पत्रकार असूनही ते कधीही कोणत्याही वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी सहभागी होत नसत. टिकेकर यांची ओळख एक व्यासंगी व पत्रकारितेची मूल्य जोपासणारा प्रामाणिक पत्रकार अशीच राहिली. पत्रकारितेतील प्रखर बुद्धीवादाचे पुरस्कर्ते असणारे डॉ. टिकेकर हे चौफेर प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते. आपल्या लिखाणाने त्यांनी संपादक पदाला एक उंची प्राप्त करून दिली होती. ते एक अभिजात ग्रंथप्रेमी होते. आज पत्रकारीतेची मुल्य हरवत जात असताना, केवळ टिका करणे म्हणजे पत्रकारीता आहे, विरोधासाठी विरोध करणे म्हणजे पत्रकारीता आहे असा समज असलेल्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी टिकेकरांचा आदर्श हा फार महत्त्वाचा राहील.
मंगळवार, १९ जानेवारी, २०१६
पत्रकारांनी टिकाकार होण्यापेक्षा टिकेकर व्हावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा