मंगळवार, १९ जानेवारी, २०१६
साहित्याचा सण की शिमगा?
आज ८९ व्या साहित्य संमेलनास सुरूवात होते आहे. साहित्य संमेलन आणि राजकारणी,समाजसुधारक यांचे जवळचे नाते आहे. पण यापूर्वी ज्यांनी ज्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भूमिका वठवल्या आहेत त्या समाजसुधारक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक किंवा राजकारणी यांचा एक चांगला विचार होता. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे अशा महान व्यक्तिंनी संमेलनाचा वापर सुधारणा आणि साहित्यात भर घालण्यासाठी केला. पण आत्ताचे हे सुमार अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणजे केवळ वाचाळ सबनीस आहेत. ना कसले कर्तृत्व ना कसला विचार. प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणार्या आयटम गर्लचा हा तर नवा अवतार आहे.
एकेकाळी न्यायमूर्ती महादेवशास्त्री रानडे यांनी पुढाकार घेत ग्रंथकारांना एकत्र करायला सुरुवात केली. मराठी साहित्यिकांच्या या वार्षिक मेळाव्यास ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ असे भारदस्त दिले गेले. आजपासून पिंपरी चिंचवडला ८९ वे साहित्य संमेलन सुरू होते आहे. भाषेच्या निमित्ताने दीर्घकाळ जपली गेलेली अशी परंपरा तशी दुर्मिळच आहे. साहजिकच मराठी भाषेवर प्रेम असणार्यांना या संमेलनाचे कुतूहल असते. यासाठी लाखो मराठीप्रेमी जमतात. मराठी साहित्य ऐकतात, चर्चा करतात. लाखो रुपयांची उलाढाल होते. वाचकांना भेटण्याची संधी मिळत असल्याने लेखक वर्गही खुश असतो. संवाद होतो. भेटीगाठी घडतात. संमेलनाचे एकूण स्वरूप उत्सवी थाटाचे असते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून संमेलनाचे पडघम वाजू लागले की चर्चा-वाद यांना ऊत येतो. ‘संमेलनाध्यक्ष’ निवडण्याच्या प्रक्रियेपासून याची सुरुवात होते. मराठीचा उत्सव मानल्या गेलेल्या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड जेमतेम मंडळी करतात. मुळात निवडणूक का व्हावी हा प्रश्न जसा अनेक वर्षे अनुत्तरित आहे तसाच निवडणुकीला कोणी उभारावे याचेही काही ताळतंत्र नाही. ही वस्तुस्थिती माहिती असूनही ‘संमेलनाध्यक्ष’ यांना अवास्तव महत्त्व प्राप्त होते. आपण फारच विद्वान विचारवंत, प्रतिभावंत वगैरे असल्याने काळानेच आपल्यावर ‘संमेलनाध्यक्ष’ ही जबाबदारी सोपविली असल्याचा साक्षात्कार नियोजित अध्यक्षांना होऊ लागतो. वास्तविक पाहता तेवढी त्याची लायकीही नसते. गेल्या काही वर्षांतील संमेलनाध्यक्षांचे उपद्व्याप पाहता कोणी यांना अध्यक्ष केले आणि यांनी साहित्यासाठी काय केले असा प्रश्न निर्माण होतो.
अध्यक्षपद पदरात पडल्यामुळे सत्कार समारंभ आणि प्रसिद्धीचे वलय मिळत असल्याने याच धांदलीत ते असे काही बोलून जातात की त्यांची पुरती शोभा होते. आपली नसलेली अक्कल दाखवतात आणि किंमत कमी करून घेतात. एखाद्या नवख्या माणसाला साहित्य संमेलन म्हणजे मराठी माणसांची अब्रू काढण्याचा तमाशा आहे काय असेच वाटते यातून.
या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे असेच काहीसे झाले आहे. संमेलनाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कोण बुवा हे सबनीस, हा प्रश्न बहुतेक मराठीजनांना पडला होता. अशा वेळी आपला वकूब ओळखण्याचा सूज्ञपणा सबनीस दाखवू शकले असते. जे लोक ओळखत नाहीत किंवा या नावाचा कोणी प्राणी लेखक साहित्यिक आहे हे लोकांना समजण्यासाठी काहीतरी चांगले काम करू शकला असता. पण ते या श्रीपाल सबनीस यांना जमले नाही आणि त्यांनी थेरं सुरू केली.
संमेलनाध्यक्ष म्हणून प्रत्येकवेळी व्यासंगी आणि विद्वान साहित्यिक मिळू शकत नाही, हे वास्तव मराठीप्रेमींनीही मान्य केलेले आहे. पण सबनीसांनी काय दिवे लावले? तर ते देशाच्या पंतप्रधानांवर घसरले. काही अडलं होतं का? सबनीसांच्या मताने काही बदलणार होतं का? सबनीसांच्या मताला कोणी किंमत देणार होते का? वास्तविक पंतप्रधानांच्या लाहोर भेटीनंतर झालेल्या पठाणकोट हल्ल्यामुळे सबनीसांनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केलेली भीती योग्यच ठरली. पण मुद्दा होता तो कोणी, कुठे, कशाकरिता आणि कोणते शब्द वापरावेत याचा. मोदींचा एकेरी उल्लेख करून सबनीसांनी केलेल्या उथळपणाने त्यांनी स्वत:ची लायकी घालवली. मात्र स्वागताध्यक्षांनी कान टोचल्यावर सबनीसांनी एक पाऊल मागे हटत दिलगिरी व्यक्त केलीे.
या वादातून काही चांगले बाहेर पडणार असेल, निर्माण होणार असेल तर त्याला अर्थ आहे. क्षुल्लक टिपण्यांवर वाद रंगू लागले तर त्यातून एकूण मराठी साहित्यविश्वाची कच्ची गुणवत्ता सिद्ध होते. याचे भान संमेलनाध्यक्षांना राहिलेच नाही. त्यामुळे आजच्या उद्घाटनाच्या भाषणात तरी काही तरी ते चांगले बोलतील आणि गेलेली अब्रू परत मिळवतील अशी अपेक्षा करूया. तेवढी अक्कल नसेल तर त्यांनी कोणाकडून तरी ते लिहून घ्यावे पण संमेलनाला गालबोट लागेल असे सवंग लोकप्रियतेकसाठी काही करू नये. साहित्य संमेलनाचा आनंदाचा सण साजरा करायचा की शिमगा हे सबनीसांवर अवलंबून आहे.
15/01/2016
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा