शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

खरे किती, खोटे किती

 मोठी माणसं आपल्या आत्मकथेतून बरंच काही बोलून जातात. म्हणजे त्यांच्या कारकीर्दीत जे त्यांना बोलता येत नाही ते नंतर कित्येक वर्षांनी आपल्या आत्मकथनातून बोलून जातात. बर्‍याचवेळा त्यातून अनेक वादही निर्माण होतात. पण हयातीत, कारकीर्दीत कसलाही चकार शब्द न काढणारी माणसे अशा तर्‍हेने पुस्तकातून व्यक्त होतात तेव्हा त्यांची कारकीर्दीत फार मोठी मुस्कटदाबी होत असावी असे वाटते.    नुकतीच सी. के. नायडू आजीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झालेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक ६६ वर्षीय सय्यद किरमाणीही लवकरच सनसनाटी खुलासा करणार आहेत. सहकारी खेळाडूंकडून झालेल्या भेदभावाबाबत आपण आपल्या आत्मकथेत माहिती दिली असून लवकरच या पुस्तकाचे विमोचन होणार, अशी माहिती माजी यष्टिरक्षकाने दिली.   सैद किरमाणी यांच्या यष्टीरक्षणाचे कौतुक भारतीयांनी मनापासून केले. किंबहुना यष्टीरक्षक असावा तर तो सैद किरमाणी यांच्यासारखाच असावा असे समीकरण बनले होते. किरमाणी यांच्यानंतर चंद्रकांत पंडीत, किरण मोरे, नयन मोंगिया हे यष्टीरक्षक होवून गेले. पण किरमाणींइतकी लोकप्रियता कोणालाही लाभली नाही. किरमाणींची ती गुणवत्ता आणि नावलौकीक गेल्या दहा वर्षात दीर्घकाळ यष्टीरक्षण करून कोणी टिकवली असेल तर महेंद्रसिंग धोनी यांनीच.   असे असतानाही आपल्या कारकीर्दीत खूप त्रास सहन करावा लागल्याचा गौप्यस्फोट आता होणार आहे. मला अनेकांकडून त्रास सहन करावा लागला. माझ्यासोबत अन्याय झाला आहे. माझ्यासोबत खेळणारे सहकारी निवडकर्ते बनले. घरगुती क्रिकेटमध्ये १९८६ ते ९३ या कालावधीत माझ्यासोबत भेदभाव झाला. माझी कामगिरी उत्कृष्ट होती तसेच तंदुरुस्तीही चांगली होती. एवढेच काय, पण मी कधीही वादात अडकलो नाही. असे असताना माझी निवड करण्यात आली नाही. यासंदर्भात इत्थंभूत माहिती माझ्या आत्मकथेत मी दिली आहे, असे किरमाणी यांचे म्हणणे आहे.    किरमाणी म्हणतात, मला २०११ च्या विश्वचषकादरम्यान आत्मकथा बाजारात आणायची होती. त्या वेळी मला असे करू नका, असा सल्ला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. म्हणजे टीममधून काढून टाकले जाण्याची भिती नसतानाही किरमाणी तेव्हा का गप्प बसले हा प्रश्‍न उरतोच.   आपण सत्तेत नसतान, कारकीर्दीत नसताना जुनी मढी उकरून काढायची आणि नव्या वादाला तोंड फोडायचे. हे बहुतेकजण करतात. यापूर्वी राजकीय क्षेत्रात माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी असाच गौप्यस्फोट आपल्या आत्मकथनातून केला होता. आपले आत्मकथन हे आपल्या मृत्यूनंतर प्रकाशीत व्हावे अशी त्यांची अटही होती. अर्थात ही अट होती की भीती होती हा संशोधनाचा विषय आहे. पण अधिकारात असताना तोंडात मूग गिळून गप्प बसणारे नंतर आपण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला हे सांगतात तेव्हा गंमत वाटते.   अनेक परकीय क्रिकेटपटूंनी आपल्या आत्मचरित्रातून असे वादग्रस्त मुद्दे निर्माण केले आहेत. रिकी पॉंटींगनेही काही वर्षांपूर्वी असा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला होता. पण यातील आत्मकथन खरे किती आणि सूडबुद्धीने लिहीलेले किती हाही प्रश्‍नच आहे.प्रसिद्ध मराठी निर्माते, अभिनेते शाहीर दादा कोंडके यांची तर दोन आत्मचरित्र आहेत. यातील एकटा जीव हे अनिता पाध्ये यांचेकडून लिहून घेतलेले आहे. ते अधिक वादग्रस्त आहे. त्या आत्मचरित्रात दादा कोंडके यांनी आशा भोसले आपल्या प्रेमात पडल्या होत्या असा गौप्यस्फोट केला आहे. म्हणजे रूपेरी पडद्यावर झळकत असताना दादांनी फारसे गॉसिपींग केले नव्हते. दादांबरोबर फक्त उषा चव्हाण यांचेच नाव जोडले जात होते. पण निवृत्तीनंतर आलेल्या या आत्मकथनात असे काही मुद्दे घुसडून अनेकजण स्वत:ला मोठे करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे त्या माणसांबद्दल बर्‍याचवेळा तिरस्कार निर्माण होण्याची शक्यताच अधिक असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: