पठाणकोटच्या हवाई दलाच्या जागेत झालेला दहशतवादी हल्ला ही अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणजे २६/११ चा २००८ चा मुंबईतील हल्ला असाच असला तरी तो गर्दीची ठिकाणे म्हणून केला होता. पण थेट लष्करी हवाई दलाच्या ठिकाणांवर हल्ला करणे म्हणजे फार भीषण असा प्रकार आहे. ९/११ ला अमेरिकेच्या पँटागॉन अणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यासारखाच हा भयंकर प्रकार आहे. फक्त अमेरिकेने ओसामा बिन लादेनला धडा शिकवला, अफगाणिस्थान बेचिराख केले. आम्ही हे करणार आहोत की नांगी टाकून बसणार आहोत असा प्रश्न आहे.
चारही बाजूला कडेकोट बंदोबस्त असताना जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी इथे घुसलेच कसे, हा खरा प्रश्न आहे. या अतिरेक्यांनी हल्ला करण्यासाठी पठाणकोटची निवड केली यातच त्यांचा हेतू स्पष्ट होतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा हल्ला मोदी-शरीफ भेटीनंतर होऊ शकतो ही आहे. विशेष म्हणजे याची जाणीव गुप्तहेर यंत्रणांना होती आणि त्यांनी सुरक्षा यंत्रणेला तशी माहितीही दिली होती. भारत-पाकमधला कोणताही संवाद दहशतवाद्यांना आणि त्यांना वापरणार्या पाकमधल्या कोणत्याही शक्तींना मंजूर नाही. त्यामुळे बोलणी झाल्यावर दहशतवादी असा उपद्व्याप करतील अशी भीती तज्ज्ञांनीही व्यक्त केली होती. तरीसुद्धा भारतीय सुरक्षा यंत्रणा गाफील राहिल्या हे धक्कादायक आहे.
पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की तिला सरळसोट उत्तर असूच शकत नाही, हे या हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पठाणकोटच्या हल्ल्याने जैश-ए-मोहंमदने पुन्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. तसे पाहता पाकिस्तानी दहशतवादी संघटनांत नेहमीच स्पर्धा असते. त्यामागे राजकारण आहे आणि अर्थकारण आहे. अशी स्पर्धा जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए-तोयबामध्ये सातत्याने आहे. लष्कर-ए-तोयबाला पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना आयएसआयचा पाठिंबा असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यामागची मूळ प्रेरणा कुठेतरी पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआयकडूनच येते असा होतो. नवाझ शरीफ यांचं पाक लष्करावर कोणतंही नियंत्रण नाही. किंबहुना तशी त्यांची इच्छा नाही.
१९९९ मध्ये पंतप्रधान वाजपेयींनी लाहोरला भेट दिल्यानंतर कारगिलचा हल्ला घडला होता. आता मोदींनी नवाज शरीफ यांना भेट दिल्यानंतर हा हल्ला घडला आहे. दोन्ही घटनांमध्ये नवाज शरीफ हे कॉमन फॅक्टर आहेत. नवाझ शरीफ यांना भारताशी कितीही मैत्री हवी असली तरी पाक लष्कर किंवा आयएसआयला डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही.
भारताच्या दृष्टीने सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे या हल्ल्याने पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पठाणकोटमध्ये अतिरेक्यांनी नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही. हा भारतीय हवाई दलाचा अत्यंत महत्त्वाचा असा लष्करी तळ आहे. पठाणकोटजवळ असलेल्या घनदाट जंगलातून हे अतिरेकी घुसले. आपल्या पूर्वतयारीसाठी त्यांनी हल्ल्यापूर्वी जी कृत्यं केली त्यावरून तरी पंजाब पोलिस किंवा लष्कराने सावध व्हायला हवं होतं. या अतिरेक्यांनी एका टॅक्सी ड्रायव्हरचा खून केला आणि त्याच टॅक्सीतून सुपरिटेंडंट ऑफ पोलिस सलविंदरसिंग, त्यांचा आचारी मदन गोपाळ आणि मित्र राजेश वर्मा यांचं आदल्या दिवशी अपहरण केलं होतं. तिथून सलविंदरसिंग आणि मदन गोपाळ पळून आले आणि त्यांनी पंजाब पोलिसांना ही माहिती दिली. पण पोलिसांनी आपल्याच वरिष्ठ अधिकार्यावर विश्वास ठेवला नाही, उलट या दोघांवर संशय घेतला आणि मारहाण केली. अत्यंत हिडीस अशी ही घटना आहे.
पंजाब पोलिस सावध असते तर हा अनर्थ कदाचित टळू शकला असता. अतिरेक्यांविरुद्धची कारवाई सुरू झाल्यावरही सुरक्षा यंत्रणांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. लष्करी अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी गाड्र्सचे कमांडर यांना अनेक तास नेमके कुणाचे हुकूम आपण स्वीकारायचे आहेत हे कळत नव्हतं. हाच प्रकार महाराष्ट्रात २६/११ ला झाला होता. त्यामुळे आपण करकरे, साळसकर, अशोक कामटे, यांच्यासारखे अधिकारी गमावून बसलो.
विशेष म्हणजे एवढा मोठा हल्ला होऊनही पाकिस्तानशी संबंध तोडण्याची भाषा पंतप्रधान मोदी, भारत सरकार किंवा त्यांचे आंधळे भक्त करताना दिसत नाहीत. भारत-पाक संबंध सुधारायचे असतील तर बोलणी बंद करून चालणार नाही, पाकिस्तानातल्या लोकशाही शक्ती बळकट केल्या पाहिजेत असं आता भाजपचेच नेते म्हणू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे केवळ घोषणाबाजी किंवा धक्कातंत्र नव्हे हे आता नरेंद्र मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. पण आपल्या गलथानपणाचा आणि गाफील राहण्याचा हा फटका आहे हे निश्चित.
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
गाफिलपणा जबाबदार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा