रविवार, ३१ जानेवारी, २०१६

आमच्या धडावर ठेवला आमचाच मेंदू

   आज सांजवात या दैनिकाने आपल्या वाटचालीची पंधरा वर्ष पूर्ण करून सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सोळावं वरीस धोक्याचं असं जरी जवानीच्या बाबतीत म्हटलं असलं तरी आमच्यासाठी हे वर्ष मोक्याचं असेल यात शंकाच नाही. हा मोका असेल आमच्या असंख्य वाचक, वितरक, पत्रकार आणि हिंतचिंतक बांधवांनी आम्हाला इथून पुढेही प्रेम देण्याचा. आमची पंधरा वर्षांची वाटचाल ही अतिशय धडाक्याची झाली. याचे कारण आम्ही आमच्या धडावर आमच्याच मेंदूला जागा दिली आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आमच्याच मेंदूचा आम्ही विचार करतो, म्हणून खर्‍या अर्थाने अंधकारात प्रकाश देण्याचे काम आम्ही केलेले आहे, हे सांगताना अभिमान वाटतो.   की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने| लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने|   स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांच्या विरोधात जे पाउल उचलले होते तसेच आम्ही प्रस्थापित परिस्थिती आणि भ्रष्टाचाराविरोधात उचलले. ते अतिशय डोळसपणे उचलले आहे. त्यामुळे सावरकरांच्या या गीताने आम्हाला प्रेरणाच मिळते. आमच्या वाटेत अनेकांनी काटे पसरण्याचा प्रयत्न केला पण पंधरा वर्षात कोणत्याही काट्याला जास्त सलू दिले नाही. त्यांना वळवळणार्‍या गांडुळांप्रमाणे नम्र करून चिरडण्याचे बळ आम्हाला मिळाले ते आमच्या तेजस्वीपणाने आणि प्रामाणिकपणाने.   आता उठवू सारे रान| आता पेटवू सारे रान|शेतकर्‍यांच्या राज्यासाठी| लावू पणाला प्राण॥    या साने गुरूजींच्या देशभक्तीतील गीताप्रमाणे सांजवातच्या ज्योतीची अनेकवेळा मशाल करून आम्ही प्रस्थापितांविरोधात लढा दिला. खर्‍याला खरंच म्हणायचे हे धाडस दाखवले ते केवळ सर्वसामान्यांच्या हितासाठीच. त्यामुळे कितीही राजकीय परिवर्तने घडली, वादळे आली, भलेभले कोसळले तरी सांजवातची ज्योत ही स्थिर राहिली. कारण या ज्योतीला बाणेदारपणाची झालर आहे. गेल्या पंधरा वर्षात सांजवातने काय केले नाही? ज्या कोणा उपेक्षिताला कोणतेही माध्यम जवळ करत नाही त्यांना मोठेपणाने मानाचे स्थान देण्याचे काम सांजवातने केले. बातमी, प्रसिद्धी आणि मोठेपणा हा पैशात मोजला जात होता. कितीही चांगले काम करा, पण त्यात सेलेबल व्हॅल्यू नसल्यामुळे चांगल्या बातमीचे मूल्य शून्य धरले जात होते. त्यामुळे चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळणे बंद झाले होते. या अंधकाराविरोधात आम्ही,तमसो मा ज्योतिर्गमय बनून पुढे आलो. आज कोणत्याही प्रस्थापित दैनिकात, प्रसारमाध्यमात चार ओळीचीही बातमी छापायची म्हटले तर सामान्य माणसांना अडचणी येतात. या जिल्ह्यात कितीतरी चांगली कामे होत आहेत. कितीतरी लोक खूप मोठे काम उभे करत आहेत. ना त्यांना कोणी प्रसिद्धी देत ना चांगल्या कामाचे कौतुक होते. याचे कारण राजकारण्यांभोवती पिंगा घालायचा आणि त्यांच्याकडून काही पदरात पडते काय हे पहायचे हीच हीन प्रवृत्ती वर्तमानपत्रात निर्माण झाली. अशा परिस्थितीत उपेक्षितांना न्याय देण्याचे काम आम्ही केले हे सांगताना अभिमान वाटतो.   तेरा वर्षांपूर्वी दिग्विजय खानविलकर हे राज्याचे आरोग्य मंत्री असताना काही चुकीचे निर्णय झाले होते. एकीकडे मेनका गांधींसारखी प्राणीमित्र महिला प्राण्यांना न्याय मिळावा म्हणून गळा काढत होती तर दुसरीकडे राज्य सरकारने श्‍वानदंशावरच्या मोफत लसी बंद केल्या होत्या. कुत्री कोणाला चावतात? श्रीमंतांना, गाडीतून प्रवास करणार्‍यांना चावत नाहीत. रस्त्यावरून जाणार्‍या सामान्य, गोगगरीबांनाच चावतात. त्यामुळे वर्षानुवर्षे श्‍वानदंशावरच्या लसी या सरकारी रूग्णालयातून मोफत मिळत होत्या. पण राज्य सरकारने हे धोरण बदलले आणि गरीबांना २ हजार रूपये देणे अशक्य झाले. या विरोधात सांजवातने प्रचंड लढा दिला आणि सातारच्या सिव्हील हॉस्पिटलमधून गोरगरीबांना मोफत श्‍वान दंशावरचे इंजक्शन देण्यास भाग पाडले. हे फक्त सांजवातच करू शकतो. कारण कोणत्याही वर्तमानपत्राला हा विषय दिसला नाही. कारण हा प्रश्‍न झोपडपट्टीत राहणार्‍यांचा, गोरगरीबांचा, सामान्यांचा होता. यांच्यापासून कोणाला फायदा नव्हता. पण त्याविरोधात लेखन करून, सांजवातने गरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. याचे कारण आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडलो नाही. कोणाच्या अंधानुकरणाने वागलो नाही. आम्ही आमची स्वत:ची अशी स्वतंत्र वाट तयार केली. कारण आमच्या धडावर आमचेच डोके होते, आमचाच मेंदू त्यात कार्य करत होता. बाहेरच्या मेंदूला त्यात शिरकाव करू दिला नाही, म्हणूनच ही ज्योत खर्‍या अर्थाने सांजवातची अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ठरली. पंधरा वर्ष पूर्ण केल्यानंतर आता सोळाव्या वर्षात पदार्पण करताना नवीन काही संकल्पना आहेत, त्या प्रत्यक्ष कागदावरच उतरतील. कारण घोषणा करायला आम्ही काही राजकारणी नाही. त्यामुळे आधी केले, मग सांगितले याच उक्तीप्रमाणे आमची इथून पुढचीही वाटचाल राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: