बुधवार, ६ जानेवारी, २०१६

चित्राचा आग्रह

       गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या थोर पुरूषांची छायाचित्रे चलनी नोटांवर असावीत म्हणून मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय नोटेवर महात्मा गांधींऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असावे अशी मागणी केली होती. त्याचवेळी कोणीतरी स्वामी विवेकानंदाचे  चित्र असावे अशी मागणी केली होती. खरं तर हा अत्यंत बालिशपणा म्हणावा लागेल. भारतीय चलन हा एक रूपाया आहे. कोणतीही नोट नाही. त्यामुळे नोटेवर छायाचित्र छापल्याने आपल्या लाडक्या, महान, प्रिय व्यक्तिंचा गौरव होईल असे बिल्कूल समजता कामा नये.
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद ही एवढी मोठी उत्तुंंग व्यक्तिमत्वे होती आणि आहेत की ती कोणत्याही चलनी रूपयापेक्षा मोठी आहेत, महान आहेत. पैशाने त्यांची महती विकत घेता येणार नाही. त्यांचे थोरपण कधीही पैशात मोजता येणार नाही. त्यांच्या महानतेइतका पैसा या देशाच्या तिजोरीत असूच शकत नाही. त्यामुळे नोटेवर या महान व्यक्तिंची छायाचित्रे छापल्याने या विभूतींचा अवमान केल्यासारखेच होईल. त्यापेक्षाही आपल्या देशात जोपर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे, त्याला पायबंद लावला जात नाही, काळा पैसा तयार होणे थांबवले जात नाही तोपर्यंत या महान व्यक्तिंचा फोटो नोटेवर येताच कामा नये. कारण या महान व्यक्तिंनी पैशापलिकडे फार मोठे काम केेले आहे. त्यांच्या फोटोच्या साक्षीने भ्रष्टाचार नोटेच्या रूपातून छाला तर तो या व्यक्तिंचा अवमान ठरेल.
    त्या तुलनेत इंग्लंडमध्ये एक नामी शक्कल लढवली आहे. २०१६ मध्ये इंग्लंडमध्ये आणल्या जाणार्‍या नव्या नाण्यांवर प्रख्यात साहित्यिक, नाटककार शेक्सपिअर याची नाटके आणि बीट्रिक्स पॉटरच्या परिकथांची चित्रे झळकणार आहेत. गेल्या १००० वर्षातील इंग्लंडची कल्पना यातून देण्यात येईल, असे रॉयल मिंटतर्फे सांगण्यात आले.
       यानुसार दोन पाऊंडाच्या नाण्यांवर शेक्सपिअरची गंभीर व विनोदी नाटके यांची चित्रे असतील. शेक्सपिअरचा मृत्यू होऊन आज ४०० वर्षे लोटली आहेत. ५० पेन्सच्या नाण्यावर हेलन बीट्रिक्स पॉटरच्या परिकथा झळकणार असून तिच्या १५०व्या जयंतीनिमित्त सन्मान म्हणून हा निर्णय घेतला आहे. पॉटर ही इंग्लिश लेखिका, नैसर्गिक वैज्ञानिक म्हणून ओळखल्या जातात. ग्रेट फायर ऑफ लंडनचे चित्रही दोन पाऊंडच्या नाण्यावर असेल.
    अर्थात असा उपक्रम भारतात करायचे म्हटले तर ते अत्यंत अवघड आहे. कारण भारतातील साहित्य आणि त्याची पुरातननता पाहता नक्की कोणाचा समावेश करायचा असा प्रश्‍न निर्माण होईल. भारतामध्ये असंख्य भाषा आहेत. त्या भाषांमध्ये विविध प्रकारचे उच्च साहित्य निर्माण झालेले आहे. आपले वेद आहेत, पुराणे आहेत, महाभारत आहे, रामायण आहे. संपन्न असा इतिहास आहे. यापैकी नेमका कोणाचा समावेश नाण्यांवर छापण्यासाठी करायचा असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहणार नाही.
        इंग्लंड हा अत्यंत छोटासा आणि कमी इतिहास असलेला देश आहे. भारतामध्ये त्यामानाने खूपच प्रमाणात साहित्य निर्मिती होत असते. कालिदास, भास यांच्यासारखे संस्कृत नाटककार या देशाची संपन्नता आहेत. विविध भाषांमधील ग्रंथसंपदा ही या देशाची संपन्नता आहे. या संपन्नतेच्या जोरावरच भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू बनला आहे. त्यामुळे अशाप्रकारची नाणी काढायची म्हटली तरी ती प्रत्येक प्रांतात वेगवेगळी अशी काढावी लागतील. भाषांची विविधता, विविध भाषांमधील साहित्य संपन्नता ही खरी या देशाची संपन्नता असल्यामुळे अशा प्रकारची साहित्यिक नाणी काढणे हे भारताला मात्र कधीच शक्य होणार नाही.
    त्यामुळे नाणी आणि नोटांवर चित्र असणे यातूनच आपल्या महान व्यक्तिंची महानता सिद्ध होईल असे बिल्कूल समजू नये. गेल्या वर्षी पी के हा अमिरखानचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटात गांधीजींचा फोटो दाखवल्यावर काहीतरी खरेदी करता येते हे परग्रहावरून आलेल्या पीकेला समजते. म्हणून तो गांधीजींचे दिसेल ते चित्र गोळा करतो आणि खरेदीला बाहेर पडतो. पण फक्त नोटेवरच्याच गांधींच्या फोटोला किंमत आहे हे लक्षात आल्यावर गांधीजींचे बाकीचे फोटो तो सरळ फेकून देतो. म्हणजे खर्‍या अर्थाने अमिरने गांधीजींची विटंबना इथे केली होती. त्याबाबत कोणीही आवाज उठवला नाही, तर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून या खर्‍या अपमानाकडे दुर्लक्ष केले होते. पण नोटेवर एखाद्या व्यक्तिचा फोटो छापल्यावर काय अवस्था होते हे यातून स्पष्ट होते. या देशात महात्मा गांधीच्या नोटेवरील फोटोला किंमत आहे, बाकी कुठेही तशी किंमत नाही हे जाहीरपणे स्पष्ट केले होते. तसा प्रकार आपण या देशातील कोणाही अन्य महापुरूषाबाबत होता कामा नये ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी हा नोटेवरच्या चित्राचा हट्ट सोडलेलाच बरा.
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: