शनिवार, ९ जानेवारी, २०१६

केवळ कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी

गेल्या महिन्यापासून साडेसाती लागलेल्या शनी शिंगणापूरच्या शनीदेवांवर महिलांची कृपादृष्टी र्‍हावी आणि महिलांच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून विश्‍वस्त मंडळात महिलांची वर्णी लावण्यात आली आहे. अर्थात ही एक स्वागतार्ह बाब आहे.    म्हणजे, सध्या अंधश्रद्धेच्या साडेसातीत गुरफटलेल्या शिंगणापूरच्या शनी देवस्थानचे विश्‍वस्त मंडळ नुकतेच जाहीर झाले. त्यात प्रथमच दोन महिलांची विश्‍वस्तपदी वर्णी लागली आहे. एरवी महिलाविरोधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवस्थानच्या इतिहासात घडलेला हा मोठा चमत्कार आहे, असा देखावा उभा केला जात आहे. अर्थात शनीच्या मंदीराचाच हा प्रश्‍न नाही. कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीच्या गाभार्‍यात तरी पूर्वी महिलांना येण्यास कुठे परवानगी होती? दोन वर्षांपूर्वी विविध महिला संघटना आक्रमक झाल्या आणि आंबाबाईची पूजा केली तेव्हा कुठे महिलांना गाभार्‍यात जाता आले. तोच प्रकार सध्या शनी शिंगणापूरबाबत होत आहे.     गेल्या महिनाभरापासून या देवस्थानचा महिला विरोध गाजत आहे. विश्‍वस्त नियुक्तीनिमित्ताने तो पुन्हा चर्चेत आला आहे. ९८ इच्छुकांमध्ये फक्त १० महिलांचाच समावेश होता. देवस्थानचा पूर्वेतिहास पाहता महिलेची विश्‍वस्तपदी वर्णी लागेल का याची सर्वांना उत्सुकता होती. परंतु शनिदेवाचे सुदैव, योगायोग की जाणीवपूर्वक योजना ते शनिदेवच जाणे पण विश्‍वस्तपदासाठी मुलाखती घेणार्‍यांनी दोन महिलांवर मेहेरबानी केली. त्यांची विश्‍वस्त म्हणून नेमणूक झाली.    संसद, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिला महत्त्वाची पदे भूषवत आहेत. मात्र शनिदेवाची वक्रदृष्टी महिलांवर आजवर कायम आहे. काही देवस्थानांनी प्रथा-परंपरांच्या नावाखाली महिलांवर लादलेले निर्बंधसुद्धा कायमच आहेत. आधुनिक काळानुसार त्यात बदल व्हावा अशी अपेक्षा केली जाते. मात्र त्याला प्रस्थापितांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. वृत्तवाहिन्यांवरील बातमीपत्रात नवनिर्वाचित महिला विश्‍वस्तांच्या चेहर्‍यांवर आनंद दिसला. मात्र माध्यमांच्या प्रश्‍नांना सामोरे जाताना त्या गोंधळल्या होत्या. त्यामुळे महिलांना समानाधिकार मिळवून देण्याबाबत त्या आग्रही राहतील असे वाटत नाही. महिलांना प्रथमच संधी देण्याचा चाणाक्षपणा दाखवल्याचे समाधान संबंधितांना मिळाले असेल. परंतु दोन महिला विश्‍वस्त झाल्याने महिलांची उपेक्षा खरेच थांबेल का? देवस्थानची परंपरा छेदून चौथर्‍यावर दर्शन घेण्याची संधी महिलांना मिळवून देण्यात या महिला विश्‍वस्त यशस्वी होतील का? हा खरा प्रश्‍न आहे. म्हणजे अन्य विश्‍वस्तांचे त्यांना कितपत सहकार्य मिळेल?       साधारणपणे महिलांना पदे दिली जातात ती केवळ आरक्षणाने दिली जातात. त्यांच्या कर्तृत्वाला फारसा वाव नसतो. आमदार सौभाग्यवती, खासदार सौभाग्यवतीपासून सरपंच सौभाग्यवतीचा नाट्यप्रयोग सर्वत्र पहायला मिळतो. चार दिवसांपूर्वी कराडला नगराध्यक्षदी महिला उमेदवाराला संधी मिळाली. पण बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी उपनगराध्यक्ष निवडीच्या, सुभाषराव पाटील यांच्या निवडीचा गौरव केला. म्हणजे पुन्हा महिलांचे खच्चीकरण करण्याची प्रवृत्ती कायम ठेवून हा प्रकार होताना दिसतो आहे. अनेक वर्तमानपत्रातील बातमीत नगराध्यक्षपदापेक्षा उपनगराध्यक्ष निवडीचे कौतुक आणि प्रसिद्धी केली होती. यावरून महिला नगराध्यक्षांना काम करायला संधी किती मिळणार? त्यामुळे शनीच्या मंदीरातील विश्‍वस्त पदावर महिलांना संधी दिली तरी त्या महिलांना चौथर्‍यावर येवू देतील की नाही याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. प्रचलित परंपरांविरोधात जाण्याचे धाडस मोजकेच लोक करतात.    पुण्यातील एका तरुणीने चौथर्‍यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. त्यावरून बराच गहजब झाला. पुरोगामी व्यक्ती व संघटनांनी त्या धाडसाचे कौतुक केले. परंतु चौथर्‍याचे शुद्धीकरण करण्याचा प्रतिगामीपणाही स्थानिकांनी व विश्‍वस्तांनी दाखवला. अर्थात दर्शन घेणार्‍या महिलेमध्ये ना श्रद्धेचा भाव होता ना विश्‍वस्तांमध्ये. केवळ अहंकार आणि वर्चस्व याचाच तो संघर्ष होता. त्यामुळे विश्‍वस्तपदी महिला निवडून आल्याने मोठे स्थित्यंतर घडेल अशी अपेक्षा बागळली जात आहे. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची संधी महिला विश्‍वस्तांना खरेच मिळेल का? महिलांना समानाधिकार मिळवून देण्यात त्या सफल होतील का? की निवडून दिल्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली अन्य विश्‍वस्तांना ‘मम’ म्हणण्यात धन्यता मानतील? महिला विश्‍वस्तांचा योग्य मान राखला जाईल. दर्शनोत्सुक भाविकांत स्त्री-पुरुष भेदभाव केला जाणार नाही, अशी हमी विश्‍वस्त मंडळी तरी देऊ शकेल का? अन्यथा महिला विश्‍वस्त या विश्‍वस्त मंडळावरील दिखाऊ बाहुल्याच ठरतील. जो प्रकार राजकारणात आहे तोच धार्मिक ठिकाणी होताना दिसणार आहे. आजच्या शनी अमावस्येला नेमके काय घडते आणि किती महिला चौथर्‍यावर येतात यावरून हे स्पष्ट होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: