सोमवार, १८ जानेवारी, २०१६
संमेलनाला कलंक
८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या साहित्यबाह्य वक्तव्यांनी उडालेला धुरळा संमेलनापूर्वी खाली बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी तो फारसा यशस्वी झाला नाही. आज समारोप झालेले हे साहित्य संमेलन श्रीपाल सबनीस नामक वाचाळ आणि फालतू माणसाने कलंक लावलेले संमेलन म्हणून महाराष्ट्राच्या लक्षात राहिल. पहिल्या दिवशीचे संमेलनाध्यक्षांचे भाषण महाराष्ट्राची दिशाभूल करणारे ठरले. हे भाषण पूर्ण करण्याची ताकदही संमेलनाध्यक्षांमध्ये नसल्यामुळे सबनीसांची लायकी संपूर्ण जगाला समजली. त्यामुळे इथून पुढे तरी चांगले लोक अध्यक्षपदासाठी निवडले जातील अशी अपेक्षा या संमलेनाच्या समारोपातून बाहेर पडताना प्रत्येक रसिक करत होता.
संमेलनापूर्वीच ओढवून घेतलेल्या अनाठायी वादाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सबनीसांनी आपली चूक कबूल करून सहानुभूती मिळवण्याची आवश्यकता होती. ही संधी साधण्यात त्यांना यश मिळाले नसल्यामुळे ते भांबावून गेले. व्यासपिठावरच खाण्यासाठी तोंड चालवले, पाणी पिण्यात वेळ घालवला. बहुदा खोटं बोलताना घशाला कोरड पडल्यामुळे ही उठाठेव करावी लागली.
शाहू-फुले-आंबेडकर या जयघोषात पुरोगामित्वाची झूल पांघरून बसलेल्या महाराष्ट्राचे अंतरंग किती भेसूर आहे, फुले शाहू आंबेडेकरांची नावे घेवून आपण किती खोटे बोलतो आणि असा वारसा सांगणार्यांच्या विचारात अंतरंगात किती खोटेपणा आहे याची कबूलीच या भाषणातून सबनीसांनी दिली होती. सबनीसांच्या भाषणापूर्वीच मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सत्य सांगून सबनीसांचे खोटे बोलण्यापूर्वीच उघड केले होते. जात, धर्म, आर्थिक विषमता आणि बेरोजगारीच्या घावांमुळे मर्हाटी संस्कृती’च्या चिरफळ्या उडत असल्याची वस्तुस्थिती खरे तर प्रत्येक जण जाणून आहे. परंतु त्याचा उघडपणे उच्चार करण्याचे धाडस क्वचित दाखवले जाते. सबनीसांचा हा बुरखा गळून पडला त्यामुळे त्यांच्या भाषणाचा कोणावरही परिणाम झाला नाही. ऐकून कोणाचे घ्यायचे? तर ज्याचे विचार चांगले आहेत त्याचे ऐकून घ्यायचे. शेवटी या अविचारी माणसाला काकुळतीला येवून माझे भाषणाची प्रत विकायला ठेवली आहे ती विकत घेवून वाचा असे सांगण्याची वेळ आली. जे भाषण कोणी फुकटही वाचणार नाहीत ते विकत कोण घेणार?
आपली रेष मोठी करण्यासाठी दुसर्याची रेष लहान करून उपयोग होत नसतो, हे भान सबनीसांना राहिले नाही. त्यामुळे भव्य दिव्य अशा साहित्य संमेलनाचे मातेरे झाले. ज्या उद्देशाने पी डी पाटील, डी वाय पाटील यांनी हे संमेलन भरवले त्याचा कोणताही उद्देश सफल झाला नाही. डी वाय पाटील यांचा व्यावसायिक उद्देश होता. आपल्या विद्यापिठाची जाहीरात होईल आणि भरपूर डोनेशन देवून विद्यार्थी इकडे वळतील. पण या विद्यापिठात जातीयवादी शक्ती कार्यरत आहेत असा संदेश गेल्यामुळे कारण नसताना चांगल्या विद्यापिठाला कलंक लावण्याचे काम सबनीसांनी केले.
इतिहासातले संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडून विद्वेष पसरवण्याचे काम सबनीसांनी केले. महाराष्ट्रातील जुन्या थोर लोकांना बदनाम करून आपण खूप शहाणे आहोत असा खटाटोप सबनीस आणि डी वाय पाटील दोघांच्याही अंगलट आला. मानदंडाचे राजकारण करून महापुरुषांची आणि संतांची वाटणी करण्याचे धंदे राजरोसपणे सुरू असतात. अस्मितांचे रूपांतर केव्हाच अहंकाराच्या ठसठसत्या गळूत झाले आहे, हे सांगताना सबनीसांच्या तोंडाला फेस आला. कारण त्यांच्याच तोडावर आलेले हे गळू अहंकाराच्या रूपाने ठसठसत होते. त्याची सल समोर बसलेला प्रेक्षक पहात होता.
संकुचितपणाच्या डबक्यात विभागला जाणारा महाराष्ट्र एकत्र येणार का, याची चिंता संमेलनाच्या व्यासपीठावरून सामूहिकपणे व्यक्त झाली, हा योगायोग नव्हता. पण हा संकुचितपणा साक्षात संमेलनाच्या अध्यक्षपदावर बसला आहे हे सगळ्या महाराष्ट्राने, जगाने पाहिले. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सबनीस आणि डॉ. सदानंद मोरे या सर्वांना ग्यानबा-तुकोबाचे दाखले द्यावेसे वाटले कारण सबनीस नावाचा ज्वलंत विद्वेश आणि विखार शेजारी मांडीला मांडी लावून बसला आहे. कमकुवत आणि दुष्ट विचार असलेल्या ज्या नराधमाची सावलीही अंगावर पडून घेवू नये असा दुष्ट माणूस शेजारी बसल्यावर सगळ्याच वक्त्यांना ज्ञानोबा तुकाराम आठवल्याशिवाय राहणार नाही. ही स्थिती हाताबाहेर गेली नसली तरी काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. अशा वेळीच अंजन घालणे आवश्यक असते. संमेलनाच्या व्यासपीठावरून सबनीसांचे कान उपटण्याचे काम शक्य तितके शरद पवार, सदानंद मोरे यांनी केले. मराठी संस्कृतीच्या मानदंडांच्या स्वतंत्र अस्मिता अधोरेखित करण्याऐवजी मानवी जीवनासंदर्भातील भौतिक आव्हाने पेलण्यासाठी काही निकष ठरवून हा प्रश्न विवेकाने सोडवता येईल का हा प्रश्न असताना केवळ जातीयवाद मांडून संमेलन दणाणून सोडणारे श्रीपाल सबनीस हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. एक जातीयवाद दुसर्या जातीयवादाला निर्दोष ठरवू शकत नाही. त्यामुळे सबनीसांची मते जर प्रामाणिक असतील तर त्यांनी स्वत: जातीयवाद सोडला पाहिजे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा