बुधवार, ६ जानेवारी, २०१६

पुन्हा पंजाब हे लक्ष

  गेले तीन दिवस पठाणकोटमध्ये पाकीस्तानी दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात धुमश्‍चक्री होत आहे. अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत. काही दहशतवाद्यांना कंठस्नान करून त्यांचा पाडावही करण्यात आला आहे. पण खरा प्रश्‍न आहे तो की हे दहशतवादी इतक्या आत आले कसे?

    पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्या वेळी असे वातावरण तयार झाले की, भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा सुरळीत होऊन पाकिस्तानही सुसंवाद साधण्यास उत्सुक आहे. शेजारील राष्ट्रांशी तणावाची परिस्थिती असेल तर तणाव निवळण्यासाठी मैत्रीचे संकेत दोन्ही राष्ट्रे दाखवत असतात. ते अत्यावश्यक असतेच. पण हे सगळे एकतर्फी होत आहे. भारत पाक संबंध सुधारावेत आणि दोन्ही देशात शांतता नांदावी हे दहशतवाद्यांना मान्य नाही की पाकीस्तानला मान्य नाही हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. यामागचे गूढ समोर येणे आवश्यक आहे.

   गेल्या २५ वर्षांत भारत-पाक संबंधांमध्ये केवळ दोन्ही देशांचे पंतप्रधान किंवा लष्करे महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत तर त्यामध्ये पाकस्थित दहशतवादी गट, त्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍या धार्मिक संघटना व काही पाश्चिमात्य राष्ट्रे दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे शरीफ-मोदी यांनी कितीही मैत्रीपूर्ण हस्तांदोलन केले तरी दहशतवादी हल्ले करण्याचे थांबतील अशा भ्रमात कोणी राहण्याचे कारण नाही.

   दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप बदलू शकत. त्याची ठिकाणे, लक्ष्ये बदलू शकतात. दहशतवादी हल्ल्यांची मॉडेल बदलू शकतात. पूर्वी मुंबई,दिल्ली ही शहरे टार्गेट असायची आता पठाणकोट किंवा कोणत्याही शहरात दहशतवादी घुसू लागले आहेत. रविवारी पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर केलेला दहशतवादी हल्ला हा नि:संशय भारत-पाक संबंधांमध्ये पुन्हा मोठी दरी व संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होता.

    या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत भारताचे सात जवान शहीद व २० जवान गंभीर जखमी झाले आहेत. असा हल्ला होणार याची पूर्वकल्पना असल्याने जवान सतर्क झाले होते. त्यांनी प्राणाची बाजी लावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जवानांचे शहीद होणे ही देशाच्या दृष्टीने सर्वात मोठी हानी असते. अशा घटनेमुळे लष्कराच्या मनोधैर्यावर परिणामही होत असतो. पण आपण फक्त प्रत्युत्तर देवून हल्ले परतवतो, तो पूर्णपणे रोखू शकत नाही. दहशतवादी घुसखोरी करण्यापूर्वीच त्यांना पकडले जात नाही ही फार मोठी कमतरता आपल्याकडे आहे.

     आजपर्यंत भारताच्या लष्करी तळांवर अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते. पाकिस्तानमधील रावळपिंडी किंवा कराची येथील लष्करी तळांवर तालिबानी दहशतवाद्यांकडून असे हल्ले याअगोदर झाले होते. त्यामुळे  पठाणकोटमधील हल्ला हा सुनियोजित राजकीय कट होता. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये टोकाच्या प्रतिक्रिया याव्यात अशीही योजना केली आहे. दहशतवादी गटांनी पंजाबला आता पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

   ८० च्या दशकात पाकिस्तानने स्वतंत्र खलिस्तान चळवळीच्या निमित्ताने खलिस्तान संघटनांना लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत मदत केली होती. त्यामुळे पंजाब अशांत झाला होता. पण नंतर पंजाबमधील खलिस्तान चळवळ नेस्तनाबूत केल्यानंतर दहशतवादी गटांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सरकारविरोधात युद्ध सुरू केले होते. ते गेली तीन दशके तसेच सुरू आहे. मात्र गेल्या २५ वर्षांत पंजाब हा शांत होता. पाकिस्तान सीमेलगत असलेली पंजाबची सीमा ही फार मोठीआहे. त्यात नद्या व शेतीमुळे पठाणकोट-गुरुदासपूर सीमाप्रदेश दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी उपयुक्त ठरत आहेत. सुरक्षा दलांना सुरक्षेच्या दृष्टीने हे फार कठीण ठरत आहे. पंजाबमधील अमली पदार्थांच्या तस्करीत काही दहशतवादी गटही उतरल्याने परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पंजाबला लागलेली ही जखम पाहून दहशतवादी या राज्यातून घुसू लागले आहेत.

   चार पाच महिन्यांच्या अंतराने पंजाबमध्ये हा हल्ला झालेला आहे. गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये अशीच घुसखोरी केली होती. त्या वेळी निष्पाप नागरिकांचे हत्याकांड व रेल्वे उडवण्याचे त्यांचे मनसुबे होते. आता भारताच्या लष्करी तळावर हल्ले करत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र अत्याधुनिक टेहळणी करणार्‍या साधनांमुळे व दहशतवाद्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना भारतीय सुरक्षा दलाला मिळाल्याने पठाणकोट हवाई तळाची मोठी हानी झाली नाही.  सरकारला या हल्ल्यातून बरेच काही शिकावे लागेल. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पंजाब लक्ष केलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: