कॉग्रेस नेते आणि युपीएचे माजी मंत्री मनिष तिवारी यांनी पुन्हा एकदा अक्कल पाजळली आहे. कारण नसताना मनिष तिवारी यांनी भारतीय सेनेच्या संदर्भातील केलेले विधान, त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याला विनाविलंब फ़ेटाळण्याची पाळी आलेली आहे. चार वर्षापुर्वी इंडियन एक्सप्रेस दैनिकात प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीने तेव्हा खळबळ उडवलेली होती. तेव्हाही तिवारी ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्याच सरकारने त्या बातमीचा इन्कार केलेला होता. कारण त्यातून त्याच सरकारची नाचक्की झाली होती. भारतीय सैन्याबद्दल आणि सैन्यदलाबद्दल शंका घेणे हे देशद्रोहाचे काम आहे. अराजकतेला निमंत्रण देणारे काम आहे. ते काम करण्याचे निरूद्योगीपणाचे उद्योग तिवारींसारखे कॉंग्रेसी नेते करत आहेत हे दुर्दैव आहे. दिर्घकाळ भारतात लोकशाही नांदली आहे. भारतीय सेनादलाने कधीही लोकशाही सरकारच्या सत्तेला आव्हान दिलेले नाही. असे असताना मंत्री व सरसेनानी यांच्यातील वादाला राजकीय रंग चढवण्याचा उद्योग आत्मघातकी होता. कॉंग्रेसच्या राजवटीत हे घडले होते. सिंग यांचा तो विषय कोर्टात सुनावणीला येणार होता. त्याच्या आदल्या रात्री हिस्सार येथील लष्कराच्या दोन चिलखती तुकड्या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या, अशी ही बातमी सोडून देण्यात आलेली होती. अर्थातच ती बातमी काही आठवड्यांनी प्रसिद्ध झाली. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नव्हते. तसेच काही करायचे तर बाहेरून दिल्लीत लष्कर आणायची गरज नव्हती. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी तेव्हा अनेक तुकड्या राजधानीतच हजर व तैनात होत्या. मग बाहेरून त्यासाठी रसद आणायचा मुर्खपणा कुठला सेनापती करील? ही अतिशयोक्ती ज्यांना सेनादलाची पद्धती वा कार्यशैली ठाऊक नसते,तोच करू शकतो. म्हणूनच त्या बातमीचा तेव्हाच सरकारने इन्कार केला. पण त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे त्यातून मग सिंग यांना राजकीय सत्ता काबीज करायला उत्सुक असलेला सेनापती, असे दाखवण्याचा राजकीय डाव उघडा झालेला होता. म्हणजे जी परिस्थितीत पाकीस्तानमध्ये सातत्याने होत राहिली आणि लोकशाही बुडवली गेली तोच प्रकार भारतात होत आहे असे कॉंग्रेसला दाखवायचे होते. त्यावेळी तो डाव फसला. पण त्याच विषयाला पुन्हा तोंड फोडून तिवारींनी रिकामटेकडेपणाचे उद्योग सुरू केले. हे भारतील लष्कराचे, लष्करात भरती होणार्या कुटुंबियांचे खच्चीकरण करण्याचे धोरण आहे. तिवारी एक मूर्ख आणि कारस्थानी नेते आहेत. त्यांच्याच सरकारने साफ़ नाकारलेली बातमी, ते आज पुन्हा कशाला उकरून काढत आहेत? त्या बातमीचा इन्कार झाला तरी नंतरच्या काळात सिंग यांच्या विरोधात अनेक कंड्या पिकवण्यात आल्या. त्याही पाकच्या हेरखात्याला कोलित म्हणून वापरता येण्यासारख्याच घातक होत्या, हे विसरता कामा नये. सिंग यांनी आपल्या कार्यकाळात काश्मिरच्या राजकारणात हस्तक्षेप करीत संरक्षण खात्याचा निधी खर्च केला व उचापती केल्याचा आरोप झाला होता. मग त्याचा गवगवा होऊन गोपनीय कामे करणारा एक विभाग बरखास्त करावा लागला होता. आजही आपण पाकिस्तानी माध्यमे वा विश्लेषक जिहादी घटनांनंतर बोलताना ऐकले, तर त्याचाच संदर्भ देतात. काश्मिरात भारतीय सेना राजकीय हस्तक्षेप करते आणि त्यावर संरक्षणाचा पैसा खर्च केला जातो, असा आरोप पाकिस्तान करत असतो. मग त्यासाठी जनरल सिंग यांच्या ‘टेक्निकल सपोर्ट डिव्हीजन’ या तुकडीचा संदर्भ दिला जातो. हे सगळे तिवारींसारख्या मूर्ख आणि बेअक्कल नेत्यांमुळे घडते. त्यामुळे पाकीस्तानला पोषक अशी वक्तव्ये करून देशविरोधी कारवाया करणारे मनिष तिवारी हे खर्या अर्थाने देशद्रोही आहेत. तिवारी ज्या बातमीचा उल्लेख करीत आहेत, ती वास्तवात भारतीय राजकारणी व माध्यमे यांनी देशाशीच केलेला विश्वासघात होता. नवीन वर्षात झालेल्या पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारतातल्या गद्दारांवर खापर फ़ोडले जात आहे. इथले कोणकोण पाकला फ़ितूर झाले याबद्दल चर्चा चालू आहे. पण तसेच फ़ितूर पाकिस्तानात भारतासाठी काम करीत होते. त्यांचा काटा काढला गेला नसता, तर पठाणकोटवर हल्ला होण्यापुर्वीच त्याची माहिती भारताला मिळू शकली असती. पण तशी माहिती मिळवणारी यंत्रणाच माध्यमांच्या मोहिमेने मोडीत काढायला लावली होती. थोडक्यात भारतासाठी पाकच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळवणारी यंत्रणा संपवण्याचे कारस्थान यशस्वी झाले आणि त्याची सुरूवात तिवारी म्ह्णतात त्या बातमीपासून झालेली होती. त्याची कल्पना कॉग्रेस पक्षाला असल्यानेच विनाविलंब आपल्याच नेत्याच्या विधानाचा इन्कार करण्यात आलेला आहे. पण कॉंग्रेसमध्ये देशद्रोही नेत्यांची फौज बसली आहे, ती देशाला घातक आहे हे निश्चित.
बुधवार, १३ जानेवारी, २०१६
देशद्रोही तिवारी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा