बुधवार, १३ जानेवारी, २०१६

पुरोगाम्यांची भोंदुगिरी

   केवळ प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणे याला पुरोगामी म्हणायचे का? असा प्रश्‍न पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पुरोगामी आणि प्रतिगामी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटना, पुरोहितवाद, ब्राह्मणशाही विरोधात बोलले की पुरोगामीत्व सिद्ध होते, असा समज तथाकथीत पुरोगामी लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. केवळ हिंदुत्व विरोध, ब्राह्मणी इतिहास, ब्राह्मणी परंपरा, हिंदु देवदेवतांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा याबाबत चुकीची माहिती पसरवून स्वत:ला पुरोगामी म्हणण्याचा नवा धंदा आजकाल झाला आहे. असे पुरोगामी स्वत:ला विचारवंत, थोर विचारवंत, ज्येष्ठ विचारवंत अशा स्वयंघोषित पदव्या घेत असतात. पण यांच्या विचारांची दिशा नेमकी काय असते हे त्यांचे त्यांनाही सांगता येत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉक्टर दाभोळकर यांनी कधीही सत्यनारायणाच्या पूजेला महत्व दिले नव्हते. डावे पक्ष, समाजवादी विचारांचे, पुरोगामी म्हणवणारे कधीही सत्यनारायणाच्या पुजेला जात नाहीत. किंबहुना सत्यनारायणाची पूजा ही कशी थोतांड आहे हे सांगण्याचा आटापिटा करतात. सत्यनारायणाच्या पूजेने कोणाचेच भले होत नाही, त्याने फक्त ब्राह्मणांची पोटं भरतात म्हणून हे डावे, समाजवादी सगळीकडे दिंडोरा पिटत असतात. सत्यनारायण कसा खोटा आहे, तो कोणीतरी काढलेला आहे वगैरे प्रबोधन करून त्यातील पोथीतील कथा किती भंपक आहेत याबाबत तर सातत्याने बोलले जाते. यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा पुढाकार होता. त्यांचे अनुयायीही त्यांच्या या विचारांचा वारसा जपत होते. पण जेव्हा डॉक्टर दाभोळकरांचेच वारसदार, अनुयायी आणि पुरोगामी विचारांचे लोकच सत्यनारायणाची पूजा घालतात आणि त्याला उपस्थिती ठेवून समाज प्रबोधन करतात तेव्हा त्यांच्या विचारातील विसंगतीबद्दल हसावे की रडावे असा प्रश्‍न पडतो. हे सांगण्या कारण असे की बालाजी नाका मित्रमंडळ अलिबाग आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ अलिबाग यांनी मकर संक्रांती निमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजीत केलेली आहे. या पूजेनिमित्त अंधश्रध्दा निर्मूलन व जागर वैज्ञानिक दृष्टीकोनाचा या विषयावर पथनाट्य स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माननीय मुक्ता दाभोळकर उपस्थित राहणार असून त्या अंधश्रद्धा निर्मूलनावर व्याख्यान यावेळी देणार आहेत.    मला वाटते आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी या कार्यक्रमाचा उल्लेख गेल्या दहा हजार वर्षात महाराष्ट्रात एवढा मोठा विनोद झाला नाही असाच केला असता. अंनिसचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहणार आणि वडिलांच्या विचारांचा वारसा किती महान आहे हे सांगणार. सत्यनाराण पूजेबाबत डॉक्टर दाभोळकरांची नेमकी काय मते होती हे मुक्ताताईंना माहित नाहीत की काय? की संयोजक कोण आहेत यांची माहिती नसल्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे चुकभूल देणे घेणे आहे?   कार्यक्रमाचे आयोजक हे अलिबागेतील प्रशांत नाईक मित्र मंडळ आहेत. अलिबाग म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. प्रशांत नाईक हे शेकापचे मोठे कार्यकर्ते आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगाम्यांचा, डाव्या विचारांचा पक्ष आहे. या पक्षाचे डॉ. एन डी पाटील, कै. दि. बा. पाटील हे मोठे नेते होते. त्यांनी खासदारकीच्या काळात आपली चुणूक दाखवून दिलेली आहे. पुरोगामी म्हणून संपूर्ण देश या नेत्यांकडे पाहतो. कै. दि. बा. पाटील यांनी आयुष्यात कधीही सत्यनारायणाच्या पूजेला मानलेले नाही. कोणा कार्यकर्त्याने, ओळखीच्या व्यक्तिने त्याच्या घरी आयोजित केलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला दिबांना आमंत्रित केले तरीही ते कधी जात नसत. सत्यनारायणाचा प्रसादही खायचे नाहीत. इतका तिरस्कार त्यांना सत्यनारायणाच्या पूजेचा होता. असे असताना त्यांच्याच पक्षाचा विचार आता पुरोगामी आहे काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ शेतकरी कामगार पक्षाचे नेते बोलावतात म्हणून मुक्ता दाभोळकर यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले असेल तर किमान कार्यक्रम काय आहे याचा तरी त्यांनी विचार करायला हवा होता. बॅनरवर आपला फोटो लागतो आणि सत्यनारायणाच्या पूजेला आपण व्याख्यान देण्यासाठी जातो यात पुरोगामीपणा सिद्ध होईल काय? डाव्या पक्षांनी, समाजवाद्यांनी सोयीसाठी आपले नियम बनवले आहेत काय? डॉक्टर दाभोळकर असे नव्हते. ते विचारांचे पक्के होते. कोणाच्या भावना त्यांनी कधी दुखावल्या नाहीत पण ते कधी सत्यनारायणाच्या पूजेला गेले नाहीत. म्हणजे फक्त हिंदुत्ववाद्यांवर, पुरोहीत, भटा- ब्राह्मणांवर टिका करण्यापुरते पुरोगामीत्व आता शिल्लक राहिले आहे काय? असे असेल तर डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांची हत्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केली असे म्हणावे लागेल. दाभोळकरांचे मारेकरी तीन वर्ष झाली तरी सापडत का नाहीत याचे कारण इथेच कुठेतरी असू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: