साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यावर बेताल वक्तव्ये केलीच पाहिजेत असा समज गेल्या काही वर्षांपासून काहींनी करून घेतला असावा. त्याच रोगाची लागण पिंपरी चिंचवडच्या संमेलाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना झाली असावी. त्यामुळे साहित्यावर भाष्य न करता राजकारणावर आणि सवंग लोकप्रियतेसाठी नरेंद्र मोदींवर टिका करण्याचा आचरटपणा त्यांनी केला असावा. सबनीस म्हणतात की, संघाची पार्श्वभूमी असलेले पंतप्रधान मोदी काबूलवरून अचानक पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून गेले नव्हते, तर राष्ट्रहितासाठी त्यांनी तो निर्णय घेतला, मात्र याच मोदींची पंतप्रधानपदाआधीची गोध्रा हत्याकांड काळातील मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द कलंकित आहे. काय गरज पडली होती सबनीसांना हे वक्तव्य करण्याची?नरेंद्र मोदींवर टिका केल्यावर आपल्यावर चौफेर टिका होईल किंवा तथाकथीत पुरोगामी आपल्या पाठीशी उभे राहतील असे सबनीसांना वाटते काय? आपल्या लेखनातून ते लोकप्रिय झाले असते तर कौतुक वाटले असते पण बाष्पळ बडबडण्यामुळे ते प्रसिद्धीत आले हे दुर्दैव म्हणावे लागेल. सबनीस म्हणतात की, पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदी गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अमेरिका-चीनशी मैत्री करीत आहेत. शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी तळहातावर शीर घेऊन पाकमध्ये गेले. सबनीस यांचे हे वक्तव्य मोदींच्या काळजीपोटी नाही हे निश्चितच. केवळ टिका करण्यासाठी उपहासात्मक बोलून आपले अस्तित्व दाखवण्याचा श्रीपाल सबनीस यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही असली शेरेबाजी करण्यापेक्षा साहित्यावर काही बोलले असते तर सबनीसांचे कौतुक केले असते. पण सबनीसांकडे कदाचित स्वत:चे कर्तृत्व दाखवण्याइतकी क्षमता नसावी म्हणून अशी उथळ वक्तव्ये त्यांनी केली असावीत. सबनीस म्हणतात की, दहशतवाद्यांकडून त्यांच्या जिवास धोका होता, त्यांना कोणाचीही गोळी लागू शकली असती. तसे झाले असते तर एका दिवसात ते संपले असते आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच नरेंद्र मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती. पण सबनीसांची अक्कल याठिकाणी कमी पडली असेच म्हणावे लागेल. कारण आपल्याकडे म्हण आहे की चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या देणे. म्हणजे चोरच त्या तिजोरीचे रक्षण करेल. गेल्या काही दिवसांपासून मोदींना धोका आहे. लष्करे तोयबाचे मोदी टार्गेट आहेत अशा बातम्या येत होत्या. त्या सगळ्या दहशतवादी संघटना या पाकीस्तानशी संबंधीत आहेत. पाकीस्तानातच मोदी गेल्यावर चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्यावर तिजोरीचे रक्षण केले जाते त्याप्रमाणे मोदींच्या संरक्षणाची जबाबदारी आपोआप पाकीस्तानकडे आली होती. त्यामुळे मोदींच्या जिवाला कसलाही धोका असण्याची शक्यता नव्हती. मोदी हे काही वाट्टेल ते करणारे नाहीत. पण हे समजण्याइतकी अक्कल श्रीपाल सबनीसांना असेल तर ना? आपण काहीतरी चुकीचे बोललो आहे याची जाणिव बोलून झाल्यावर श्रीपाल सबनीसांना झाली असावी. म्हणूनच नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर पाकिस्तानच्या दौर्याचा उल्लेख करत सबनीसांनी तेथील धोक्याची कल्पना दिली. जीवाला एवढा धोका असतानाही मोदी तेथे गेले. मोदी एवढे समर्पण करणारी व्यक्ती असून त्यांचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद केला पाहिजे, असे सबनीस म्हणाले. संघर्षाच्या जागांचा अपवाद करून आता संवादाकडे वळले पाहिजे, त्याचाच भाग म्हणून गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना आपल्याकडे कार्यक्रम करू द्यायला हवे’ असेही त्यांनी सांगितले. मुळात सबनीसांना समजले पाहिजे की गुलाम अलींच्या कार्यक्रमाला भाजपचा कधीच विरोध नव्हता. अशा कार्यक्रमाला विरोध करणारे शिवसेनेचे नेते होते. भाजप नेत्यांनी मुंबईतही पाकीस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे कसलाही अभ्यास न करता वायफळ वक्तव्ये करणारे श्रीपाल सबनीस हे साहित्य संमेलनापूर्वीच नापास अध्यक्ष ठरले आहेत. आपल्याकडे अनेक दिग्गज साहित्यिकांनी राजकारण्यांवर टिका केली आहे. पण ती अभ्यासपूर्ण केली आहे, सबनीसांसारखी उथळ टिका केलेली नाही. पिंपरी चिंचवड हे अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्या शहरात होणारे अध्यक्षही असेच आगंतुक असल्यासारखे वाटतात का?
रविवार, ३ जानेवारी, २०१६
उथळ साहित्यिकाचे आगंतुक वक्तव्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा