बुधवार, ६ जानेवारी, २०१६

मगरीचे अश्रू


  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना बंदूकींवर नियंत्रण आणण्याचे समर्थन करताना रडू कोसळले. देशात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये दरवर्षी कित्येक लोकांचा जीव गेला, हे सांगतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भावूक झाले. त्यांनी बंदूकींवर नियंत्रण आणण्याच्या प्रस्तावावर जोर दिला. ज्या अमेरिकेने शस्त्रास्त्र उद्योगाला सातत्याने प्रोत्साहन दिले, शस्त्रास्त्र खरेदीवर आपली अर्थव्यवस्था मजबूत करून जागतीक अशांतता माजवली त्या अमेरिकेला झालेली ही उपरती म्हणजे भस्मासूराच्या भीतीने बिळात लपण्याचा प्रकार आहे.
    ओबामा मंगळवारी रात्री व्हाइट हाऊसमध्ये गन कंट्रोल पॉलिसीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वी कनेक्टिकटच्या न्यू टाऊन मधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात २० मुले ठार झाल्याचा उल्लेख केला. यावेळी ओबामा भावूक झाले. ते म्हणाले, ’मी जेव्हा त्या मुलांबद्दल विचार करतो तेव्हा वेड लागायची वेळ येते. आम्हाला सगळ्यांना अमेरिकन कॉंग्रेसकडे मागणी करावी लागले की गन लॉबीच्या खोटारडेपणाचा जोरदार विरोध झाला पाहिजे.’
    माणूस सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी म्हणून पिस्तूल, बंदूकीचा, शस्त्रास्त्रांचा परवाना घेतो. पण नकळत त्यामुळे आपल्यातील हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देत राहतो. म्हणजे एकदा का पिस्तूलचा परवाना मिळाला की त्या पिस्तूलचा वापर आपल्याला कधी करता येणार याचे वेध त्याला लागतात. ही पिस्तूल आपण घेतली आहे, पण त्याचा वापर कधी केला जाणार? कोणावर केला जाणार? त्याचा धाक बाकीच्यांना कसा वाटणार? या विचारांनी त्याच्या मनात त्या पिस्तुलीचा वापर करण्याची इच्छा अनावर होत राहते. त्यामुळे अशा शस्त्रांचे परवाने हे हिंसाचाराला प्रोत्साहन देत असतात. अमेरिकेत प्रत्येकाकडे शस्त्रे, पिस्तूल असल्यामुळे हा हिंसाचार वाढवण्याचे काम अमेरिकेने सातत्याने केलेले आहे.
     ओबामांनी शस्त्र परवाना प्रक्रिया कडक करण्याच्या उपाययोजनांची घोषणा केली. त्यात बंदूक विक्रेत्याकडे परवाना असणे गरजेचे करण्याबरोबरच ज्यांना शस्त्र विक्री होत आहे त्याची पार्श्वभूमी तपासणेही महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. पण हे सगळे घडले आहे ते भितीपोटी घडले आहे. भारताची अर्थव्यवस्था जशी कृषीप्रधान आहे तशीच अमेरिकेची अर्थव्यवस्था ही शस्त्र निर्मिती प्रधान आहे. त्यामुळे हा उद्योग वाढीस लावण्यासाठी हिंसाचाराला प्रोत्साहन देणे हेच काम अमेरिकेने केले.
    गेल्या शंभर दीडशे वर्षात अमेरिका मोठी झाली. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका महासत्ता झाली. यामागचे खरे कारण म्हणजे अमेरीकेच्या भूमिवर कोणतेही युद्ध आजवर झालेले नाही. जगातल्या बहुतेक राष्ट्रांनी युद्धाला तोंड दिलेले आहे. युद्धामुळे बेचिराख होण्यापासून ते आर्थिक नुकसानी सहन करण्यापर्यंत त्रास सहन केलेला आहे. पण अमेरिकेने मात्र दुसर्‍यांच्या भूमितच जावून युद्ध केली आहेत. सर्वनाश केला आहे. अमेरिकेला नुकसानीची खरी झळ बसली ती ओसामा बिन लादेनमुळे. ९/११ चा २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पॅटागॉनवर झालेला हल्ला हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका देणारा होता. परंतु तोपर्यंत अमेरिका ही दहशतवाद आणि युद्धांना प्रेरणा देतच राहिली होती. कारण आशियाई देशात, आखातात चालणारी धुसफूस ही अमेरिकेच्या जोरावर चालली आहे. या धुसफुसीमुळे अमेरिकेची शस्त्रास्त्र इंडस्त्री कायम तेजीत येते.
२००८ ला जानेवारीमध्ये अमेरिकेत जागतीक महामंदी आली होती. त्या महामंदीतून सावरण्यासाठी अमेरिकेला फार मोठे युद्ध कुठेतरी व्हायला हवे होते. किमान युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे हवे होते. त्याप्रमाणे अमेरिकेने घडवून आणले. म्हणजे भारतावर झालेला २६/११ चा हल्ला हा अमेरिकेच्या फायद्याचा ठरला. मंदीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेला उपयुक्त ठरला. कारण त्यामुळे भारत पाक संबंध आणखी तणावाचे होतील. दोन्ही देश सीमेवर शस्त्रास्त्रे घेवून जमा होतील. हे अमेरिकेच्या फायद्याचे होते. २६/११ चा हल्ला पाक पुरस्कृत असला तरी त्याला मुकसंमती ही अमेरिकेची असणारच होती. त्यामुळे अमेरिकेसारखा देश चालवायचा तर ही शस्त्रास्त्र इंडस्ट्री चालली पाहिजे हे अमेरिकेचे धोरण आहे. साहजिकच ओबामांच्या डोळ्यातील अश्रू हे खरे किती आणि खोटे किती हा प्रश्‍न आहे. अमेरिकेला फटका बसला म्हणून ओबामांना रडू आले. पण तसे पाहता हे अश्रू मगरीचेच अश्रू आहेत.
ओबामा म्हणाले की, गन लॉबी सरकारच्या कारवाईत अडचणी आणू शकते. अमेरिकन कॉंग्रेसवर दबाव टाकू शकते पण नियंत्रण आणू शकत नाही.
ओबामा म्हणाले, आम्ही बंदूकींवर नियंत्रण आणण्याचे पूर्णपणे समर्थन करतो, मात्र संसदेत बहुमत नसल्याने कायदा करण्यात अडचणी येत आहेत.हे सगळे नाटक आहे. बंदुकीच्या जोरावरच जगावर सत्ता गाजवता येते हे अमेरिकेचे धोरण आहे.
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: