शनिवार, २० जून, २०२६

रिप्लेसमेंट


ती अतिशय हुशार होती. बुद्धिमान आणि सुंदरही होती. पण सगळे असूनही नियतीची इच्छा काय असते हे कोणीच सांगू शकत नाही. उत्तम अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. अभिनय, गायन सगळ्यात ती तरबेज होती. पण नशिबाने वेगळीच भूमिका तिच्या पदरात टाकली होती.


रंगभूमीवर आपण पदार्पण करून रसिकांची मने जिंकायची हेच तिचे ध्येय होते. त्यादृष्टीने तिने संघर्ष सुरू केला. अनेक निर्माते, दिग्दर्शकांकडे आॅडिशन्स दिल्या. अनेक जणांनी तिचे कौतुकही केले, पण तुला देण्यासाठी सध्या आमच्याकडे रोल नाही असे सांगून, पुढच्या वेळी मुख्य भूमिकेत तू असशील असे आश्वासनही दिले होते. पण इथेच नशीब फसले. तू म्हणजे कोण?

काम नसल्यामुळे फक्त नाटके पाहणे आणि इतरांच्या भूमिका बघणे हे सध्या चालू होते. नाटकाच्या संहिता वाचायच्या आणि त्यात स्वत:ला कुठेतरी शोधायचे. संगीत रंगभूमी, गद्य नाटके, फार्सिकल, रहस्यमय अशा कोणत्याही भूमिकेसाठी तीची तयारी होती, पण नशीब साथ देत नव्हते.


पण एके दिवशी अचानक एक निर्माते आणि दिग्दर्शक तिच्याकडे आले आणि एका जुन्या नाटकात मुख्य भूमिका करण्याची आॅफर दिली. साहजिकच ती आॅफर तिने स्वीकारली. चार दिवसात प्रयोग होता. दिवसरात्र मेहनत करून भूमिका करावी लागेल असे निर्मात्यांनी बजावले होते. नाटकाचे थिएटर बुक झाले होते, तिकीटविक्रीही झाली होती. पण मुळातच कर्तबगार असलेल्या तिने ते आव्हान स्वीकारले आणि प्रयोगादिवशी ती नाट्यगृहात वेळेत पोहोचली. बाहेर मोठा बॅनर लागलेला होता. तो पाहूनच ती भारावून गेली. आपल्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाचा बॅनर. तिने अत्यंत जवळून नामावली पाहिली आणि त्यात तिचे नावच नव्हते. दिग्दर्शक आणि निर्माते तिला आत घेऊन गेले. त्यांनी सांगितले की, हा रोल अगोदर मधुवंती दांडेकर करत होत्या. त्यांना वेळ नसल्याने त्या प्रयोगाला उभ्या राहू शकणार नव्हत्या. म्हणून ‘एकच प्याला’तील सिंधू तुम्हाला करायची आहे. बॅनर, जाहिरात आधी तयार होती, त्यामुळे तुमचे नाव इथे नाही. पण आता इथून पुढे तुम्हाला भरपूर प्रयोग करावे लागतील.

तिला पटले. त्या दिवशीचा प्रयोग अत्यंत उत्तम झाला. आपली ओळख निर्माण करण्यासाठी तिने ‘कशी या त्यजू पदाला’ हे पद इतके उत्तम सादर केले की प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला. आपण जिंकलो याचे समाधान तिला वाटले. निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकार सगळे खूश झाले. प्रयोगानंतर काही प्रेक्षकांनी गर्दी केली. अनेकांनी सहीसाठी वही पुढे केली. तेवढ्यात दिग्दर्शक कानात कुजबुजला, मधुवंती दांडेकर अशी सही करा. तुमचे नाव आपण सांगितले नाही. तिने सहजपणे मधुवंती दांडेकर अशा सह्या चाहत्यांना दिल्या.


नंतर परतताना ती म्हणाली, आपण प्रेक्षकांना फसवले असे नाही का वाटत? तसा दिग्दर्शक म्हणाला, इथे सगळेच खोटे. नाटक हेच मुळात खोटे. त्यामुळे काही वाईट नाही. त्यात तुम्ही रिप्लेसमेंट आहात. रिप्लेसमेंटला आपली ओळख नसते, ज्याची रिप्लेस आहे त्याचेच नाव त्याचे.

तिला प्रचंड धक्का बसला. पण हेच तिचे प्राक्तन होते. त्यानंतर तिला सातत्याने फक्त रिप्लेसमेंटच्याच भूमिका मिळू लागल्या. कधी मधुवंती दांडेकर, कधी कान्होपात्रा, कधी सुहास जोशी, तर कधी रिमा लागू. अनेक दिग्गज अभिनेत्रींसाठी तिने रिप्लेसमेंट म्हणून भूमिका केल्या. प्रयोग यशस्वी होत असत. कधी प्रेक्षक अरे आपण रिमा लागूंना पाहायला आलो होतो, पण हिनेही चांगले केले काम असे म्हणत. कधी प्रेक्षकांना कलाकार बदलला आहे हे पण समजायचे नाही. प्रयोगावर प्रयोग चालले होते. नवनवीन नाटकांमध्ये ती गुंतत होती. पद्मा चव्हाणला वेळ नव्हता म्हणून ‘लग्नाच्या बेडी’तील रश्मीची भूमिका तिने केली. ज्योती चांदेकरांच्या चित्रपटाचे शूटिंग होते म्हणून डॉक्टर लागूंबरोबर ‘अग्निपंख’ केले. सगळी आघाडीची नाटके सतत करता करता ती रिप्लेसमेंटची सुपरस्टार म्हणून इंडस्ट्रीत ओळखू लागली. प्रयोगावर प्रयोग, दररोज प्रयोग होत होते. अन् अचानक एके दिवशी तो पुण्यातला प्रयोग तुफान यशस्वी झाला. नाटक संपल्यावर मी तिला भेटायला गेले. मला तिचा अभिनय खूप आवडला होता म्हणून मी म्हणाले, मॅडम, हे नाटक मला खूप आवडते. मी ते खूप वेळा पाहिले आहे. पण आजची भूमिका आजवरची सर्वोत्कृष्ठ होती. हे ऐकून ती खशा होत होती. तेवढ्यात मी तिला सहज प्रश्न केला, पण मॅडम कदाचित रिमा लागूंपेक्षाही तुम्ही हा रोल चांगला केला आहे. पण तुम्ही रिमा नाही. तुमचं नाव काय? असं विचारताच ती एकदम हिस्टेरिक झाली.


ं तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? होय, कोण आहे मी? मी आहे फक्त एक रिप्लेसमेंट. मला माझं नाव नाही. माझं अस्तित्वच नाही. मी आहे फक्त एक रिप्लेसमेंट. कधी मधुवंती दांडेकर, कधी कान्होपात्रा, कधी नयना आपटे, कधी सुहास जोशी तर कधी रिमा लागू. मीच पद्मा चव्हाण, मीच ज्योती चांदेकर, मीच शांता जोग. सगळीकडे तर मीच आहे... पण मला सांगायला नाव नाही. तुमचे नाव काय? तुमचे नाव काय? होय कोण आहे मी? या सगळ्यांची रिप्लेसमेंट करता करता मी माझंच नाव विसरून गेले. नाटकाची मिळणारी नाईट आणि त्याच्या पाकिटातून येणाºया नोटांकडे पाहता पाहता माझे नावच मी विसरून गेले. मला कोणी सांगेल का मी कोण आहे? मी कोण आहे? काय आहे माझे नाव?

तुझे नाव माधुरी आहे का? नाही हो.../ तू सिंधू आहेस का? होय हो, पण ती फक्त नाटकातली. तू रश्मी आहेस का? हो ती पण नाटकातलीच. रिमा, सुहास, कोण कोण आहेस तू नक्की?


ओह माय गॉड..... आयुष्यभर फक्त रिप्लेसमेंटचाच खेळ करत आले. इतका हा खेळ खेळला की माझी ओळखच हरवून गेली. मी कोण आहे हे पण मी विसरून गेले आहे. विसरून गेले आहे.

तिचे नाव मला माहिती नाही. सुरुवातीलाच ती हुषार, बुद्धिमान, सुंदर होती हे मी तुम्हाला सांगितले. पण तुमच्यापैकी कोणी तिचे नाटक पाहिले असेल तर तिचे खरे नाव कुणीतरी सांगा. आज ती मनोरुग्ण अवस्थेत मी कोण आहे? मी कोण आहे? माझे नाव काय? म्हणून स्वत:ला शोधतीय. तिचा शोध पूर्ण करायला मला मदत करा. प्लीज मदत करा. कोण आहे ती? कोण आहे ती? तिचे नाव काय?


प्रफुल्ल फडके/रविवारची कथा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: