अलीकडील पश्चिम आशिया संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने आणि विचारपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले. जिथे वैयक्तिक वाहनांची गरज आहे, तिथे सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगचा वापर करण्याचे त्यांनी विशेष आवाहन केले. त्यांनी परकीय चलन वाचवण्याच्या गरजेवर भर दिला.
पंतप्रधानांच्या आवाहनाचा जनतेवर कितपत परिणाम झाला हे काळच ठरवेल, पण भारतीय रेल्वे आपल्या विद्युतीकरण मोहिमेद्वारे डिझेलची बचत करत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाद्वारे १.८५ अब्ज किलोलिटर डिझेलची बचत केली. ही रक्कम देशाच्या चार दिवसांच्या एकूण डिझेलच्या मागणीइतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन (ट्रेनची चाके ओढण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा) केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर डिझेल ट्रॅक्शनपेक्षा ७० टक्के अधिक किफायतशीर देखील आहे.
विशेष म्हणजे २०१४ पूर्वी देशात केवळ २१,८०१ किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते. हे लक्षात घेऊन पंतप्रधान झाल्यावर मोदींनी रेल्वे विद्युतीकरणाला प्राधान्य दिले. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानुसार रेल्वे विद्युतीकरण मिशन सुरू करण्यात आले. संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे १०० टक्के विद्युतीकरण साध्य करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
डिझेल इंजिनमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने हे मिशन तयार केले आहे. डिझेल इंजिनांची कार्यक्षमता खूप कमी असते आणि ती चालवण्यासाठी खूप खर्चिक असतात. मार्च २०२६ पर्यंत रेल्वेच्या एकूण ७०,१७५ किलोमीटर ब्रॉडगेज नेटवर्कपैकी ६९,९०६ किलोमीटरचे विद्युतीकरण झाले आहे. याचा अर्थ एकूण ब्रॉडगेज नेटवर्कपैकी ९९.६ टक्के भागाचे विद्युतीकरण झाले आहे. ही भारतीय रेल्वेची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. भारताला विकासाचा मार्ग भारतीय रेल्वे दाखवत आहे हे या आकडेवारीवरून दिसते.
आता केवळ २६९ किलोमीटर रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. ज्या राज्यांमध्ये रेल्वे विद्युतीकरण अद्याप बाकी आहे, त्यांमध्ये गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम आणि राजस्थान यांचा समावेश आहे. गोव्यात ९१ टक्के, तामिळनाडूमध्ये ९७ टक्के, कर्नाटकमध्ये ९७ टक्के, आसाममध्ये ९८ टक्के आणि राजस्थानमध्ये ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. २०१४ पूर्वी देशात दररोज सरासरी १.४२ किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होत होते. रेल्वे विद्युतीकरण अभियानाच्या शुभारंभापासून, २०१९-२०२५ दरम्यान दररोज सरासरी १५ किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले. २०२३-२४ मध्ये रेल्वे विद्युतीकरणाचा एक विक्रम साधण्यात आला, ज्यामध्ये दररोज सरासरी १९.७ किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले. हे परिवर्तन भारतीय रेल्वेला अधिक वेगवान, स्वच्छ आणि आत्मनिर्भर बनवत आहे, ज्यामुळे नव्या भारताच्या विकासाचा कणा अधिक मजबूत होत आहे. हा खरा विकासाचा वेग म्हणावा लागेल.
अर्थात हे स्पष्ट आहे की, १९२५ मध्ये बॉम्बे व्हीटी (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि कुर्ला दरम्यान हार्बर लाईनवर पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावल्यानंतर १०० वर्षांनी भारतीय रेल्वेने १००% विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. भारताने रेल्वे विद्युतीकरणात अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे. भारतात ९६.६% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असताना, ब्रिटनमध्ये केवळ ३९%, रशियामध्ये ५२% आणि चीनमध्ये ८२% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
रेल्वे विद्युतीकरणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे स्वच्छ ऊर्जा स्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत रेल्वे आपल्या एकूण कामकाजासाठी ८९८ मेगावॅट सौर ऊर्जेचा वापर करत होती. २०१४ मध्ये रेल्वेने केवळ ३.६८ मेगावॅट सौर ऊर्जेचा वापर केला होता. या ८९८ मेगावॅटपैकी ६२९ मेगावॅट ऊर्जा गाड्या चालवण्यासाठी वापरली गेली, तर २६९ मेगावॅट ऊर्जा इतर गरजांसाठी वापरली गेली. यामध्ये स्थानक प्रकाशयोजना, कार्यशाळा, सेवा इमारती आणि रेल्वे निवासस्थाने यांचा समावेश आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या २,६२६ रेल्वे स्थानके सौर ऊर्जेचा वापर करत आहेत. अशा उपाययोजना २०३० पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेची पुष्टी करतात. हायड्रोजन ऊर्जा अभियानांतर्गत भारताने २०३० पर्यंत दरवर्षी ५ दशलक्ष टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे आणि २०७० पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यात भारतीय रेल्वेचे योगदान मोठे असणार आहे.
हरित ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणत, रेल्वेने हरियाणातील कपूरथला-सोनीपत मार्गावर देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाºया १० डब्यांच्या ट्रेनला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट होईल. रेल्वे आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणत आहे. सध्या रेल्वेने आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ४,२६० मेगावॅट सौर आणि ३,४२७ मेगावॅट पवन ऊर्जेसाठी करार केले आहेत. याव्यतिरिक्त रेल्वेने १,५०० मेगावॅट नवीकरणीय ऊर्जेसाठी करार केले आहेत.
रेवा अल्ट्रा मेगा सोलर पॉवर लिमिटेड आपल्या सौर पार्कमधून भारतीय रेल्वेला सौर ऊर्जा पुरवत आहे. याव्यतिरिक्त २०२५-२६ मध्ये रेल्वेने ८१.५९ लाख झाडे लावली, १८५ जल पुनर्वापर प्रकल्प उभारले आणि ८,३१३ पर्जन्यजल संचयन संरचना स्थापित केल्या. अशाप्रकारे भारतीय रेल्वे पर्यावरण संरक्षणात एक मूक क्रांती घडवून आणत आहे. ही बाब खूपच सुखावह म्हणावी लागेल. एकूणच भारताच्या विकासात भारतीय रेल्वे फार मोठे योगदान देत घोडदौड करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा