रविवार, ८ एप्रिल, २०१८

शिवसेनेने केली सुरगाठीची नीरगाठ

भाजपच्या महामेळाव्यात शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शिवसेना पार फुलून गेली. आपले महत्त्व राज्यात खूप आहे असे समजून शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, संजय राऊत असे अनेकजण अगदी मनोमन खूष झाले. आता भाजपने आपल्यापुढे गुडघेच टेकले असा समज करून घेतला. आता शरण आलेल्या या भाजपला आपण चांगलेच वठणीवर आणले पाहिजे असेही अनेकांना वाटू लागले. त्यामुळे या गोंजारण्यानंतर शिवसेनेचे नेते, उपनेते, रथी महारथी, सारथी सगळे बोलू लागले. नको नको, आता स्वबळावरच लढू असे बोलून भाजपला झिडकारून लावले. इथेच हे नेते आणि शिवसेना पूर्णपणे फसली.भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गोंजारून आपले मोठे मन दाखवले आणि शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया देऊन आपल्या मनाचा संकुचितपणा दाखवून दिला. हाच तर भाजपचा सापळा होता. भाजपला कशाला शिवसेनेची साथ हवी होती? आज भाजपला शिवसेनेची बिलकूल साथ नको आहे. कारण हा पक्ष इतका वाढला आहे की त्यांच्यातील इच्छुकांची संख्याही खूप वाढली आहे. आज राज्यातील प्रत्येक मतदारसंघात उभे करता येतील इतके उमेदवार त्यांच्याकडे आहेत. २०१४ ला निम्म्या जागा मागून भाजपने शिवसेनेपुढे मान वाकवली होती. पण शिवसेनेतील बोलबचन नेत्यांमुळे आणि त्यांच्या तालावर नाचणा-या उद्धव ठाकरे यांनी ११६ च्या पुढे जागा देण्यास मनाई केली. त्याचा परिणाम काय झाला? भाजपने १२३ पर्यंत मजल मारली. जी आजपर्यंत एकटय़ा शिवसेनेला कधीही मारता आलेली नव्हती. शिवसेनेला आजवर इतक्या जागा लढवून तीन अंकी संख्या पार करता आलेली नाही. ती एकटय़ा भाजपने स्वबळावर मिळवली. त्यामुळे आज त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले असताना त्यांना शिवसेनेच्या मदतीची काडीमात्र गरज नाही. फक्त आघाडीत असल्यामुळे सौजन्याने त्यांनी आघाडी टिकवण्याचे आवाहन केले. त्याला सेनेने दिलेला प्रतिसाद हे अपरिपक्व राजकारणाचे द्योतक म्हणावे लागेल. भाजप आपले संख्याबळ सहज टिकवेल. पण आता शिवसेनेला भाजपशिवाय जनतेचा कौल मिळणे शक्य आहे का? तर बिलकूल शक्य नाही हेच लक्षात घ्यावे लागेल.२०१४ ला लोकसभेला शिवसेना ही भाजपबरोबर होती. एकत्रित निवडणुका त्यांनी लढवल्या. पण विधानसभेला त्यांची युती नव्हती. शिवसेनेने भाजपला असेच झिडकारून लावले होते. भाजपमुळे शिवसेनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाले होते. शिवसेनेचे इतके खासदार लोकसभेत गेले ते मोदी लाटेमुळे गेले. कारण मतदारांनी तेव्हा मोदींना मतदान केले होते. शिवसेनेला बिलकूल केलेले नव्हते. त्याबाबत ग्रामीण भागातील बातम्याही आल्या होत्या. एका वृद्ध महिलेने मतदान केंद्रावर जाऊन कमळ कुठे आहे, मला मोदींना मतदान करायचे आहे असे सांगितले होते. त्या मतदारसंघात भाजपचा नाही तर शिवसेनेचा उमेदवार होता. त्यामुळे मतदान यंत्रावर कमळाचे चित्र नव्हते. तेव्हा त्या महिलेची समजूत काढल्यानंतर शिवसेना म्हणजेच भाजप, म्हणजेच मोदींना मत दिले जाणार हे स्पष्ट केले. त्या महिलेला पटल्यानंतर तिने शिवसेनेला मतदान केले. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या. अशा लाटेत शिवसेनेला जागा मिळाल्या. आता स्वतंत्र लढल्यानंतर लोक भाजपला मतदान करतील की शिवसेनेला? म्हणजे हे गोंजारणे झिडकारून देऊन शिवसेनेने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. दुसरीकडे भाजपचे महत्त्व वाढले. त्यांनी दाखवलेला मोठेपणा लोकांच्या मनात ठसला.त्यामुळे भाजपचे वजन आणखी वाढले. पण हे गोंजारलेपण नाकारून शिवसेनेने आपले नुकसान करून घेतले आहे. स्वबळावर लढून फायदा हा भाजपचा होणार आहे हे २०१४ ला दिसून आले आहे. मोदी लाटेवर लोकसभेत शिवसेनेला मिळालेले यश सहाच महिन्यांत विधानसभेत मिळाले नाही. भाजपने आपला आकडा जबरदस्त वाढवला. लोकसभेला मिळालेल्या खासदारांच्या प्रमाणात भाजपला संख्याबळ मिळाले. पण शिवसेनेला ते मिळाले नाही. कारण सोबत भाजप नव्हता. त्याचवेळी भाजपच्या फॉम्र्युल्याप्रमाणे भाजपला १२६ जागा दिल्या असत्या तर शिवसेनाही शंभरचा आकडा पार करू शकली असती. भाजपने आपल्या अभ्यासानुसार १२६ ची मागणी केली त्यापैकी १२३ जिंकल्या. उर्वरित जागा त्यांनी लढवल्या पण त्याचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार पडण्यात झाला.आताही स्वबळाची भाषा करणा-या शिवसेनेला तशाच संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कारण आज भाजप प्रत्येक ठिकाणी पोहोचला आहे. पण शिवसेना पोहोचलेली नाही. शिवसेनेला स्वबळावर उभे करायला लोकसभेला ४८ आणि विधानसभेला २८८ उमेदवारही मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शिवसेनेने हे गोंजारलेपण नाकारून भाजपच्या जाळय़ात ती अडकली आणि फसली असे म्हणावे लागेल. भाजपने टाकलेला मायाजाल हा समजायला तितका सोपा नसतो. भाजप म्हणजे अशा विचारांचा पक्ष आहे की ज्या पक्षात जाता जाता पायाने गाठी मारणारे लोक आहेत. या पायाने मारलेल्या गाठी भल्याभल्यांना हाताने सुटत नाहीत. अशीच गाठ सोडवण्यात आज शिवसेना पडली आहे. त्यामुळे सुरगाठीची निरगाठ करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शिवसेनेचे २००९ ला ११ खासदार होते. ती संख्या १८ वर पोहोचली. एक खासदार सरासरी ५ आमदारांचे प्रतिनिधित्व करतो असे गृहीत धरले तर शिवसेनेचे संख्याबळ विधानसभेत ९० च्या आसपास जायला पाहिजे होते.
भाजपने आपल्या संख्याबळाच्या प्रमाणात आमदार मिळवले मग शिवसेनेला का शक्य झाले नाही. याचे कारणच शिवसेनेला मिळालेले यश हे भाजपमुळे होते. विधानसभेला युती मोडल्यानंतर मतदारांनी भाजपपासून लांब गेलेल्या शिवसेनेला दूर ठेवले. साहजिकच शिवसेनेची विधानसभेतील संख्या घटली. जो पक्ष एक नंबरचा, मोठा भाऊ म्हणून भाजपला कमी लेखत होता त्याला लहान भावाची भूमिका करणे भाग पडले. आज रालोआत भाजपचे मित्र पक्षांचे संख्याबळ कमी करण्याचे धोरण दिसून येते. त्यामुळे गोंजारल्यानंतर शिवसेनेने झिडकारले तर आपोआप शिवसेनेचे संख्याबळ घटेल आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल हा साधा डाव होता. मांजर उंदराला मारण्यापूर्वी खेळवते आणि मग मारते. त्या भाजपच्या गोंजारण्याच्या खेळीला शिवसेना फसताना दिसते आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: