मुंबईची जी म्हणून वैशिष्टय़े आहेत त्यापैकी मुंबई लोकल, मुंबईचा समुद्र, मुंबईची गर्दी, मुंबईतून मिळणारा रोजगार.. मायापुरी मुंबईचं याचबरोबर आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मुंबईचा डबेवाला. कामगारांना वेळेत जेवण देण्यासाठी कमालीचे व्यवस्थापन करून दुपारची भूक भागवणारा डबेवाला आज संपूर्ण जगाला विचार करायला लावतो आहे.सामान्य माणसाशी आणि कामगाराशी नाळ जोडलेला हाच डबेवाला आता शेतकरी आणि सामान्य माणसांचा दुवा बनू पाहत आहे. त्याचे फार मोठे स्वागत करण्याची गरज आहे. कारण आता या डबेवाल्यांमार्फत ऑरगॅनिक फूड वितरणाचा मनोदय या डबेवाल्यांचे प्रतिनिधी रितेश आंद्रे यांनी व्यक्त केला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी घेतला असून त्याला सामान्य नागरिक, मुंबईकर प्रोत्साहन देतीलच, पण सरकारनेही त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याची गरज आहे. कारण याचा फायदा आमच्या अन्नदात्या शेतक-याला मिळणार आहे. अन्नदाता आणि अन्न वितरणकर्ता यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची नवी ओळख आता जगाला होईल. गेली सव्वाशे वर्षे मुंबईच्या संस्कृतीचा डबेवाला हा एक भाग बनलेला आहे. पांढरे कपडे आणि पारंपरिक गांधी टोपी अशा वेशात हजारो डबेवाल्यांनी जवळजवळ लाखो मुंबईकरांची भूक भागवली आहे. एका शतकापेक्षा जास्त काळ मुंबईच्या डबेवाल्यांची टीम या महानगराची सेवा करून मुंबईच्या स्वप्नांचा भाग बनली आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस पारशी बँकरला घरगुती जेवणाची इच्छा होती. पहिल्यांदा डबेवाल्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. सर्वांनाच ही कल्पना आवडली आणि डबा पोहोचवण्याची मागणी वाढली. सुरुवातीला ही सर्व अनौपचारिक आणि व्यक्तिगत प्रयत्नांची सुरुवात झाली होती, पण दूरदृष्टीने विचार करणारे महादेव हवाजी बचाखे यांनी या संधीचा लाभ उठवला आणि सध्याच्या डिलिव्हरी फॉर्ममध्ये दुपारच्या जेवणाची सेवा सुरू केली. मुंबई शहर वाढले म्हणून डबा डिलिव्हरीची मागणी वाढली. आज २१ व्या शतकातही आपल्या पूर्वजांनी बनविलेल्या कोडींग सिस्टीमचे महत्त्त्व जाणून डबेवाल्यांनी आपली स्वत:ची कोडींग सिस्टीम विकसित केली. फारसे शिक्षण न झालेले लोक हजारो लोकांचे डबे ज्या व्यवस्थापनाने अचूक पोहोचवतात त्याचे मॅनेजमेंट एम.बी.ए. झालेल्या लोकांना तरी जमेल की नाही याची शंकाच आहे. म्हणूनच शेतक-यांच्या मदतीला धावून येणारे आणि ऑरगॅनिक फूड सुरू करण्याची कल्पना आणणारे डबेवाले शेती आणि शेतक-याला चांगले दिवस आणून देऊ शकतील यात शंकाच नाही. मुंबईकर चाकरमान्यांना दुपारच्या वेळेत जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम अव्याहतपणे केल्यानंतर डबेवाले आता हा एक नवा उद्योग सुरू करणार आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. विशेष म्हणजे हा नवा उद्योगही अन्नाशीच संबंधित आहे. त्यामुळे या डबेवाल्यांना आता ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणायची वेळ आली आहे. डबेवाले आता ऑरगॅनिक फूड सप्लाय करणार आहेत, डबेवाल्यांचे प्रतिनिधी रितेश आंद्रे यांनी हा फार मोठा विचार मांडला आहे. यामागची आंद्रे यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, आमचा डबेवाल्यांचा स्टार्टअप उद्योग लवकरच आकारास येणार आहे. बहुतांश डबेवाल्यांच्या कुटुंबीयांची गावाकडे शेती आहे. जिथे ते सेंद्रीय भाजीपाला, फळे पिकवतात. हा शेतमाल आमच्या साखळीमार्फत पोहोचवणारा हा उद्योग असेल, असे सांगून त्यांनी एक सुखद धक्काच दिला आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आता पुणे आणि चेन्नईसारख्या शहरांमध्येही सुरू होत आहे. त्याच साखळीचा वापर करून ऑरगॅनिक फूडच्या वितरणाची जबाबदारी डबेवाल्यांनी घेतली तर त्याचा फार मोठा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतक-यांना होईल, यात शंकाच नाही. आज ऑरगॅनिक किंवा सेंद्रीय अन्नाची खरी गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शहरांमध्ये येणारे सगळे धान्य, फळे, भाज्या या संकरित (हायब्रीड) असतात. वरून चांगले दिसणारे पण निकृष्ट प्रतिची अन्नधान्ये, फळे, भाज्या यांचा पुरवठा शहरी भागाला होत असतो. सकस नसलेल्या अन्नधान्याने माणसाचे आरोग्य धोकादायक पातळीवर पोहोचलेले आहे. त्यामुळे आज चांगले सेंद्रीय अन्न मिळण्याची आवश्यकता आहे. गावाकडचा आमचा शेतकरी चांगले धान्य, शेतमाल उत्पादित करतो, पण दलालांच्या विळख्यात अडकून त्याच्या हातात पुरेसा पैसा मिळत नाही. आपण उत्पादित केलेल्या मालाचा दर ठरविण्याचा हक्क शेतकरी उत्पादकाकडे नाही. त्यामुळे चांगल्या शेतमालालाही योग्य दर मिळत नाही. त्याचे साठवणुकीचे प्रश्न निर्माण होतात. धान्याच्या साठवणुकीची सोय करता येते, पण भाजीपाला हा नाशवंत असल्याने योग्य वेळेतच तो बाजारात ग्राहकापर्यंत जाणे आवश्यक असते. पण मध्यस्थ, दलालांमुळे त्यात अडचणी निर्माण होतात. यात जे काही नुकसान होते ते शेतक-यांचेच होते. त्यामुळे आज या मालाला योग्य यंत्रणेद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम डबेवाले करणार असतील, तर ती फार चांगली बाब आहे. यामुळे फार मोठा नवा उद्योग, नवा रोजगार निर्माण होईल. शेतमालाला चांगला दर मिळेल. ग्राहकांना वाजवी दरात चांगल्या दर्जाचा माल मिळेल. गावाकडच्या शेतक-याशी असणारा संबंध दृढ होईल. शेतकरी मोठय़ा आनंदाने आपल्या मातीत राबायला तयार होईल. आज शेतक-यांना मोर्चे काढावे लागतात. हमीभावासाठी संघर्ष करावा लागतो. हे जमत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारतो. या जोखडातून त्याला सोडवण्यासाठी शेतमाल वितरणाचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. ते काही प्रमाणात को होईना यातून निर्माण होईल. याला सरकारने चांगली साथ दिली पाहिजे. कारण हा सामान्यांद्वारे होणारा फार मोठा क्रांतिकारी बदल आहे. डब्याप्रमाणेच भाजीपाला, फळे, शेतमाल सामान्यांना मिळाल्याने त्यांचाही त्रास कमी होणार आहे. आज शहरातील रेल्वे, नाल्याच्या कडेने उगवणारा निकृष्ट बियाणांपासून बनलेला भाजीपाला बाजारात येतो. तो खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. हा भाजीपाला शरीराला पोषकही नसतो. अशा परिस्थितीत सेंद्रीय शेतमाल मुंबईकरांना डबेवाल्यांच्या यंत्रणेतून मिळत असेल, तर ती फार मोठी गोष्ट आहे. त्याला सर्वानी सहकार्य करण्याची गरज आहे.
बुधवार, ४ एप्रिल, २०१८
अन्नदात्याच्या मदतीला मुंबईचा डबेवाला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा