गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

मानसा मानसा कधी व्हशीन मशिन.

‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस?’ अशी निसर्गकन्या बहिणाबाई चौधरींची कविता आहे. बहिणाबाईंनी मानसशास्त्र आणि जगाचा स्वभाव पूर्णपणे ओळखलेला होता. त्यामुळे त्यांनी जगातल्या माणसांच्या दुर्गुणांवर आपल्या कवितांमधून नेहमीच कटाक्ष टाकला होता. त्यामुळे ८० वर्षांपूर्वी माणसाला कधी तू माणूस होणार असा सवाल केला होता. कारण त्यांनी माणसातील पशूत्व, जनावर पाहिलेले होते.  म्हणूनच त्यांनी माणसापेक्षा जनावरही बरे असे आपल्या कवितेतून म्हटले होते. ‘मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहुन बरं गोठ्यातलं जनावर’ असे म्हणून माणसापेक्षा जनावरं परवडली असे म्हटले होते. पण आज जर बहिणाबाई असत्या तर त्यांनी माणसाला माणूस हो असा सल्ला दिला नसता तर अरे मानसा मानसा कधी व्हशीन मशिन असाच सवाल केला असता. कारण माणसांपेक्षा मशिनच न डगमगता काम करताना दिसतात. माणूस लाचार होतो पण मशिन कधी लाचार होताना दिसत नाही. आज सगळीकडे लाचारांची फौज दिसते आहे. त्यामुळेच अशा लाचार माणसाला आता मशिनकडून शहाणपणा शिकण्याची वेळ आलेली आहे हे बहिणाबार्इंनी सांगितलेही असते कदाचित. म्हणजे माणसाने मशिन बनवले. त्या मशिनला मेंदू दिला नाही पण ते मशिन, यंत्रणा मात्र आपल्या नियमावर ठाम असते. नियम तोडून कधीही जाताना दिसत नाही. म्हणजे अगदी पिठाच्या गिरणीचा पट्टा असला तरी सतत गोल गोल फिरायचा कंटाळा आला म्हणून चला थोडे फेरे उलटे घेऊ असे म्हणत नाही. अगदी तुटेपर्यंत काम करतो पण आपल्या नियमात बदल करत नाही. हे माणसाला जमत नाही. रोजचा आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न करताना तो अधिकाधिक चुकत जातो. मग यंत्र आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरु लागली काय?  मोबाईलचे बिल भरण्याची तारिख १० असेल तर ते वेळेत भरले नाही तर रात्री बारा वाजता तुमचा मोबाईल बंद होतो. तेंव्हा तो मोबाईल विचार करत नाही की मी एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तिच्या नावाचा फोन आहे. कोण कोणत्या हुद्दद्यावर काम करते आहे किंवा समाजात त्या व्यक्तिचे स्थान, प्रतिष्ठा काय आहे हे ही यंत्रणा कधी बघत नाही. बिल भरा आणि पुन्हा फोन चालू करा याशिवाय पर्याय नसतो. किंबहुना वेळेत बिल भरण्याची सवय माणसाला ते यंत्रच लावते. नाही ऐकले की तुम्ही डिस्कनेक्ट होता. माणसाचे तसे असते का? म्हणजे माणसापेक्षा यंत्रेच अधिक हुशार निघाली ना. बिल भरले नाही म्हणून फोन कट होतो. वीजेचे बिल भरले नाही तर लाईट कट होते. सगळ्या यंत्रणा बंद होतात. तुमचा रेल्वेचा पास ३० तारखेलो संपला असेल तर तो तातडीने नवा काढावा लागतो. ही सगळी यंत्रणा अगदी काटेकोर असते. पण माणसाचे तसे आहे का?  पगार वेळेवर होत नाही म्हणून माणूस कधी बंद पडतो का? माणसाने अशी ताकद दाखवली असती तर काय झाले असते? दुसरी लाचार माणसे त्या जागी येऊन बसतील. ती येऊ नयेत म्हणून माणसाला वेळेत पैसे, पगार मिळाला नाही तरी स्वत:चे हाल करुन घेत जगावेच लागते. हे जगणे म्हणजे अत्यंत लाजीरवाणे असते. अशा लाजीरवाण्या जगण्यावर बहिणाबार्इंनी अगदी कटाक्ष टाकला असता आणि म्हणाल्या असत्या की मानसा, मानसा कधी व्हशीन मशिन? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कायदे आहेत पण पगाराबाबत एकही सक्षम कायदा का असू नये? आज खाजगी असुरक्षित क्षेत्रातला असंघटीत कर्मचारी हा अत्यंत दीनवाणे आयुष्य जगत आहे. त्याचा पगार वेळेत होत नसल्यामुळे त्याला अपमानीत जीवन जगावे लागते आहे. पगार वेळेत न होण्यामुळे त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विजेचे बील ठराविक मुदतीत नाही भरले तर त्याला दंड भरावा लागतो. अशा दंडाची रक्कम खाजगी असंघटीत क्षेत्रातील नोकरदारांना सातत्याने भरावी लागत आहे. या लाजीरवाण्या माणसाला मुकाट्याने काम करावे लागते आहे. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. आपणच माणसांनी यंत्रणा बनवली ती नियमाप्रमाणे वागते पण माणसाला मात्र आपला नियम तोडता येत नाही. कारण मशिन बंद राहिले तर नंतर पुन्हा सुरु करताना थोडे कुरकुरेल. पण माणूस कुरकुरला तरी काम बंद पाडणार नाही याची खात्रीच असल्यामुळे मालक लोकांकडून, भांडवलदारांकडून त्यांचे वेतन वेळेत देण्याबाबत जागृत असत नाहीत. आज या शोषणाला आपला देश फार मोठ्या प्रमाणात तोंड देत आहे. कारण ठराविक एका तारखेला ठराविक इतक्या अंतराने पगार हे झालेच पाहिजेत अशा प्रकारे कोणताही कायदा या देशात नाही. पगार उशिरा झाले म्हणून मालकांना, कंपनीला दंड होण्याची किंवा ती संस्था बंद ठेवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही. आज पैसा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. पण नोकरी करणारा लाचार कर्मचारी आत्महत्या करताना दिसत नाही. अनेक खाजगी कंपन्यांमध्ये, खाजगी क्षेत्रात पगार वेळेवर होत नाहीत. कारण आपल्याकडे तसा कोणताही कायदा नाही की पगार वेळेवर झाला पाहिजे असा आग्रह त्या कायद्याने करता येईल. पोलिसांनाही वेळेत पगार मिळत नाहीत. शिक्षकांनाही वेळेत पगार मिळत नाहीत. खाजगी क्षेत्रात तर मालकांना माहितीही नसते की आपल्या कर्मचाºयांचे पगार झाले आहेत अथवा नाही. कारण मधले लोक कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत कधीच वरपर्यंत बोलत नाहीत. मलकांपर्यंत प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी पोहोचतील अशी कोणतीही यंत्रणा नसते. त्यांच्या भावना तिथपर्यंत पोहोचतच नाहीत त्यामुळे सगळं काही अलबेल आहे असे त्यांना वाटत राहते. यामध्ये आज खाजगी क्षेत्रातला कर्मचारी भरडला जात आहे. त्यामुळे माणसाला मशिन बनता येईल का? पगार मिळाला तरच तू जेव खा पी. पगार मिळाल्यावर पुन्हा सुरु हो अशी काही शटडाऊनची यंत्रणा आहे का? म्हणून म्हणावेसे वाटते, मानसा मानसा कधी व्हशीन मशिन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: