शनिवार, २१ एप्रिल, २०१८

रेल्वे ते रॉयल पॅलेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वेस्टमिनिस्टरच्या कार्यक्रमात ‘भारत की बात’मध्ये ‘मन की बात’ व्यक्त केली. त्यांनी भारताचा गौरव केलाच, पण आपल्या आयुष्याचेही सिंहावलोकनही केले. यामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचा गौरव करून घटना आणि लोकशाहीमुळेच मी रेल्वे ते रॉयल पॅलेस हा प्रवास करू शकलो, अशी भावना व्यक्त केली. एकेकाळी फक्त गुजरातचे नेते म्हणून गौरविल्या गेलेल्या नरेंद्र मोदींची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. एकेकाळी व्हिसा नाकारणारी आणि येण्यास बंदी घालणारी अमेरिका मोदींसाठी पायघडय़ा घालत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती होत असतानाच, देशात मात्र सध्या नाराजीचे सूर दिसत आहेत. त्यामुळे रेल्वे ते रॉयल पॅलेसपर्यंत प्रवास केलेल्या मोदींना जरा भारताबद्दलही थोडे बोला, असे मीडिया आणि सोशल मीडिया सुचवू लागला आहे. ही त्यांच्यासाठी २०१९ ची सूचनाच आहे.लंडनच्या वेस्टमिनिस्टरच्या कार्यक्रमात कवी प्रसून जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनातील अनेक प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद मोदींना विचारले. त्या प्रश्नांची मोदींनी अत्यंत समाधानकारक आणि प्रभावी उत्तरेही दिली. फक्त भारतीय माध्यमे म्हणत आहेत, आता आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्या. गीतकार प्रसून जोशीच्या काव्यात्मक प्रश्नांपेक्षाही देशातील काही प्रश्नांवर बोलण्याची गरज आहे. म्हणूनच ज्यांचा उल्लेख यूपीएच्या कारकिर्दीत मौनीबाबा म्हणून केला होता, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगही मोदींकडे आज प्रश्नाचे उत्तर मागत आहेत. आक्रमक झालेले विरोधक आता भारताबाहेर बोलण्यापेक्षा देशाच्या प्रश्नांवर बोला, असे मोदींना सांगत आहेत. ज्या समाजमाध्यमांनी नरेंद्र मोदींना रेल्वे ते रॉयल पॅलेस व्हाया भारताचे पंतप्रधान हा प्रवास घडवला, तोच सोशल मीडिया आज मोदींना आता भारतीयांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्या, म्हणून मागणी करताना दिसतो आहे.लंडनच्या मुलाखतीत मोदींनी मागचे सरकार, सर्जिकल स्ट्राईक आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक विषय उलगडून दाखविले. थोडीशी भावनिक झालेली ही मुलाखत लंडनवासीय भारतीयांचे मनोरंजन करून गेली असली, तरी आज केंद्रातील सरकारची चार वष्रे पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनतेच्या मनातही काही प्रश्न आहेत. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले. ३० वर्षात जे चित्र नव्हते, ते त्यांनी निर्माण केले, हे कोणीच नाकारणार नाही. त्यांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांचे कौतुकही झाले. पण, जे निर्णय धाडसाने घेतले त्याचे चांगले परिणाम अजून जनतेच्या समोर आलेले नाहीत. उलट त्या निर्णयांची चर्चा करण्यात विरोधकांना गुंतवून ठेवून एक हत्यारच विरोधकांच्या हातात दिलेले आहे. म्हणून लंडनवासीयांप्रमाणेच आता गेल्या चार वर्षातील अनेक निर्णयांबाबत भारतीयांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत, त्या निर्णयांमुळे कोण किती समाधानी आहे आणि कोण किती दुखावले आहे याची आकडेवारी एकदा समोर आणा, असे भारतीय जनतेच्या मनात आहे. ही जनतेच्या मनातील बात कधी जाणून घेणार, असे भारत विचारतो आहे. कारण या प्रश्नांची उत्तरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिली तर तो प्रचाराचा भाग असतो. त्यामुळे कोणी विश्वास ठेवेलच किंवा गांभीर्याने घेईलच असे नाही. म्हणूनच जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नाहीत, तोपर्यंत हे परदेशात फिरणारे विमान जरा देशवासीयांशी संवाद करणारे ठरू देत, असे जनतेला वाटते.रॉयल पॅलेसमध्ये पंतप्रधान म्हणाले की, रेल्वे हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे. या रेल्वेने मला जगायला शिकवले. रेल्वेच्या रुळांमधील आवाजाने मी माझ्या आयुष्याचा सूर ओळखला. रेल्वेची दगदग, गर्दी, संघर्ष यातून आपले आयुष्य हे स्वत:साठी नाही तर दुस-यासाठी आहे हे रेल्वेने शिकवले. पण याच रेल्वेने मला नवा दृष्टिकोन दिला, असे सांगताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावुक झाले होते. भारतीयांना याचे कौतुक असले तरी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची गाडी नव्या ट्रॅकवर आणली आहे, हेही मान्य केले आहे. पण या ट्रॅकचे नेमके स्टेशन काय आहे हे भारतीयांना समजावून सांगण्याची हीच वेळ आहे. लंडनमधील प्रेक्षकांसमोर रेल्वे ते रॉयल पॅलेस इथंपर्यंतच प्रवास होता. पण या प्रवासाच्या पुढे आता देशाचा प्रवास कुठे आहे याचे उत्तर आता देशाला हवे आहे. ते निवडणुकीच्या काळात नको तर त्या जाहीर होण्यापूर्वी हवे आहे.आपल्या या मुलाखतीत नेहमीप्रमाणेच पंतप्रधानांनी संमोहित करणारे भाष्य केले. त्यामध्ये पूर्वीच्या सरकारवर त्यांनी टीका केलीच. पण जनता कसल्या तरी बदलाची अपेक्षा करत होती हे ते सांगून गेले. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे आले म्हणून देश बदलला, सरकार बदलले असे नाही तर जनता बदलली म्हणून नरेंद्र मोदींना संधी मिळाली हे लक्षात घेतले पाहिजे. नरेंद्र मोदी देशाला बदलवू शकतील म्हणून त्यांना संधी  मिळाली नाही तर जनता बदलली म्हणून हा बदल घडला हे त्यांनी नकळत अधोरेखीत केले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, जनता आधीच्या सरकारला कंटाळली होती. त्यांना बदल हवा होता. पण पर्याय नसल्यामुळे त्यांना काँग्रेसला निवडून देणे भाग पडत होते.मोदींच्या रूपाने भाजपने पर्याय निर्माण केला, जनता बदलली. त्यामुळेच ही भीती कदाचित नरेंद्र मोदींच्या मनात असू शकते की जनता आता कुठला नवीन पर्याय तर शोधणार नाही ना? जनतेला दुसरा पर्याय निर्माण करण्याची वेळ येता कामा नये हेच आता इथून पुढचे भाजपचे राजकारण असणार आहे का? म्हणजेच जे राजकारण सत्तेसाठी काँग्रेसने अनेक दशके केले त्याचाच कित्ता भाजपपण गिरवणार का? मोदी म्हणाले की अन्य सरकारच्या काळात देशातील जनता अल्पसंतुष्ट होती. हा अल्पसंतुष्टपणा असणे, समाधान असणे हेच विकासामधील बाधेचे कारण आहे. सतत आपण पुढचे पाऊल टाकले पाहिजे. सायकलवाल्याने मोटरसायकलचे स्वप्न पाहिले पाहिजे, मोटरसायकलवाल्याने कारचे स्वप्न पाहिले पाहिजे. सतत डोळय़ांसमोर स्वप्न असले पाहिजे. ही स्वप्ने दाखवण्याचेच काम गेली चार वर्षे प्रामाणिकपणे या सरकारने केले. त्यामुळेच ‘अच्छे दिन आयेंगे’ हे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. एकप्रकारची अशांतता, अस्थिरता, असमाधानाची भावना आज नागरिकांच्या मनात आहे. ही अस्थिरता, असुरक्षितता निर्माण करणे हेच या सरकारचे ध्येय होते का? प्रगतीचे पुढचे पाऊल असले पाहिजे, याबाबत कोणतीही शंका नाही. पण प्रगती करताना सध्या आपण कुठे आहोत हे तर समजले पाहिजे. आज जनतेचा प्रश्न तोच आहे की सायकल विसरलो आम्ही, मोटरसायकलचे स्वप्न पाहिले, आता कारचे पाहतो आहोत. पण कारचे स्वप्न पाहताना हातातील मोटरसायकल निसटून जाईल याची भीती आहे मनात. कार नाही मिळाली तरी चालेल, पण मूळची सायकलही आम्ही विसरलो तर पायी चालावे तर लागणार नाही ना, याची भीती आहे. म्हणूनच जरा चार वर्षात आम्हाला सायकलवरून कुठे आणून सोडले आहे हे सांगा. आमच्या हातात मोटरसायकल, कार आली नाही तरी चालेल पण सायकल तर टिकली पाहिजे असे नागरिक आता बोलत आहेत. ही अस्थिरतेची आमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आता निवडणुका होण्यापूर्वी एखादी ‘चाय पे चर्चा’ करणार का?या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गोष्ट सांगितली की, जनतेच्या मनात स्वातंत्र्यानंतर एक गोष्ट भरवली गेली की सगळी जबाबदारी सरकारची आहे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारची आहे. या भावनेतून सरकार आणि जनता यांच्यात फार मोठे अंतर पडले. हे अंतर आपले सरकार आल्यावर कमी करण्याचे काम आम्ही केले. बरोबर आहे. देश माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी देशासाठी काय करतो ही भावना रुजलीच पाहिजे. पण त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑक्टोबर २०१४ ला गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छता अभियानाचे आवाहन केल्यावर सगळय़ांनी त्याला साथ दिली. अगदी विरोधी पक्षांनीही हातात झाडू घेऊन या भावनीक आवाहनाला प्रतिसाद दिला. पण स्वच्छता झाली का? वरवरचा कचरा बाहेर आला, पण अंत:करणातल्या कच-याचे काय करायचे? सध्या बँक घोटाळा, आर्थिक टंचाईचा प्रकार घडताना दिसत आहे, तो कचरा बाहेर येण्याचा प्रकार आहे का? यातून देश कसा स्वच्छ करणार आहात याचे उत्तर आज जनतेला हवे आहे. आज देशभर महिला अत्याचार, कठुआसारखी प्रकरणे होत आहेत, जातीय दंगली घडत आहेत, अशांतता पसरत आहे. त्यामुळे मनातील कचरा दूर करण्यासाठी काय करणार आहात याचे उत्तर आता द्यावे लागेल. भारतीय जनतेशी संवाद साधण्याची हीच वेळ आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. म्हणूनच रेल्वे ते रॉयल पॅलेस प्रवास मोठा आणि रोमहर्षक असेलही, संघर्षमय असेलही पण आता या प्रवासाचे पुढचे स्टेशन भारत हेच असावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: