अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनात अनेक भावना, विचार निर्माण झाले. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. ठिक आहे आनंद वाटला. कुणाला तरी द्यायचा म्हणून तो विनोद खन्नाला दिला गेला का? हाच पुरस्कार हयातीत मिळाला असता तर जास्ती आनंद झाला असता. कारण असा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे यावर हयात असताना त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असती हे जाणून घेण्यातही आनंद वाटला असता. पण तो मरणोत्तर जाहीर झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांना दिला हे योग्य आहे की नाही याबाबत त्यांचे मत समजणार नाही याचे दु:ख आहे.खरंच विनोदखन्नाची कामगिरी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी योग्य आहे का असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. नव्हे पडायला हवा. या पुरस्काराचे स्वरुप जे आहे ते चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी, असामान्य कामगिरीसाठी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे विनोद खन्ना याला हा पुरस्कार दिला गेला तो नेता म्हणून दिला की अभिनेता म्हणून दिला गेला? विनोद खन्ना हे अभिनेते होते, खासदार मंत्री होते. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीसाठी दिला गेला की राजकीय कारकीर्दीसाठी दिला गेला? कारण फक्त अभिनय या निकशावर हा पुरस्कार द्यायचा झाला तर त्यांच्यापेक्षा जास्त कारकीर्द गाजवलेले असंख्य अभिनेते, अभिनेत्री आहेत. विनोद खन्ना यांच्यापेक्षा दीर्घकाळ कारकीर्द जितेंद्रची आहे. आमच्या सुलोचनादिदी तर कित्येक वर्ष या पुरस्काराची वाट पहात आहेत. पण त्यांच्या नावाचा विचार हा होतच नाही हे दु:खच आहे. हा पुरस्कार जिवंतपणी दिला तर त्याचा अधिक आनंद त्या कलाकाराला होईल. विनोद खन्ना यांच्या निधनाला पुढच्या आठवड्यात वर्ष पूर्ण होईल. पण त्यांना हा पुरस्कार दिलाच पाहिजे होता असे काही वाटत नाही. विनोद खन्ना या अभिनेत्याचे आमची पिढी जाम फॅन आहे. म्हणजे १९८० साली आचार्य रजनीश यांच्या प्रेमात पडून त्याने संन्यास घेतला नसता तर अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टारपदाला अस्थिर करण्याची ताकद त्याच्यात होती हे निश्चित. असे असतानाही ज्याची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द गाजली आणि ज्यांचे योगदान अधिक आहे अशा अनेकांना डावलून हा पुरस्कार विनोद खन्ना यांना जाहीर झाला याचे सखेद आश्चर्य वाटते. कदाचित विनोद खन्ना हयात असते तर त्यांनाही याचे आश्चर्य वाटले असते. कारण मरणोत्तरच पुरस्कार जाहीर करायचा होता तर काही वर्षांपूर्वी तो राजेश खन्नाला का मिळाला नाही? राजेश खन्ना हा तर रुपेरी पडद्यावरील पहिला सुपरस्टार होता. त्याचे योगदान निश्चितच मोठे आहे. तोही खासदार होता, राजकारणात होता. मरणोत्तर पुरस्कारासाठी राजेंद्रकुमारही पात्र ठरला असता. कारण तो एक ज्युबिली स्टार होता. त्याच्या नावावर भले मोहमंद रफींच्या कृपेने का होईना रौप्यमहोत्सवी चित्रपट झळकत होते. तशी ही यादी लांबतच जाईल. संजिव कुमार, किशोर कुमार यांनाही मरणोत्तर हा पुरस्कार देता आला असता. त्यांची कारकीर्दही नक्कीच उजवी आहे. याच यादीत सुनील दत्त यांचाही विचार करायला हरकत नव्हती. हयातीत ज्यांना पुरस्कार देण्यास योग्या आहेत त्यांच्यात धर्मेद्रची कारकीर्दही मोठी आहे. अमिताभ बच्चन यांचीही लांबच लांब आहे. अशी अनेक नावे रांगेत असताना या पुरस्कारासाठी अचानक विनोद खन्नांचे नाव आल्यामुळे आश्चर्य वाटले.विनोद खन्ना या अभिनेत्याविषयी कोणताही मनात अनादर नाही. तो आमचा आवडता हिरो आहेच. पण जे निकष या पुरस्कारासाठी असतात त्या तुलनेत विनोद खन्ना योग्य आहेत असे वाटत नाही. त्यांनी चित्रपटात काम करण्यापेक्षा निर्मिती, दिग्दर्शन किंवा अन्य काही विशेष योगदान दिलेले नाही. केवळ अभिनय या निकषावर हा पुरस्कार दिला जाऊ शकत नाही. जुन्य काळातील देविकारानी यांच्यासारख्या अभिनेत्रींना पहिला १९६९ चा पुरस्कार मिळणे हे योग्य आहे. कारण ज्या काळात महिला सिनेमात काम करणे सभ्य मानले जात नव्हते त्या काळातील त्यांचे योगदान हे कौतुकास्पद होते. पण त्यानंतर फक्त अभिनय या निकषावर फारसे कोणाला असे पुरस्कार दिले गेलेले नाहीत. त्या तुलनेत विनोद खन्ना यांना मिळालेला पुरस्कार हा आश्चर्याचा धक्का आहे. त्याचा परिणाम एकच प्रश्न निर्माण होतो की विनोद खन्नाला फाळके पुरस्कार नेता म्हणून की अभिनेता म्हणून दिला? हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता व भारतीय राजकारणी होते. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, अचानक , परवरिश, अमर अकबर अॅन्थनी , मुकद्दर का सिकंदर , द बर्निंग ट्रेन हे चित्रपट विशेष गाजले. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचे एकत्रित गाजलेले चित्रपट म्हणजे खून पसिना, हेरा फेरी, परवरीश, अमर अकबर अँथनी यांचा उल्लेख करावा लागेल. अमिताभ बच्चन बरोबर खलनायक आणि सहनानयक अशा दुहेरी भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. पण अचानक विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना चित्रपट सृष्टीतून निवृत्ती घेतली. आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले. साधारण ५ वर्षे ओशो रजनीश यांच्या आश्रमात संन्यास घेतल्यावर १९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी पुनश्च चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले. डिम्पल कपाडिया यांच्या बरोबर इन्साफ चित्रपट करून त्यांचे पुनरागमन झाले. जुर्म , चांदनी, दयावान असे काही अतिशय गाजलेले चित्रपट या दुसºया सत्रात विनोद खन्ना यांनी गाजवले.विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपूर मतदारसंघातून बाराव्या, तेराव्या व चौदाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली. हा सगळा त्यांचा प्रवास आश्चर्यकारक असाच आहे. त्यामुळे जेवढे त्यांच्या संन्यासाने आश्चर्य वाटले होते तेवढेच आश्चर्य दादासाहेब फाळके मिळाल्याने आहे.बहुतेक कलाकारांना पद्म पुरस्काराने गौरवले गेले आहे. शासनाचा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. पण विनोद खन्ना यांना यापूर्वी कोणताही पद्म अथवा तत्सम पुरस्कार मिळालेला नव्हता. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याने त्याची कदाचित भरपाई झाली असेल, पण अजूनही रांगेत असताना हा अचानक विनोद खन्ना यांना जाहीर झाल्यामुळे प्रश्न निर्माण झाला की हा पुरस्कार नेता म्हणून की अभिनेता म्हणून?
रविवार, १५ एप्रिल, २०१८
हा पुरस्कार नेता म्हणून की अभिनेता म्हणून?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा