अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी तरुण अशा प्रसाद कांबळींची निवड झालेली आहे. त्यामुळे नाट्यक्षेत्रात विशेषत: युवा वर्गात अत्यंत आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रसाद कांबळी हे केवळ मच्छिंद्र कांबळींचे पुत्र ही त्यांची ओळख नाही तर वडिलांचा नाट्यकलेचा वारसा पुढे नेणारा नवा विचाराचा उमदा तरुण अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे नाट्य सृष्टीच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. गेल्या पंधरा वर्षात ज्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्या अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा यामुळे निर्माण झालेली आहे.अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपद ज्यांनी ज्यांनी उपभोगले त्यामध्ये मच्छिंद्र कांबळी यांची कारकीर्द ही चांगली झाली होती. नाटक हा कोकणी माणसाचा आवडीचा विषय. या कोकणातील नाटकाला मच्छिंद्र कांबळींनी आंतरराष्टÑीय पातळीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे मच्छिंद्र कांबळी यांच्या कारकीर्दीचा विशेष उल्लेख करण्याची गरज आहे. म्हणूनच मच्छिंद्र कांबळी यांचेनंतर दीर्घकाळ नाट्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले मोहन जोशी यांची पंधरा वर्षांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर आता या चळवळीला आणि मराठी नाटकाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जी उंची मराठी नाटकाला मच्छिंद्र कांबळी यांनी दिली होती ती पुन्हा वाढवण्याचा वारसा जपण्याची जबाबदारी प्रसाद कांबळी यांचेवर येऊन ठेपली आहे. म्हणून या पितापुत्रांच्या कारकिर्दीची तुलना करण्याचा मोह आवरत नाही.मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेचा गोडवा हा जगाला दाखवून दिला. १९८० पर्यंत मराठी नाटके ही अत्यंत पठडीतील आणि प्रस्थापित भाषेतील होती. त्यात पुणे नाशिक येथील लेखकांच्या भाषेचा वरचष्मा होता. नाटके ही प्रस्थापित किंवा साहित्यीक, अलंकारीक भाषेत लिहून भाषासौदर्य दाखवण्याची चढाओढ लेखकांमध्ये असे. त्यामुळे शहरी ंिकंवा पुणेरी भाषेतील नाटकांचा रंगभूमीवर भडिमार होत होता. बॉक्स आॅफीसमधली ही नाटके ताई माईची नाटके म्हणून ओळखली जात होती. या नाटकांनी कौटुंबिक कथानकांचा रतीब घातला होता. यामध्ये वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी, बाळ कोल्हटकर, मधुसुधन कालेलकर, अनिल बर्वे अशा लेखकांची त्यावेळी हुकमत होती. त्याच सुमारास काही विनोदी आणि फार्सीकल नाटकेही येत होती. यामध्ये बबन प्रभू, श्रीनिवास भणगे, शाम फडके, गंगाराम गवाणकर यांची नाटके होती. ही नाटकेपण प्रस्थापीत भाषेतीलच होती. त्याचवेळी समांतर नाट्य चळवळीतील नाटके विजय तेंडुलकर, सतीश आळेकर असे लेखक लिहीत होते. त्यातील विषय अत्यंत वेगळे असले तरी भाषा ही प्रस्थापीतच होती. त्यामुळे तत्कालीन विचाराप्रमाणे शुद्ध भाषेतील आणि आजच्या विचाराप्रमाणे प्रमाणित प्रस्थापीत भाषेतील नाटके हीच प्रेक्षकांना पर्वणी होती. पण १९८० च्या दशकात मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकाली प्रॉडक्शनच्या माध्यमातून मालवणी भाषेतील नाटक आणण्याचे धाडस केले. त्यांचे नाट्यसृष्टीत प्रचंड स्वागत झाले. हे नाटक फक्त कोकणातच तेही तळकोकणातच चालेल असे अनेकांना वाटत असताना या कोकणाने साता समुद्रापार भद्रकालीला नेले. मालवणी भाषेचा गोडवा प्रेक्षकांना आवडू लागला. रसिक म्हणून गणलेल्या पुणेकरांनीही या मालवणी भाषेला डोक्यावर घेतले. त्यामुळे वस्त्रहरण हे नाटक मच्छिंद्र कांबळींच्या हयातीतच ५००० प्रयोगापर्यंत पोहोचले. याशिवाय पांडगो इलो रे बा इला रे, सावळो गोंधळ, घास रे रामा, माझे पती छत्रीपती, वय वर्ष पंचावन्न या नाटकांनाही चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्टÑात मिळाला. यामुळे महाराष्टÑातील बोली भाषेतून आलेली नाटके सर्वत्र चालू शकतात याचा विचार मराठी लेखकांमध्ये आला. त्या विचाराची प्रेरणा हे मच्छिंद्र कांबळी होते. म्हणूनच त्यांचे योगदान फार महत्वाचे आहे. हाच वारसा पुढे नेण्याचे काम आता प्रसाद कांबळी यांना करावे लागणार आहे. मच्छिंद्र कांबळींनी मालवणी भाषेतील नाटक आणण्यापूर्वी अनेक नाटकांमधून कामे केली होती. त्यात मधुसुधन कालेलकरांचे डार्लिंग डार्लिंग हे नाटक खूप गाजले होते. प्रस्थापित भाषेतही त्यांनी भरपूर हशा मिळवला होता. यात तर विनोदाची जुगलबंदी होती. यात काम करणारे दिग्गज म्हणजे तत्कालीन विनोदाचा बादशहा राजा गोसावी, आजचे विनोद सम्राट अशोक म्हणजे अशोक सराफ आणि गाढवाच्या लग्नमुळे मोठे नाव झालेले प्रकाश इनामदार आणि चौथे होते ते मच्छिंद्र कांबळी. या चौघांनीही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी गाजवली हे विशेष. पण प्रस्थापित नाटकात अडकून पडता मालवणी भाषेला राजमान्य, रसिकमान्य करणे हे ध्येय ठेवून मच्छिंद्र कांबळींनी पावले टाकली आणि फार मोठे काम केले. आज वडिलांचा हा वारसा जपण्याचे काम प्रसाद कांबळींना करायचे आहे. सावळो गोंधळसावळो गोेंधळ हे नाटक मराठी रंगभूमीवर शंभर वर्ष गाजत असलेल्या संशय कल्लोळ या नाटकाचे मालवणी रुपांतर आहे. अतिशय गाजलेल्या संशयकल्लोळ या नाटकाचे चपखल मालवणी भाषेत रुपांतर मच्छिंद्र कांबळी यांनी केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. माझे पती....१९८६ साली माझा पती करोडपती हा सचिन पिळगांवरचा चित्रपट गाजला होता. त्यात छोटी भूमिका मच्छिंद्र कांबळींची होतीच. पण त्या नावाचा फायदा घेत त्यांनी माझे पती छत्रपती असे नाटक आणले. पण यातील छत्रपती या नावाने गोंधळ उडाला. भावना दुखावल्यामुळे सेन्सॉरच्या कात्रीत हे नाटक अडकून पडले. शेवटी त्यांचे नाव माझे पती छत्रीपती असे करुन ते चालवण्यात आले. यात काळा कोट, धोतर आणि हातात छत्री घेऊन जाणारे छत्रपती कांबळींनी साकारले होते. मोहन जोशींची असमाधानकारक कारकीर्दमच्छिंद्र कांबळींची नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर ही जबाबदारी गेली १५ वर्ष मधला थोडा काळ वगळता २००३ पासून मोहन जोशींकडे आहे. पण या काळात मराठी नाटक सिमीत झाले. मराठी कलाकारांना मालिकांचे डेली सोपचे वेध लागल्यामुळे मुंबई बाहेर नाटकांचे दौरे करण्याचे प्रमाण कमी झाले. मराठी नाटक हे फक्त मुंबईपुरते मर्यादीत करण्यामुळे मोहन जोशी यांच्यावर मराटी रसिकांचा राग आहे. एकीकडे प्रशांत दामले रंगभूमीला वाहून घेत जगभर दौरे काढत असताना काही नाटके फक्त मुंबई पुरतीच मर्यादीत करून तीही फक्त शनिवार रविवार ठेवून जो थिएटरवर तारखांचा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे अनेकांना कुजवले जाते. त्या प्रकाराला आळा बसावा आणि नाटक हे महाराष्टÑाचे व्हावे ही अपेक्षा मराठी माणसाची आहे. मच्छिंद्र कांबळींनी मराठी मालवणी नाटकाच्या कक्षा रुंदावल्या त्याय मोहन जोशींनी संकुचित केल्या. म्हणून रंगकर्मींना प्रसाद कांबळीकडून खूप अपेक्षा आहेत. मराठी नाटक संपूर्ण महाराष्टÑात दौरे करेल अशी अपेक्षा रंगकर्मी करत आहेत. वडिलांचा वारसा अशाप्रकारे त्यांनी पुढे नेला पाहिजे असे वाटते.
शनिवार, ७ एप्रिल, २०१८
वडिलांचा वारसा पुढे नेणार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा