काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आपला लोकसभा मतदारसंघ अमेठीच्या दौ-यावर आहेत. त्या ठिकाणी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी येथील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधींनी अमेठीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर अमेठीचा विकास हा जागतिक दर्जाचा विकास असेल असे सांगताना ते म्हणाले की, १०-१५ वर्षानंतर लोक सिंगापूर-कॅलिफोर्निया या शहरांबरोबरच अमेठीचेही नाव घेतील. असा विचार केला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ असताना गेल्या ७० वर्षात हे का नाही सुचले? आजच अचानक अमेठीचा सिंगापूर कॅलिफोर्निया करायची इच्छा का झाली? विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड टीकाही केली. ही इतकी टोकाची होती की ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उभे राहायला घाबरतात. संसदेत जर मला भाषणासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला तर पंतप्रधान बोलण्यासाठी उभेही राहू शकणार नाहीत. राफेल किंवा नीरव मोदीचे प्रकरण असू देत, मोदींना बोलताच येणार नाही. पण यावरून एक दिसून येते की, राहुल गांधी आता मोदींची भाषा बोलू लागले आहेत. विकासाच्या मुद्दय़ावर बोलू लागले आहेत. हेही नसे थोडके. विरोधी पक्षांनी नुकतेच राहुल गांधी यांच्यावर अमेठीचा विकास न केल्याचा आरोप केला होता.त्यामुळे धास्तावलेले राहुल गांधी मंगळवारी जेव्हा अमेठीत पोहोचले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना विरोध करीत ते केवळ भाजप सरकारने बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसला ही गोष्ट खूप सावरून घ्यावी लागली. त्यामुळे काँग्रेसने याला उत्तर देताना सांगितले की, राहुल गांधी अमेठीत रस्त्याच्या उद्घाटनासाठी नाही तर लोकांना भेटण्यासाठी गेले होते. पण एक झाले की, आता मतदार विकासकामाशिवाय दुसरे काही ऐकणार नाहीत. त्यामुळे अमेठीच्या विकासावर त्यांना बोलावे लागले. साहजिकच नरेंद्र मोदी २०१४ पूर्वी जे बोलत होते ती भाषा ते आता बोलू लागले. इतके की अमेठीला सिंगापूर, कॅलिफोर्निया करण्याची भाषा त्यांनी केली. वास्तविक या मतदारसंघात असलेली अशिक्षितता, अविकसित मनोवृत्ती अज्ञान हे इतके आहे की त्यांना कॅलिफोर्निया म्हणजे नक्की काय करणार हे समजलेही नसेल. किंबहुना सिंगापूर कुठे आहे आणि कसे आहे हे माहितीही नसेल. रोजगारासाठी फक्त महाराष्ट्र मुंबईच्या दिशेने यायचे इतकेच माहिती असलेल्या उत्तर प्रदेशातील जनतेला राहुल गांधी यांनी अमेठीची मुंबई करून दाखवतो सांगितले असते तरी खूप आनंद झाला असता. राहुल गांधींच्या पदरात बरेच काही पडले असते.केंद्रीय मंत्री आणि २०१४ मध्ये राहुल गांधींविरोधात अमेठीतून भाजपचे उमेदवार म्हणून स्मृती इराणी यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. यावेळी इराणी यांनी सातत्याने राहुल गांधी यांच्यावर आरोप केले होते की, त्यांनी अमेठीसाठी काहीही केले नाही. तेथे आजही मूलभूत सुविधांची कमतरता आहे; परंतु पारंपरिक मतदारसंघ आणि गांधी घराणे आणि काँग्रेसशिवाय कोणाला मतदान करायचे नाही या मानसिकतेतील मतदारांमुळे राहुल गांधी विजयी झाले खरे. पण त्यांना आता इथला विकास करू हे सांगावेसे वाटले याचा अर्थ जनता कुठे तरी जागरूत होते आहे. आता थापा मारणा-या उमेदवारांना जनता दारात उभे करणार नाही, हे निश्चित. या जनतेला अडाणी ठेवणे हेच काँग्रेसच्या फायद्याचे होते. कारण मुकाटय़ाने किंवा मूकपणे शिक्के मारणे किंवा बटण दाबणे यापलीकडे निवडणुकीचा अर्थ त्या जनतेला कळत नव्हता. देशातील एका मोठय़ा राज्यातील आणि कायम पंतप्रधानपद दिलेल्या या मतदारसंघाची ही अवस्था असेल तर त्यासारखे दुर्दैव कोणते म्हणायचे? त्यामुळेच आता भीतीपोटी म्हणा किंवा भिडेपोटी म्हणा, त्यांना मोदींची भाषा बोलावी लागली. विकासाची भाषा बोलावी लागली. स्वप्न दाखवावे लागले. मतदारांनी निवडून दिल्यानंतर कधी होणार अमेठीचा सिंगापूर, कधी होणार कॅलिफोर्निया असा सवाल निर्माण करण्याचे दिवस सुरू झाले आहेत. हेच कदाचित अच्छे दिन असावेत. विरोधकांच्या, मोदींच्या भीतीने का होईना अमेठीच्या विकासावर बोलावे लागले, फार मोठे स्वप्न दाखवण्याची वेळ राहुल गांधींवर आली हेच ते अच्छे दिन आहेत.या मतदारसंघातून राहुल गांधी २००४, २००९ आणि २०१४ असे तब्बल तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यापैकी दोन वेळा त्यांचे सरकार होते. पंतप्रधान नसले तरी सगळी सूत्रे त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या हातातच तर होती. या पंधरा वर्षात सिंगापूर, कॅलिफोर्निया नाही, निदान महाराष्ट्रातील एखाद्या शहराइतपत तरी चेहरा त्यांना तयार करता आला का? आता पुढच्या पंधरा वर्षात ते काय करू शकणार आहेत? अजून थोडे मागे गेलो तर लक्षात येईल की, सोनिया गांधी १९९९ ला या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. सगळे काही हातात होते. तेव्हा हे का नाही करता आले? त्या अगोदर राहुल गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. त्यापैकी १९९१च्या निवडणुकीत ते विजयी झाले तरी त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तरीही त्या अगोदर १९८९, १९८५, १९८१ या तीन वेळा ते खासदार होते. त्यापैकी पाच वर्ष ते पंतप्रधान होते. मग पंतप्रधानांचा मतदारसंघ कसा असला पाहिजे. तेव्हा अमेठीची दिल्ली, मुंबई व्हावी असे का वाटले नाही. कॅलिफोर्निया ही खूप दूरची गोष्ट आहे. पण राहुल गांधी आता मोदींची भाषा बोलू लागले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
बुधवार, १८ एप्रिल, २०१८
राहुल गांधी आता मोदींची भाषा बोलू लागले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा