रविवार, ८ एप्रिल, २०१८

मुंबई विद्यापीठाचा घोळ संपणार कधी?

मुंबई विद्यापीठाच्या कारभाराची लक्तरे गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच वेशीवर टांगली जात आहेत. या सावळागोंधळामुळे विद्यापीठाचा दर्जाही घसरला आहे. याचे कारण अंदाधुंद आणि दिशाहीन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष हेच आहे. या दुर्लक्षाचाच एक भाग म्हणजे परीक्षा वेळेवर न घेणे. त्याच्या तारखा निश्चित न करणे, वारंवार परीक्षांच्या तारखा पुढेमागे करणे, परीक्षा पुढे ढकलणे हा आहे. परीक्षा पुढे ढकलल्या की पेपर तपासणीला वेळ लागतो. पेपर तपासणीला वेळ लागला की निकाल उशिरा लागतो. त्यामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागते, शैक्षणिक नुकसान होते. सहा-सहा महिनेच नव्हे तर काहींचे शैक्षणिक वर्षही वाया जाते. म्हणूनच विद्यापीठाचा हा घोळ संपणार कधी असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडलेला आहे. खरे तर मुंबई विद्यापीठाचा देशातील चांगल्या विद्यापीठांपैकी एक असा नावलौकिक होता. तो टिकविणे गरजेचे होते. कारण मुंबई ही राज्याची राजधानी असली तरी देशाची आर्थिक राजधानी आहे. रोजगाराची सर्वाधिक संधी ही मुंबईत मिळत असते. त्यामुळे या विद्यापीठातून मिळणारे शिक्षण हे अन्य विद्यापीठांना आदर्श ठरायला हवे होते. पण आज दर्जेदार विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ शंभरच्या आतही नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या यादीत मुंबई विद्यापीठाचा कुठे उल्लेखही नव्हता इतके हे विद्यापीठ खालच्या क्रमांकावर गेले आहे. हे कशामुळे झाले आहे याची चौकशी होऊन त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करणे आवश्यक आहे.शैक्षणिक कार्यातील राजकारण आणि अंदाधुंदी थांबल्याशिवाय विद्यापीठाला दर्जा प्राप्त होणार नाही. या सर्वाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. विद्यापीठातील एकूणच वातावरण हे गोंधळाचे आहे. कुलगुरू निवडीत राजकीय हस्तक्षेप झाला. कुलगुरूंवर कुरघोडी करण्याचे प्रकार झाले. विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्याबाबत अंधार आहे. महाविद्यालयांशी संलग्नीकरणाबाबत अंदाधुंदी आहे. या सगळ्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. प्राध्यापकांचे मीटर सुरू असते. त्यांचा पगार होत असतो. पण नुकसान होते ते विद्यार्थ्यांचे. याकडे कोण लक्ष देणार? त्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करून हा गोंधळ थांबवला पाहिजे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवून हा घोळ एकदा कायमस्वरूपी संपवला पाहिजे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अभ्यासक्रमाचा कार्यक्रम हा सूत्रबद्ध असला पाहिजे. कॉलेज सुरू होण्याचा आणि परीक्षांचा कार्यक्रम निश्चित असला पाहिजे. आजकाल परीक्षा पुढे ढकलणे, निकाल उशिरा लावणे हे विद्यापीठात नित्याचे झाले आहे. त्यामुळे किती शैक्षणिक तास वाया जातात, किती कामाचे तास वाया जातात, श्रमशक्ती किती वाया जाते याचे कुठे तरी ऑडिट होणे गरजेचे आहे. कोणी टोकत नाही, तक्रार करत नाही म्हणून मनमानी कारभार चालला आहे, त्याला आळा बसला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. याचे कारण मुंबई विद्यापीठाने तब्बल ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत.विद्यापीठाकडून या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने साहजिकच निकालही लांबणीवर पडणार आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा एक महिना पुढे ढकलल्याचे जाहीर केले जाते. म्हणजे मे महिन्याच्या अखेपर्यंत या परीक्षा चालणार. त्यानंतर पेपर तपासणी. त्यानंतर निकाल लावणार कधी?  या पेपर तपासणीतही काही कमी घोळ नसतो. प्राध्यापकांचे नखरे, त्यांच्या मागण्या या दरम्यान असतात. मग पेपर तपासणीला नकार देणे. पेपर ताब्यात न घेणे. ऑनलाईन पेपर तपासणीला विरोध करणे. या घोळातून सुटून निकाल इतका पुढे ढकलला जातो की विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते. जुलै-ऑगस्टमध्ये जर निकाल लागणार असतील त्या पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवणे अवघड होऊन बसते. त्यामुळे सहा महिने ते एक वर्ष विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे हा घोळ तातडीने मिटवला पाहिजे. वास्तविक या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत. काही परीक्षांचे निकाल पुढील आठवडय़ात लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा, नव्या परीक्षांसाठी तयारीची संधी मिळावी, यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.पण हे स्पष्टीकरण काही पटणारे नाही. मुळात मागच्या सेमिस्टरचा निकालही वेळेत लागलेला नाही. निकाल वेळेत न लागण्याचे कारण हेच रहाटगाडगे आहे. ते म्हणजे परीक्षा पुढे ढकलणे, त्याचे पेपर वेळेत तपासले न जाणे वगैरे वगैरे. या सततच्या चक्रातून विद्यापीठीय परीक्षा पद्धती बाहेर पडणार आहे की नाही? आज ज्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत त्याचे कोणतेही संयुक्तीक कारण विद्यापीठाला देता आलेले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे नियोजनशून्य कारभार हेच आहे. हा घोळ संपणार कधी हाच विद्यार्थ्यांचा मुख्य प्रश्न आहे. आज ज्या ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, त्यामध्ये अनेक परीक्षा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या वेळेतच होणे आवश्यक होते. यामध्ये विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील एमएससी (सेमिस्टर १, सेमिस्टर ३, वाणिज्य शाखेतील बीकॉम (सेमिस्टर ५, सेमिस्टर ६), एमएमएम (सेमिस्टर १) एमएचआरडीएम, एमएफएम, एमएफएसएम, तर कला शाखेतील एमए, बीए, एमएडच्या परीक्षा एक ते दीड महिना पुढे ढकलल्या आहेत. म्हणजे त्यानंतर पुढे दोन ते तीन महिने विद्यार्थ्यांना निकालासाठी ताटकळत बसावे लागणार आहे.म्हणजे ऑगस्ट महिना उजाडणार. यामध्ये शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. याचे कारण बाकीच्या विद्यापीठांच्या परीक्षा वेळेत झालेल्या आहेत. त्यांचे निकाल मे अखेपर्यंतच लावले जातात. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेशअर्ज भरणे किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणे सोपे जाते. यात बीएडच्या विद्यार्थ्यांचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये लागला तर त्यांना नवीन नोकरीसाठी पुढचे वर्षभर थांबावे लागेल. कारण शाळा या जूनमध्ये सुरू होत असतात. यासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात परीक्षा आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात कॉलेज सुरू करण्याच्या तारखा निश्चित करून मे अखेरीस निकाल लावणे बंधनकारक केले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: