पुरोगामी महाराष्टÑ असा उल्लेख आला की त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने महाराष्टÑाचे पुरोगामित्व सिद्ध झाले. याचे कारण जोतीरावांनी नेहमी विवेकावर भर दिला. बुद्धीला पटेल तेच करायचे आणि परंपरेने आलेले चुकीचे ते सोडून द्यायचे हा विचार दिला. जे काही असेल ते सत्याच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर असले तरच स्विकारायचे आणि जाचक, समाजाचे शोषण होणारे सोडून द्यायचे हा त्यांचा पक्का विचार होता. त्यासाठीच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले होते. याचे कारण त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात सांगितले आहे. ते म्हणजे, ‘ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।’किती सहजपणे त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. महात्मा फुले हे बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला त्यांन न डगमगता गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय आहेत. विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे मत होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी लिहिलेल्या शेतकºयाचा असूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकºयांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. आजही ती परिस्थिती बदललेली आहे असे वाटत नाही. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे जोतीराव फुले हे महान विचारवंत होते. १८७३ ला महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. मानसिक गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वत:च्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. शिक्षण व समता या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. महात्मा फुले यांनी पावणेदोनशे वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही तितकेच उपयुक्त आहेत. त्यांचे विचार हे चिरंतन आणि त्रिकालाबाधीत सत्य असे आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत हा आजचा विचार असला तरी त्याची पार्श्वभूमी महात्मा फुलेंच्या कार्यातून तयार झालेली आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकरी पिचला होता, त्याचे शोषण होत होते, कर्जबाजार होता. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे चित्र स्वातंत्र््यानंतरही बदलले नसेल तर आपल्याला महात्मा फुलेंच्या विचारानेच जावे लागेल. शेतकरी आणि मागे पडलेल्या समाजाला वर काढणे आणि विवेकावर आधारीत वर्तन करून सत्याचा आग्रह धरणे ही त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांना या चळवळीत प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. तत्कालीन सनातनी आणि कर्मठ प्रवृत्तीने त्यांना खूप छळण्याचा प्रयत्न केला. पण कितीही त्रास झाला तरी आपल्या ध्येयापासून ते वंचित झाले नाहीत. त्यांचे ध्येय म्हणजे बहुजनांना, सर्वसामान्यांना, गोरगरीबांना शिक्षण मिळाले पाहिजे. आज कोणत्याही समस्येचे मूळ हे शिक्षणाचा अभाव हे आहे. शिक्षणामुळे विचार करण्याची भावना निर्माण होते. यासाठी सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण ही मूठभरांची मक्तेदारी नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले आणि सिद्ध करून दाखवले. समाजातील विकासासाठी शिक्षण ही प्राथमिक गरज आहे हे त्यांनी ठामपणे बिंबवले. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुले हे वैचारिक गुरु होते. त्यांच्या विचारांचा वारसा बाबासाहेबांनी पुढे नेला. महात्मा फुलेंनी शिकायचा आग्रह धरला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा आणि संघटीत व्हा असे शिकवले. त्यातून हा महाराष्टÑ पुरोगामी आणि सर्वसमावेशक होताना दिसला. त्या पुरोगामी विचारांचे जनक म्हणून आपल्याला महात्मा जोतीराव फुले यांच्याकडे पहावे लागेल. त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्त त्यांना मनापासून अभिवादन.
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
पुरोगामी विचारांचे जनक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा