महाराष्ट्र पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात रविवारपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ३७ नक्षलवादी ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या दोन दशकांत केलेली ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्मसमर्पण योजना यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागांमध्ये विकासकामांचा वेग वाढला आहे. त्याचवेळी आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सत्तेतील सहभागही वाढत आहे. आत्मसमर्पणानंतर नक्षलवाद्यांना योग्य प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे गेल्या काही वर्षात नक्षली कारवायांवर ब-यापैकी नियंत्रण आल्याचे दिसत होते. असे असतानाच, पोलिसांनी ३७ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडल्याने नक्षल्यांच्या कारवाया अद्याप सुरू असल्याचेच दिसून येते. महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याची ख्याती ही नक्षलग्रस्त जिल्हा म्हणूनच अनेक दशके आहे. गडचिरोलीमध्ये कर्तव्य बजावणे म्हणजे पोलिसांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा मानली जाते. नैसर्गिक आणि भौगोलिक अडचणींबरोबरच या भागात काम करणा-या पोलिसांना नक्षलवाद्यांशी लढा द्यावा लागतो. त्यामुळे पोलिसांनाही जीव मुठीत धरूनच जगावे लागते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एखाद्या पोलीस अधिका-याला धडा शिकवण्यासाठी त्याची बदली गडचिरोलीला केली जाते, हे अनेकदा आपण ऐकतो. याचे कारण पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने संघर्ष होत असतो. या संघर्षात पोलिसांना संपवण्याच्या थरापर्यंत नक्षलवादी आक्रमक होत असतात. गेल्या तीन दिवसांपासून असेच सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या रडारवर नेहमीच राजकीय व्यक्ती आणि पोलीस यंत्रणा राहिलेली आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसांवर हल्ले केल्याचे फारसे ऐकिवात येत नाही. कारण, नक्षलवाद्यांचा लढा किंवा राग हा व्यवस्थेवर असतो. या व्यवस्थेचे सूत्रधार राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणा असते. त्यामुळे त्यांचा निशाणा हा नेहमीच नेते आणि पोलीस असा राहिलेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत ३७ नक्षलवादी ठार झाले आहेत. सोमवारी गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात चार महिलांचाही सामावेश आहे. गेल्या दोन दशकांतील नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष म्हणजे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. एकटे पोलीस या संकटाशी सामना करू शकत नाहीत, म्हणून अन्य यंत्रणाही पोलिसांच्या मदतीला कार्यरत असतात. त्यामुळेच या फार मोठय़ा कारवाईनंतर भारतीय जवानांनी प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर ताल धरत जल्लोषही साजरा केला. यावरून नक्षलवादाचे उग्र स्वरूप लक्षात येण्यास हरकत नाही. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान रविवार आणि सोमवारी जोरदार चकमक उडाली होती. रविवारच्या कारवाईत सुरक्षा दलाने १६ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्यानंतर सोमवारी झालेल्या कारवाईत ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर मंगळवारी गडचिरोलीच्या जंगलात सर्च ऑपरेशन्स सुरू असताना इंद्रावती नदीत १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह वाहत आल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या कारवाईत एकूण ३७ नक्षलवादी मारले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई जिमालगट्टा परिसरातील राजाराम खांदला जंगलात झाली. पोलिसांबरोबरच या कारवाईत सी-६ कमांडोही सहभागी झाले होते. पांडुरंग वरोरा, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शांताराम मोरे आणि अमित घोडा आदी आमदारांना मारण्यासाठी हे नक्षलवादी आले होते, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांना टार्गेट करण्याचे नक्षलवाद्यांचे सत्र कायम असल्याचे स्पष्ट झालेले आहे. साहजिकच या कारवाईमुळे मोठय़ा प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे. नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे. अर्थात याचे समर्थन कधीच करता येणार नाही, कारण कायदा हातात घेऊन हे नक्षलवादी शस्त्र चालवत असतात. गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे. ही विचारसरणी लोकशाहीला अत्यंत घातक अशी आहे. नक्षलवादी किंवा माओवाद्यांनी सामान्य माणसांवर हल्ले केले नसले, तरी व्यवस्थेचे मुडदे पाडण्याचे त्यांचे असलेले धोरण हे फार घातक असे आहे. पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी गावात सोनम वांगडी या पोलीस निरीक्षकाचा एका आदिवासी तरुणाच्या तीर कामठय़ाने मृत्यू झाला होता. ज्याचे पर्यवसान आसाम फंट्रियर रायफल्सकडून जमावावर गोळीबार करण्यात झाले. साधारण पन्नास वर्षापूर्वी म्हणजे २५ मे १९६७ रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला आणि ४ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन आणि माओवादी तसेच लेनिनवादी गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखील नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते. आपल्याकडे गेली पाच दशके हा नक्षलवाद सुरू आहे. जानेवारी २०१०मध्ये नक्षलवादी गट आणि समविचारी संघटना यामध्ये पीपल्स वॉर ग्रुप आदी संघटना कार्यरत झाल्या. भारताच्या वीस राज्यांतील २२० जिल्ह्यात त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कारवाया भारताच्या आदिवासीबहुल आणि लाल पट्टय़ात केंद्रित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली हा त्याचाच एक भाग आहे. पाच दशके सुरू असलेला नक्षलवाद मोडून काढण्यात आजपर्यंत कोणत्याही यंत्रणेला, सरकारला शंभर टक्के यश आलेले नाही. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ तसेच महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या भागात नक्षल्यांचा प्रभाव अधिक आहे. या नक्षलवाद्यांचे ग्रामीण आणि शहरी भागातील छुपे समर्थक शोधून काढणे गरजेचे आहेत. कारण, हे समर्थकच त्यांची ‘थिंक टँक’ म्हणून चळवळीला ऊर्जा पुरवताना दिसत आहेत. नक्षल्यांचा बिमोड करताना सर्वच स्तरावर अंकुश लावल्यास लवकरच चळवळ इतिहासजमा होईल, यात शंका नाही. समतोल विकास आणि विकासाच्या प्रक्रियेत योग्य वाटा न मिळाल्याने शेतमजूर, आदिवासी हे नक्षलवादाकडे वळत आहेत. त्यांचे हल्ले परतवणे किंवा त्यांचा खात्मा करून त्यांना संपवणे, हे काही नक्षलवादावरचे उत्तर असू शकत नाही. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे पुनर्वसन करणे हे फार महत्त्वाचे आहे. एका मेलेल्या नक्षलवाद्याच्या रक्ताच्या थेंबातून, पुन्हा नवे नक्षलवादी सूड घेण्यासाठी तयार होण्याची भीती आहे. त्यामुळेच याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.
मंगळवार, २४ एप्रिल, २०१८
नक्षली ‘थिंक टँक’चा बिमोड आवश्यक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा