माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह १७ पैकी ११ जागांवर विजय प्राप्त करत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. पदार्पणात आणि पक्षाची नवीनच स्थापना केल्यावर अत्यंत अल्प कालावधीत एवढा मोठा विजय मिळवणे सोपे नसते. आजवर ते कोणाला जमलेही नव्हते. पण, नारायण राणे आणि त्यांचे दोनही पुत्र माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी ते करून दाखवले. या यशामागचे मुख्य कारण आहे ते राणे यांच्यावर मतदारांचा विश्वास आहे. इथला विकास राणेच करू शकतात, याची मनोमन खात्री त्यांना पटलेली आहे. विकासाला मत म्हणजे राणे यांना मत. राणे कुठेही असले तरी त्यांची साथ सोडायची नाही, या विचाराला मतदारांनी दिलेला हा कौल म्हणावा लागेल. या निवडणुकीतून राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पदार्पणातच एका विशिष्ट अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे या यशाचे विशेष कौतुक करावे लागेल. मतदार आता शहाणा, समजूतदार आहे, कसल्याही भूल-थापांना बळी न पडता आपल्यासाठी कोण उपयुक्त आहे याची जाणीव मतदारांना असल्याचे मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे योग्य मतदान करून योग्य माणसांच्या हातात सत्ता देण्याचा अचूक निर्णय मतदारांनी घेतल्याबद्दल कणकवलीकरांचे अभिनंदन करायला पाहिजे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपच्या संदेश पारकर यांना पराभवाचा धक्का दिला. भाजप आणि शिवसेना आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. यावरून सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना चांगलेच उत्तर मिळाले असेल. कोकणवर हक्क कोणीही सांगू नये. कोकण फक्त विकासकामांसाठी जो झटतो, तिथल्या स्थानिक जनतेला न्याय कोण देतो त्यांच्याच पाठीशी असतो, हे इथल्या जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे बोलबचनगिरी करणा-या आणि खोटी आश्वासने देऊन दुटप्पी भूमिका घेणा-या नेत्यांना कोकणची जनता कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहत नाही, हे यातून दिसून आले आहे. शिवसेना-भाजप युतीने सर्वस्व पणाला लावल्याने, कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले होते. पण, केवळ सत्तेसाठी भाजपचा फायदा उठवू पाहणा-या शिवसेनेला या निवडणुकीत त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली आहे. एकीकडे सत्तेतून बाहेर पडणार म्हणायचे, मंत्र्यांनी सत्तेला चिकटून राहायचे, सरकारच्या कामावर स्वत:च टीका करायची, स्वबळावर निवडणुका लढणार म्हणायचे आणि समोर नारायण राणे यांच्यासारखे तगडे आव्हान उभे आहे, हे समजल्यावर पुन्हा वाघाचे मांजर होऊन कमळाबाईला चिकटायला जायचे. या असल्या दुटप्पीपणाला मतदारांनी सपशेल नाकारले आहे. त्याचप्रमाणे भाजपला या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले आहे की, योग्य मित्र बरोबर नसेल तर तुमची अवस्था अशी असेल. कोकणात राणेंशिवाय तुमचे अस्तित्व नाही, हे मतदारांनी भाजपला दाखवून दिले आहे. या निवडणुकीत ११ जागा जिंकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली. पदार्पणातच मिळवलेले हे यश अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निर्मितीनंतर आलेल्या पहिल्याच निवडणुकीत मिळवलेले हे घवघवीत यश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात राणे यांचे किती मोठे वजन आहे हे दाखवून देणारे आहे. ज्या नारायण राणे यांनी मोठे केले आणि सिंहासनावर बसवले त्याच राणे यांच्या विरोधात गेल्यावर हातात भोपळा आल्याशिवाय राहत नाही, हे संदेश पारकर यांना या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती, अशी मते विविध माध्यमांनी व्यक्त केली होती. पण, ती लढाई पुन्हा एकदा राणेंनी जिंकून त्यांच्या विरोधकांना धूळ चारली आहे. कोकणात बाकी कोणी नाद करायचाच नाही, हे दाखवत समोरच्यांचेच अस्तित्व पुसून टाकण्याचे काम नारायण राणे यांनी केले आहे. अस्तित्वहीन झालेल्या शिवसेनेने केवळ नारायण राणे यांना विरोध म्हणून येथे भाजपशी युती केली होती. पण, अस्तित्वशून्य झालेल्या शिवसेनेचा फायदा भाजपला काहीही झालेला नाही, हे यातून दिसून आले. राज्यातही शिवसेनेने भाजपची साथ सोडली असती, तरी नारायण राणे यांनी सरकार गडगडू दिले नसते, या समीकरणाची ही चुणूकच आहे. त्यामुळे फक्त धमकावणा-या शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही, हेच अंजन या निवडणुकीतून भाजपच्या डोळय़ात नारायण राणे यांनी घातले आहे. पदार्पणात एकदम निवडणूक लढवण्याचे धाडस कोणी करत नाही आणि मोठय़ा विजयाचे तर नाहीच नाही. भारतीय जनता पक्षाने ३८ वा वर्धापन दिन साजरा केला असला तरी १९८० च्या निवडणुका पक्ष नवीन असल्यामुळे न लढवण्याचा निर्णय तेव्हा वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपने घेतला होता. शिवसेनेलाही पहिला विजय मिळवायला खूप वाट पाहावी लागली. त्या तुलनेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पहिलीच निवडणूक यशस्वी करून दाखवली हे पुढच्या यशस्वी वाटचालीचे द्योतक आहे. आता पुढची वाटचाल सोनेरी असेल यात शंकाच नाही. ग्रामीण भागात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाळेमुळे रोवून केलेली विजयी वाटचाल ही मोठा वटवृक्ष होण्याची चिन्हे असतात. त्यामुळे हे विजयाचे बिजारोपण करून नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आता महाराष्ट्राला स्वाभिमान जपण्याशिवाय पर्याय नाही, हे सांगत या निवडणुकीतून हा पक्ष राज्यात सर्वदूर कमी कालावधीत मोठा होईल याचेच संकेत देत आहे. भल्या-भल्यांना जे जमले नाही, ते या निवडणुकीतून नारायण राणे यांनी करून दाखवले आहे. केवळ कोकणातच नाही, तर महाराष्ट्रात आता नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही हे मतदारांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
गुरुवार, १२ एप्रिल, २०१८
नारायण राणेंशिवाय पर्याय नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा