रविवार, २२ एप्रिल, २०१८

यशवंत सिन्हांची नाराजी २००९ पासूनच

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ट नेते आणि अनेक महत्वाची पदे सांभाळणारे यशवंत सिन्हा यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाला रामराम केल्याचे जाहीर केले. आपण पक्षीय राजकारण संन्यास घेणार असल्याचे सांगून कोणत्याच पक्षात जाण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही धोक्यात असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकछत्री कारभारावर नाराजी व्यक्त केली. पण लोकशाही जर धोक्यात आहे तर ती वाचवण्याचे प्रयत्न न करता यशवंत सिन्हा यांनी असे मैदान का सोडावे हा प्रश्न पडतो.  मोदींवरच्या नाराजीतूनच तर यशवंत सिन्हा गेले अनेक दिवस देशभर मोदी विरोधी आघाडी करण्याचे प्रयत्न करत होते. अनेक वाहिन्यांना दिलेल्य मुलाखतीत त्यांनी पंतप्रधानपदासाठी ती वाघीण आहे ना पर्याय असे सांगून ममता बॅनर्जींची शिफारस केली होती. पंधराच दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांशीही बैठक घेतली होती. असे असताना कोणत्याही पक्षाचा आधार न घेता, पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेत संन्यास घेतल्याची भावना व्यक्त केली. याचा अर्थ त्यांचे तिसºया आघाडीचे प्रयत्न फसले का? वास्तविक पाहतायशवंत सिन्हा  हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्याकडे शासकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही कामांचा दांडगा अनुभव होता. असे असताना धोक्यात आलेली लोकशाही वाचवण्यासाठी मुख्य प्रवाहात न राहता कडेला जाण्याचा निर्णय काक घ्यावा? त्यांनी १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन तत्कालीन जनता पक्षात प्रवेश केला. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर व्ही पी सिंग काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. परंतु १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला. त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळातअर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. हा असा भरपूर प्रवास झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. साहजिकच ते ओरीजनल भाजपेयी नव्हेत. सोयीच्या राजकारणाने त्यांनी भाजपची निवड केली. अर्थात दीर्घकाळ म्हणजे जवळपास २५ वर्ष ते भाजपत राहिलेही. पण त्यांनी आपली विचारसरणी लांब ठेवली नाही.  भाजपमध्ये गेल्यावर १९९५-१९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर १९९८, १९९९ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. इथपर्यंत सगळे ठिक होते. पण त्यानंतरच सिन्हांचे बिनसले आहे. जून २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. याचा अर्थ यशवंत सिन्हांची भाजपवरील नाराजी २००९ पासूनची आहे. म्हणजे जवळपास दहा वर्ष ते नाराजच आहेत. अचानक मोदी आले म्हणून ते नाराज झाले असे समजण्याचे बिल्कूल कारण नाही. कारण २००९ च्या निवडणुका भाजप हरण्यामागचे नेमके कारण होते ते नेतृत्वाचा अभाव हे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे २००४ च्या  निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता गेल्यानंतर राजकारणापासून दूर गेले. त्यामुळे भाजप तसा नेतृत्वहीनच झालेला होता. ज्यांच्याकडे नेता नसतो त्या पक्षाला कोणीही संधी देत नाही. २००९ च्या निवडणुका नेमक्या कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायच्या याबाबत एकमत नव्हते. त्या निवडणुकीचा अडवाणी हा चेहरा दाखवला गेला होता पण त्यांचे नेतृत्व सर्वमान्य नव्हते. त्यातच त्यांच्या वयाचा मुद्दाही होता. त्याचवेळी भाजपचे नेतृत्व नरेंद्र मोदींकडे द्यावे असा संघ परिवारातून तेंव्हा विचार डोकवायला लागला होता. तो विचार संघाला भाजपच्या माथी तेंव्हा उतरवता आला नसला तरी त्यांनी २०१४ ला तो उतरवला. त्यादृष्टीने २००९ चे भाजपचे अपयश हे संघाच्या पत्थ्यावरच पडले होते. २००४ च्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस जेंव्हा सत्तेवर येणार हे निश्चित झाले तेंव्हा भाजप प्रचंड बिथरला होता. कारण सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला २००४ च्या निवडणुकीत यश मिळाल्याने त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे स्वदेशीचा मुद्दा करत भाजपने फार मोठा हंगामा केला होता. अटलबिहारी वाजपेयी गप्प झाले होते. तर सूषमा स्वराज या नेत्या त्यावेळी आक्रमक झाल्या होत्या. जन्माने विदेशी असलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर आपण मुंडण करु आणि संन्यास घेऊ अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अर्थात तांत्रिक कारणाने सोनियांनी आपला हक्क सोडला, त्याला त्यागाचे रुप दिले गेले हा भाग सोडला तर त्यावेळी सूषमा स्वराज हे भाजपच्या नेतृत्वाचे नाव पुढे आले होते. त्यामुळेच सोनिया गांधींना रोखण्यासाठी भाजपमधील महिला नेतृत्व पुढे आणता येईल असा भाजपच्या एका गटाचा होरा २००९ च्या निवडणुकीत होता. तर दुसरा गट अडवाणींच्या नावावर अडून होता. तिसरा गट जो संघप्रणित होता त्यांना मोदींचे नाव सुचवायचे होते. पण भाजपची अंतर्गत गटबाजी त्याला कारणीभूत होती. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर तेंव्हापासूनच यशवंत सिन्हा हे नाराज होते. त्यामुळे मोदींमुळे सिन्हा बाहेर पडले आहेत असे बिल्कूल नाही. शिवाय गेल्या काही दिवसांपासून तिसरी आघाडी असली तरी ती काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली तर आपले महत्व राहणार नाही हे यशवंत सिन्हांनी ओळखले. त्यामुळे भाजपमधील यशवंत आणि शत्रुघ्न ही सिन्हा पार्टी एक होऊन नाराजांना गोळा करण्यात गुंतली. त्यांना पंतप्रधानपदासाठी चेहरा हवा होता. त्यासाठी ममता बॅनर्जींचे नाव घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पण यामध्ये यश येणार नाही याचा अंदांज आल्यावर आपण आता किंगमेकरच्या भूमिकेत रहावे, लोकशाही शुद्धीकरणासाठी बाहेर पडावे असा विचार करुन त्यांनी भाजपला रामराम ठोकला.                                                                                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: