रविवार, २९ एप्रिल, २०१८

जनतेचा नव्हे, हा तर काँग्रे्रसचा आक्रोश


आता सगळ्याच राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीचे वेध लागले असून गेल्या चार वर्षांपासून सत्ताभ्रष्ट झालेल्या काँग्रेसने आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रविवारच्या दिल्लीतील जनआक्रोश रॅलीचे आयोजन होते असे म्हणावे लागेल. त्यामुळे नाव जनआक्रोश म्हटले असले तरी हा सत्तेपासून दूर गेलेल्या काँग्रेसचा आक्रोश आहे. यात जनहित कुठेही दिसून येत नाही. जनतेच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे, असेच म्हणावे लागेल. त्याचाच एक भाग म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी दिल्लीत मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारला असे म्हणावे लागेल. राहुल गांधी म्हणतात देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धार्मिक हिंसाचार तसेच महिलांवरील वाढते अत्याचार यातून जनतेमध्ये वाढलेला आक्रोश प्रकट करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी ट्विटमधूनही सरकारवर निशाणा साधला आहे. पण हा तर काँग्रेसचा आक्रोश आहे जनतेचा नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण जनतेचा आक्रोश असता तर २०१४ मध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर जावे लागले नसते. आज काहीही काम नसल्यामुळे चर्चेत राहण्यासाठी ही नवी थेरं सुरु केली काय असाच प्रश्न पडतो. दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी राहुल गांधी यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी काँग्रसचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करत असल्याचे म्हटले तरी त्यातील फोलपणा जनतेच्या लक्षात येताना दिसतोच. कारण ज्या मुद्यांवर राहुल गांधी रॅली घेत होते ते काही नवे मुद्दे नाहीत. स्वातंत्र्यापासून त्याच मुद्यांवर विरोधक बोलत आले आहेत. ते मुद्दे अनेक दशके सत्तेत राहून काँग्रेसला सोडवता आलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांना या मुद्यांवरून मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा काहीच अधिकार पोहोचत नाही. मोदी सरकारला तर चारच वर्षे झालेली आहेत. त्यात त्यांनी अनेक बदल करत आणले आहेत. त्यामुळे त्याचे चित्र स्पष्ट होण्यासाठी कालावधी लागणारच. कारण अनेक दशकांची ही अवस्था सुधारायची आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेतली आहे. काँग्रेसच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांनी केलेल्या रणनीतीचा तो एक भाग आहे. यात जनतेचा कनवाळा वगैरे काहीही नाही, हे जनता चांगलेच जाणून आहे. जनतेच्या हितासाठी हा मोर्चा, हा आक्रोश आहे असे सांगून निवडणुकीची तयारी करण्यात काँग्रेस उतरली आहे हे यामागचे वास्तव आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या या रॅलीसाठी संपूर्ण देशभरातून कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. पण या सभेतील मुद्दे आणि कोणत्या कारणासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढला हे सांगताना राहुल गांधी यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर नजर मारली तर लक्षात येईल की यात जनआक्रोश नाही ही निवडणुका डाळ्यापुढे ठेवून केलेली राजकीय खेळी आहे. देशातील महागाई हा मुद्दा राहुल गांधींच्या सभेचा पहिला मुद्दा आहे. पण काँग्रेसच्या विरोधात महागाई, दरवाढी विरोधात मोर्चे काढण्याचे काम गेल्या ७० वर्षात काँग्रेसचे सरकार असताना सातत्याने विरोधकांनी केलेले आहे. पण काँग्रेसला दरवाढ रोखण्यात कायम अपयश आले होते. अगदी अलिकडच्या काळातील सांगायचे झाले तर यूपीए सरकारच्याच काळात मनमोहनसिंग पंतप्रधान असताना ५ आॅक्टोबर २०१० ला सर्वपक्षीय भारत बंद झाला होता. पेट्रोल, डिझेल आणि इंधनांच्या किमतींवरील नियंत्रण सुटल्यावर जो महागाईचा भडका उडाला त्याचे पर्यवसान २०१० च्या आॅक्टोबर महिन्यात जनता रस्त्यावर उतरून झालेले होते. त्याला जनआक्रोश म्हणतात, कारण त्यावेळी यूपीए २ नुकतीच सत्तेवर आलेली होती. कोणत्याही निवडणुका समोर नव्हत्या. पण आत्ता जे राहुल गांधी करत आहेत ते सरळ सरळ सध्याच्या सुरु असलेल्या आणि भविष्यात येणाºया लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे. काँग्रेसच्या राजवटीत महागाई नियंत्रणात कधी न आणणाºयांना आता त्या विषयावर बोलायला तोंडच नाही. या सभेसाठी राहुल गांधींचा दुसरा मुद्दा आहे की सरकारचा भ्रष्टाचार. मोदी सरकार चार वर्ष सत्तेत आहे. सत्तेत असलेले अनेक नेते वाचाळ आणि तोंंडाळ आहेत. पण अजूनपर्यंत कोणीही भ्रष्टाचारात अडकलेले नाहीत. कोणावरही तसा आरोप झालेला नाही. या उलट काँग्रेसने सत्तेत असताना असे एकही क्षेत्र ठेवले नाही की जिथे भ्रष्टाचार नाही. राष्टÑकुलच्या नॅपकीनपासून ते टू जी स्पेक्ट्रमपर्यंत, कोळशापासून ते बँकांपर्यंत अनेक घोटाळे काँग्रेसच्या राज्यात घडले आहेत. तसे कोणतेही घोटाळे भाजपच्या या सरकारच्या काळात घडलेले नाहीत. आज जे मल्ल्या, नीरव मोदीचे घोटाळे बाहेर येत आहेत ते काँग्रेस राजवटीचे पाप बाहेर येत आहे. त्यामुळे अशी रॅली घेऊन राहुल गांधींच्या पदरी निराशेशिवाय काहीही पडणार नाही. कारण भ्रष्टाचाराचे आरोप करणारी यंत्रणा स्वच्छ नाही. याशिवाय राहुल गांधींचा विषय आहे तो बेरोजगारी वाढल्याचा. पण आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेवर असल्यापासूनच बेरोजगारीचा प्रश्न आहे. १९७४ साली मनोजकुमारने यावरून तर ‘रोटी, कपडा और मकान’ हा वास्तवदर्शी चित्रपट काढला होता. त्यातील ‘बाकी कुछ बचा तो मेहंगाई मार गयी’ हे गरीबी हटावची घोषणा देणाºया इंदिरा गांधींच्या राजवटीला चपराक देणारे गाणे होते. त्यात बेरोजगारीचे विदारक चित्र मांडले होते. तेव्हापासूची ही परिस्थिती आहे. याशिवाय धार्मिक हिंसाचार आणि महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत राहुल गांधींचे शरसंधान म्हणजे हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. कारण काँग्रेसच्या राजवटीतच धार्मिक हिंसाचार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. २०१२ च्या निर्भया प्रकरणात संपूर्ण देश पेटून उठला तेव्हा राहुल गांधी गप्पच होते. तेव्हा त्यांची सत्ता असताना त्यांनी अत्याचाराबाबत काहीच केले नाही, मग आता हा खोटा आक्रोश कशासाठी? ही सगळी निवडणुकीसाठी चालवलेली यंत्रणा आहे यात जनहिताचा संबंध काहीही नाही हे लक्षात घ्यावेच लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: