शनिवार, २८ एप्रिल, २०१८

हमाम में सब..

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच गेले काही महिने सातत्याने चर्चेत आहे. बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडमध्येही तो प्रकार असल्याचे तेथील काही कलावंतांनी सांगितले. यावरून मराठीतही असे प्रकार असल्याचे सांगून काही कलाकारांनी धमाका उडवून दिला. पण चित्रपटसृष्टीतील जगाकडून कोणी नैतिकतेचे शिक्षण घेत नसल्यामुळे या चर्चा चवीने वाचल्या, ऐकल्या गेल्या. पण सरोज खान या नृत्यदिग्दर्शिकेने जेव्हा बॉलिवूडप्रमाणेच सगळ्या क्षेत्रात असे प्रकार घडतात, फक्त बॉलिवूड कास्टिंग काऊचनंतर कलाकारांना रोजी-रोटी देते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. जगण्याचा संघर्ष करणा-या प्रत्येक क्षेत्रात महिलांना त्या दिव्यातून जावेच लागते, हे विदारक सत्य (?) सरोज खानने समोर आणले आणि त्यात काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनीही उडी मारली. बॉलिवूडच्या कास्टिंग काऊचप्रमाणे राजकारणातही असे प्रकार असतात, याची कबुली देऊन संसदेतील महिला खासदारही अशा प्रकारांना बळी पडलेल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणारे राजकारणी, उपदेश करणारे आसारामबापूसारखे साधू आणि पडद्यावर भूमिकेतून आदर्शवाद मांडणारे अभिनेते आणि त्यांचे जग हे सगळेच ‘हमाम में सब नंगे होते है’ हेच दाखवून देतात.कोणी दाक्षिणात्य अभिनेत्री पोलीस स्टेशनसमोर आपले कपडे उतरवून ठेवते आणि कास्टिंग काऊचचा बळी पडल्यामुळे आपली ही अवस्था झाल्याचे सांगून गळा काढते. आपल्यातील अंगीभूत कला आणि गुण दाखवण्यासाठी देहप्रदर्शन करणे ही काळाची गरज आहे हे चित्रपटसृष्टीत नेहमीच बिंबवले जाते. किंबहुना रुपेरी पडद्यावरील सुंदर तारका या जगाला मोहिनी घालणा-या रंभा, मेनका, उर्वशी अशा अप्सरा आहेत हे दाखवून प्रत्येकजण त्यांच्यासोबत स्वप्नात का होईना शय्यासोबत करत राहतो. ही असली चटक कोणी लावली आपल्याला आणि कोणी असले विचार आमच्या मनात घुसवले हे कोणीच कोणाला विचारू नये कारण ‘हमाम में तो सब नंगे होते है.’अगदी अलीकडचीच गोष्ट आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एका महिला पत्रकाराच्या गालावरून हात फिरवला. त्यावरून गदारोळ माजल्यावर त्यांनी या प्रकाराबद्दल माफीही मागितली. ही पत्रकार माझ्या नातीसारखी आहे, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका भाजपच्या नेत्याने महिला पत्रकार काम मिळवण्यासाठी शय्यासोबत करतात, अशा आशयाचे वक्तव्य केले. त्याचा फारसा निषेध कोणाही पत्रकार संघटनेने केला नाही किंवा तो विचार गांभीर्याने घेतला नाही, तरी त्यामागचे क्रौर्य संपत नाही. समाजाला न्याय देण्यासाठी, धडपडण्यासाठी म्हणून जर कोणाला पत्रकार व्हायचे असेल, माध्यम क्षेत्रात यायचे असेल तर मुलींना या अग्निदिव्यातून जावे लागते, ही मानसिक तयारी नव्या पिढीला करावी लागणार का? आपल्या कर्तबगारीपेक्षा आपल्यातील अंगीभूत गुण दाखवून महिला पुढे जातात, हेच सत्य त्यांना सांगायचे असेल तर लेखणीवर आणि वाहिन्यांवरील नितीमत्तेचे धडे देणा-या पंडितांवर कोण विश्वास ठेवेल?तसे नोकरी करणा-या महिलांकडे सहा-सात दशकांपूर्वी कोणी सभ्यतेने पाहत नव्हतेच. घराचा उंबरठा ओलांडलेली स्त्री म्हणजे ती शीलभ्रष्ट झालेली आहे, असेच समजण्याची मानसिकता असलेल्या देशात आज खूप परिवर्तन झालेले आहे. तरीही स्त्रीयांबद्दल असलेली भावना, बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही का? पूर्वी गॉसिपिंग हे फक्त चित्रपट क्षेत्राबाबतच असायचे. पण आता प्रत्येक क्षेत्रात गॉसिपिंग चालते. हाताखालची सहकारी स्त्री आपली उपभोग्य आणि हक्काची वस्तू आहे, असाच दृष्टिकोन रुजवण्यात यंत्रणा प्रयत्नशील आहेत का? याचा अर्थ प्रत्येक पुरुष हा लंपटच असतो. तो संधी मिळेल तिथे हुंगण्याचा प्रयत्न करत असतो असेच बिंबवले जात आहे. पण अशा विचारातून नेमकी बदनामी कोणाची होत आहे याचे कोणी उत्तर देईल का? यामुळे पुरुष बदनाम होत आहेत की काम करणा-या स्त्रिया? अंगावर पडेल ते काम अन् दाबून पगार हे कसले सत्य समोर येते आहे? का याबाबत कोणीच बोलायचे नाही? कारण ‘हमाम में तो सब ही नंगे होते है ना..’आज जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करणा-या अनेक शिक्षिकांना स्थानिक नेत्यांशी तोंड द्यावे लागते. अनेक जिल्ह्यांमधून शिक्षिकांची लांब बदली करून ती बदली रद्द करण्यासाठी, आवडीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी स्थानिक आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्यापासून शिक्षणाधिका-यांना या शिक्षिकांना तोंड देताना अशा दिव्यातून जावे लागते, हे वास्तव कोणी नाकारेल का? किंबहुना अनेक शाळांचे मुख्याध्यापक, निरीक्षक अशी नवनवी पाखरं हुडकून त्यांना वरिष्ठांशी चिरपरिचय घडवून आणत असतात, हे वास्तव कोणी नाकारेल का? शिक्षणाचा दर्जा पैसा खर्च करूनही खालावायचे कारण हेच आहे. कारण मुलांना न शिकवता अधिका-यांना आणि वरिष्ठांना खूश करून आम्हाला सगळं मिळत असेल तर मुलांना कोण शिकवणार? सतत होणारी शिक्षक भरती आणि नव्या शिक्षिका ही नवी शिकार अशा यंत्रणेत असते. त्यावेळी जुन्या झालेल्या शिक्षिकांना एकतर नवी सावजं टिपायचे काम करून वरिष्ठांना खूश करावे लागते. किंवा मिळेल तिथे बदली घ्यावी लागते. हे भीषण सत्य म्हणजे नव्या पिढीला शिकवणा-या आदर्शाकडून समोर येते आहे. पण या आदर्शाचे वास्तवही हमाममध्ये कसे आहे हे लहान मुलांना समजत नाही तोपर्यंतच ते सुंदर असते.पंधरा दिवसांपूर्वीच ‘ऑक्टोबर’ म्हणून एक हिंदी चित्रपट आला होता. त्यात एका नर्सच्या तोंडी असलेले वाक्य अतिशय भयानक आहे. त्या नर्सचे लग्न का झाले नाही म्हणून तो चित्रपटाचा नायक विचारतो तर ती सांगते, कोण करणार माझ्याशी लग्न? नर्स म्हणजे वाईट असतात, डॉक्टरांशी त्यांचे तसे संबंध असतात असा समाजात समज असतो. अर्थात तो नसतोच असेही कोणी नाकारत नाही. उपचारादरम्यान अंग प्रत्यांग बघूनही नजर न मरता आपल्यातील तारुण्य सळसळत ठेवायचे कौशल्य वैद्यकीय क्षेत्रात कसे संपादन केले जाते हे न समजणारे सत्य आहे. पण त्यामुळे नर्सिंग पेशातील मुलींची लग्न होण्यात अडचणी येतात किंवा अनेक तडजोडी करून नवरा नामक पुरुष पदरात पाडून घ्यावा लागतो हे भीषण सत्य या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलेले आहे. त्याच्याच काही दिवस अगोदर अनुष्का शर्माचा ‘परी’ नावाचा चित्रपट आलेला होता. त्यातही अर्णब म्हणजे परमब्रत चटर्जीचे पियाली म्हणजे रिताभरी चक्रवर्तीशी लग्न ठरलेले असते. पहिल्याच भेटीत ती तुझे कोणाशी संबंध आलेत का, असे विचारते. आपण नर्सिंग केलेले असून आपले एका डॉक्टरशी शारीरिक संबंध आल्याचे ती सांगून मोकळी होते. हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? पण प्रेमाने म्हणा, शारीरिक आकर्षणाने किंवा शरीराची गरज म्हणून सहका-यांमध्ये असे संबंध निर्माण होतात असा विचार आता प्रस्थापित होताना दिसतो आहे. किंबहुना तो रुजवताना आता कोणाला त्याचे फारसे काही वाटत नाही असे दिसते. त्यामुळे अलीकडची चित्रपटसृष्टी अधिक बोल्ड होताना दिसते आहे. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणारे मात्र क्लीन बोल्ड होताना दिसत आहेत. पण हे पटवण्यासाठी आम्हीच नाही तर तुम्हीही ‘हमाम में नंगे’ आहात यावर बोट ठेवायला बॉलिवूड मागे पडत नाही.आजकाल जसे सेकंड होम असते तसे सेकंड अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध असू शकतात हे विचार पटवण्यात नाटय़चित्रसृष्टी यशस्वी होताना दिसते आहे. १९८० च्या दशकात वसंत सबनीसांचे नाटक ‘आप्पाजींची सेक्रेटरी’ गाजले होते. त्यामध्ये आप्पाजी म्हणजे शरद तळवलकरांना अशी सेक्रेटरी हवी असते ती अशा संबंधासाठीच. चि. त्र्यं. खानोलकरांच्या ‘रखेली’ या नाटकालाही महिलांनी चांगलेच उचलून धरले होते. अरुण सरनाईकसारखा समर्थ अभिनेता असला तरी स्त्रियांच्या भावनांची कदर करणारे ते नाटक होते म्हणून ते गाजले होते. ग्रामीण राजकारणातील मराठी चित्रपटांमधून तर अनेकवेळा गावात येणारी मास्तरीण, नर्स, डॉक्टरीण या सर्वांसाठी फ्री असल्याचा समज गावात असतो असेच दाखवले आहे. त्यामुळे ‘एक गाव बारा भानगडी’ ते ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’ अशा अनेक चित्रपटांमधून डॉक्टर, नर्स, मास्तरणींचा वापर उपभोग्य वस्तू अशाचप्रकारे दाखवला आहे. ते आजही थांबलेले नाही. म्हणजे एक काळ होता की त्यात सिनेमातली किंवा तमाशातील बाईच चालू होती. पण आता ‘हमाम में सब नंगे होते है’ हे बिंबवण्यात चित्रपटसृष्टी आणि राजकारण यशस्वी होताना दिसते आहे.सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांची वाटते. संसदेत किंवा कोणत्याही सभागृहात येणा-या महिलांना अशा दिव्यांना तोंड द्यावे लागते हे जरी खरे असले तरी त्या महिला हे सहन का करतात, कसे करतात असा प्रश्न पडतो. म्हणजे अशा खासदार, आमदार किंवा विविध पदांवर असलेल्या महिलांच्या संघटना आहेत. कोणाही महिलेवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, अन्याय झाला की या महिला हातात मेणबत्ती नामक मशाली घेऊन रस्त्यावर उतरतात. पण त्या स्वत:ला का वाचवू शकत नाहीत? हे वाचवायचे नसते की आपल्याप्रमाणे तुमचा बळी जाता कामा नये म्हणून त्या रस्त्यावर उतरतात. यशाच्या किंवा मोठय़ा पदाच्या मागे धावणा-या बायांनो, तुमच्या वाटेवर काचा आहेत गं असे सांगण्यासाठी तुम्ही तिथे गेला का? मग महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा प्रश्न सुटूनही महिला अशा शोषणापासून का मुक्त होत नाहीत? आज आपण स्वत:वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू शकत नसू तर सामान्य माणसांना न्याय कोण देईल? म्हणूनच प्रश्न पडतो की ज्या महिला संसदेत खासदार म्हणून गेल्या आणि त्यांना अशा कास्टिंग काऊचसारख्या दिव्यांना तोंड द्यावे लागले त्या आता बुरखा फाडण्यास पुढे येणार की ‘हमाम में सब नंगे होते है’ म्हणून त्यावर पांघरुण घालणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: