सोमवार, २ एप्रिल, २०१८

शिवसेनेची डोकेफोड

पुढील महिन्यात होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ५५ उमेदवार उभे करणार आहे अशी घोषणा शिवसेनेने केलेली आहे. हा प्रकार म्हणजे शिवसेनेला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असेच म्हणावे लागेल. भाजपला टक्कर देण्यासाठी म्हणे हे उमेदवार उभे केले जातील असे शिवसेना म्हणते. पण टक्कर देताना समोरची भिंत पडणार नाहीच पण टक्कर देणारांचे टाळके शाबूत राहील का याचा तरी विचार करायला पाहिजे. आपला विचार किती संकुचित आहे, आपली पोहोच कुठपर्यंत गेलेली आहे याचा तरी विचार करायला हवा होता. गल्लीतला क्रिकेट खेळणारºया पोरांनी डायरेक्ट आयपीएल खेळायला जाण्याचे स्वप्न बघण्याचाच हा प्रकार आहे. किंबहुना सुदाम पेहेलवानाने डब्ल्यडब्ल्यएफच्या गादीवर जाण्याचा प्रकार आहे असेच म्हणावे लागेल. शिवसेनेने यापूर्वी आपला पक्ष राष्टÑीय पक्ष आहे असा समज करून घेत गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याचे प्रकार केले. हा विनोदच होता अर्थात. कारण जो पक्ष अजूनपर्यंत महाराष्टÑात पोहोचला नाही त्या पक्षाने सीमा ओलांडायचे चालवलेले प्रयत्न हे हास्यास्पद आहेत. गोव्यात थोडी तरी मराठी माणसे आहेत. तिथे जाण्याचा प्रयत्न केला तर एकवेळ चला धाडस केले मोठे व्हायचे असे म्हणता येईल. पण तिथे स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच नाही पण गोवेकरांनी शिवसेनेला पूर्णपणे बेदखल केले,दुर्लक्ष केले. गोव्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले होते हे सुद्धा कोणाला माहिती नव्हते इतकी दयनीय अवस्था मराठी भाषिक असलेल्या गोव्यात होती. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये काय अवस्था झाली असेल याचा विचारच केलेला बरा. आपली ताकद किती आणि आपण कुठली उडी मारतो आहोत हे शिवसेना नेत्यांना समजत नाही आणि त्यांच्याभोवती जमलेल्या बडव्यांना समजत नाही. आजूबाजूचे बडवे हरभºयाच्या झाडावर चढवतात आणि त्या वितभर रोपट्यावरुन आपल्याच नेत्याला कोसळवतात. कर्नाटकान ५०- ५५ जागा मिळवायला तेवढे उमेदवार तरी शिवसेनेला मिळणार आहेत का? म्हणजे शिडी लावून उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला आज शिवसेना चालली आहे असेच म्हणावे लागेल. मुळात कोणत्याही कामाचा हेतु शुद्ध असावा लागतो. शिवसेनाप्रमुखांच्या माघारी शिवसेनेचा हेतु कधीच शुद्ध नसतो, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. शिवसेनेचे मतदारांबद्दल असलेले प्रेम हे बेगडी झाले आहे. यांचा हेतु फक्त भाजपला विरोध करणे हा आहे. भारतीय जनता पक्षाला पडणारी मते विभागून त्याचा फायदा दुसºया विरोधी पक्षांना होईल हा स्वार्थी हेतु शिवसेनेचा आहे. त्यासाठी शिवसेना स्वबळाची भाषा करते आहे. त्यासाठीच शिवसेना कर्नाटकात जागा लढवण्याचे ठरवत आहे. पण कर्नाटकात शिवसेनेला कोणी ओळखतही नाही. सीमा वासियांसाठी आम्ही कर्नाटकच्या निवडणुका लढवणार असे सांगून सीमाभागात महाराष्टÑ एकीकरण बरोबर राहणार असे सांगून अन्य भागात आपले उमेदवार उभे करण्याचे धोरण शिवसेने आखले आहे. हा निव्वळ पोरकटपणा आहे. नेमके काय करावे हे शिवसेनेला समजत नाही अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी श्ोिवसेना उमेदवार उभे करणार आहे, हा त्यांचा हेतु चांगला नाही. अत्यंत हीन पातळीचा हा विचार आहे. एकीकडे केंद्रात आणि राज्यात त्यांच्या सरकारमध्ये सहयोगी पक्ष अशी तुमची भूमिका असताना शिवसेना आपल्याच मित्रपक्षाचा काटा काढण्याचा प्रयत्न करते हा एकप्रकारे गद्दारीचाच भाग आहे. चंद्राबाबू नायडू जसे सरकारमधून बाहेर पडले तशी हिंमत शिवसेना का दाखवू शकत नाही? आधी सरकारमधून बाहेर पडा आणि मग भाजपला विरोध करा. पण स्वार्थाने बरबटलेली शिवसेना सत्तेचे फायदे मिळवायचे आहेत आणि विरोधकांचे हितही पहायचे आहे अशा दुटप्पी भूमिकेत भरकटते आहे. त्यामुळेच शिवसेनेचा हेतु शुद्ध नाही हे म्हणावे लागते आहे. म्हणूनच ही जी शिवसेनेची भाजपला टक्कर देण्याची भूमिका आहे तो प्रकार म्हणजे भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही पण शिवसेनेचे टाळके फुटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे. शिवसेनेला सीमावासियांचा, सीमेवरील मराठी बांधवांचा पुळका आहे असे म्हणायचे आहे. पण त्यांना कसलीही सीमावासियांची काळजी नाही. ती असती तर वर्षानुवर्षे राज्य करणाºया काँग्रेस, जनता दल यांचे हित शिवसेनेने पाहिले नसते. आज भाजपचे उमेदवार पाडणे हा विचार म्हणजे काँग्रेसला मदत करण्याची शिवसेनेने घेतलेली सुपारी म्हणावी लागेल. याच काँग्रेसने महाराष्टÑाच्या नाकावर टिच्चून बेळगांवमध्ये कर्नाटक विधानसभेची इमारत उभी केली. याच काँग्रेसने सीमावासियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. याच काँग्रेसमुळे हा भाग ना केंद्रशासित होत आहे ना तोडगा निघत आहे. पाच वर्षापूर्वी सीमाभागावर सर्वपक्षिय एकत्र येऊन दिल्लीत आपले म्हणणे मांडायला गेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रथम हो हो म्हणत दिल्लीत गेल्यावर पक्षश्रेष्ठींपुढे पार गुडघे टेकत कच खाल्ली होती. याचा विसर शिवसेनेला कसा पडला? आज त्याच काँग्रेसला मदत करायला शिवसेना जात असेल तर हा सिमावासियांचा केलेला विश्वासघातच म्हणावे लागेल. आज केंद्रात आणि राज्यात आपण भाजप बरोबर आहोत. त्याच भाजपची सत्ता कर्नाटकात आली तर सीमावासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेता येईल असा विचार शिवसेनेला का सुचला नाही? का हेतुपुरस्सर सीमाप्रश्न सुटू नये म्हणूनच शिवसेना असे अडथळे निर्माण करत आहे, याचा जबाब शिवसेनेला द्यावा लागेल. शिवसेनेला कर्नाटकात उमेदवार आणि मतदार दोन्ही मिळणार नाहीत हे जरी खरे असले तरी त्यांच्यातील विषारी विचारांचे दर्शन यातून घडले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना आपला पक्ष संपूर्ण महाराष्टÑात पोहोचवता आला नाही, ज्यांना मुंबई आणि ठाण्यातूनही आता कौल मिळेनासा झाला आहे त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीचे स्वप्न पाहूच नये. यावेळी कर्नाटकातील मतदार शिवसेनेला गोवा, गुजरातप्रमाणेच बेदखल करतील यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: