भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कमल जरूर खिलेगा..’ असे वक्तव्य करून ईशान्येकडील राज्यात सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते निव्वळ स्वप्न नव्हते, तर त्यादृष्टीने प्रयत्न केले गेले होते. भाजपची प्रवर्तक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यादृष्टीने फार मोठे कार्य तिथे उभे केले. त्यामुळे मोठा विश्वास तिथल्या मतदारांमध्ये निर्माण झाला आणि त्याची पोचपावती म्हणून भाजपला ईशान्येकडे मोठे यश मिळाले..शत-प्रतिशत भाजप हे समीकरण यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड ईशान्य भारतातही कायम राहिलेली आहे. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मिळवलेले यश आणि मेघालयातील शिरकाव ही भाजपच्या दृष्टीने फारच जमेची बाजू आहे. याचा फायदा भारतीय जनता पक्षाला २०१९ च्या निवडणुकीत होईल हे निश्चित असले तरी या निकालांकडे सर्वानी केवळ निवडणूक म्हणून न पाहता एक ‘मॅनेजमेंट’ म्हणून पाहायला हवे. कोणतीही निवडणूक भाजपने ही सहज जिंकलेली नाही, तर त्यामागचे नियोजन अनेक वर्षाचे आहे. त्याचप्रमाणे ईशान्येत यश मिळवून भाजपला सत्ता देण्यासाठी भाजपच्या संघ परिवारातील शक्ती गेल्या पंधरा-वीस वर्षापासून काम करत होत्या. हे यश निवडणुका जाहीर झाल्यानंतर केलेल्या प्रचारामुळे मिळालेले नाही. संघाचे प्रचारक आणि संघप्रणीत अनेक सेवाभावी संघटना याठिकाणी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. राजकारणासाठी भाजप, पण समाजसेवेसाठी परिवारातील अन्य संघटनांचा वापर करायचा या धोरणाचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे भाजपने हे यश मिळवले आहे. या यशामागच्या नियोजनाचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. मतदानोत्तर चाचण्या आणि त्यापूर्वी झालेले सव्र्हे यानुसार भाजपला इकडे झुकते माप मिळणार हे चित्र अगोदरपासूनच समोर आले होते. पण हे काही एकाएकी झालेले नाही, तर भाजपला निवडून द्यायचेच हे तिथल्या मतदारांनी ठरवलेच होते. याचे कारण एका स्थैर्याची आणि असुरक्षिततेच्या वातावरणातून तिथल्या नागरिकांना सोडवण्याची गरज होती.मतदानोत्तर चाचण्यांमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्रिपुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुन्हा बाजी मारून सलग आठव्यांदा सरकार स्थापून विक्रम रचणार की, भाजप डाव्यांचा गडाला सुरुंग लावणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. पण, तिथल्या डाव्यांची सत्ता २५ वर्षानी संपुष्टात आणण्याचे काम भाजपने शिस्तबद्ध प्रकारे केलेले आहे. २५ वर्षापूर्वी या भागात भाजप पोहोचलाही नव्हता. कारण, तिथल्या समस्या फार मोठय़ा आणि वेगळ्या आहेत. त्या जाणून घेण्याचे काम भाजपने गेल्या दोन दशकांत केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कमल जरूर खिलेगा..’ असे वक्तव्य करून स्वप्न पाहिले होते. पण ते स्वप्न नुसते स्वप्न नव्हते, तर त्यादृष्टीने प्रयत्न केले गेले होते. भाजपची प्रवर्तक संघटना जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्या संघाने त्यादृष्टीने फार मोठे कार्य तिथे उभे करायला सुरुवात केली. त्यामुळे जो मोठा विश्वास तिथल्या मतदारांमध्ये निर्माण झाला आहे, त्याची ही पोचपावती म्हणावी लागेल. या निकालाकडे त्या दृष्टीने बघावे लागेल.त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाने ४०च्या आसपास जागा मिळवत स्पष्ट आणि घवघवीत यश मिळवले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला १८ जागांवर समाधान मानत आपली सत्ता गमवावी लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये ५ वर्षापूर्वी डाव्यांची दोन दशकांची अशीच सत्ता तृणमूल काँग्रेसने हिसकावून घेतली होती. त्यानंतर सगळीकडचेच डावे पक्ष क्षीण आणि असुरक्षित झाले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती ही त्रिपुरात पाहायला मिळाली. आता तिथे लाल रंगाची जागा भगव्याने घेतली आहे.नागालँडमध्येही भाजपने ३१ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एनपीएफला २४ जागांवर रोखून भाजपने आपले यश सिद्ध करून दाखवले आहे. मेघालयमधील निकालात भाजपचा तेथील राजकारणात शिरकाव झाला आहे, एवढेच म्हणता येईल. पण, तरीही तिथे किंगमेकरची भूमिका ही भाजपचीच असेल. पण हे आजचे चित्र असले तरी त्यामागे भाजप आणि संघ परिवाराचे नियोजन फार महत्त्वाचे आहे.कोणतेही स्वप्न साकार करण्यासाठी अगोदर पाया मजबूत करावा लागतो. प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, सभा हा भाग या निवडणुकांमधील यशाचा महत्त्वाचा भाग नव्हताच, तर इथे विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न फार महत्त्वाचा होता. ईशान्य भारतातील ही राज्ये फार असुरक्षित आहेत. तिथल्या नागरिकांना आपण भारताचा एक भाग आहोत, हेच कित्येक वर्षे समजत नव्हते. डाव्यांची कडवी प्रवृत्ती आणि कामापेक्षा चर्चा जास्त या प्रकाराने तिथल्या नागरिकांना कसलेही अस्तित्वच नव्हते. चीन आणि नेपाळ या राज्यातील घुसखोरी आणि त्रास इथल्या नागरिकांना सोसावा लागत होता. त्यांना आपण भारतीय आहोत. भारताचा एक भाग तुम्ही आहात. तुम्ही आमचे आहात हे सांगण्यासाठी प्रेमाची हाक हवी होती. त्यासाठी भाजपने संघ परिवाराच्या माध्यमातून तिथे काम उभे केले. त्याचा हा परिणाम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ख-या अर्थाने लोकशाही त्याठिकाणी रुजवण्याचे काम यानिमित्ताने केले गेले त्याचे हे फलित म्हणावे लागेल.ईशान्य भारतातील नागरिकांना हा भारत देश आपला आहे, याचा विश्वास देऊन सामाजिक आणि समरसतेच्या प्रवाहात आणण्याचे काम ‘माय होम इंडिया’ या सेवाभावी संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून सुरू केले. तिथल्या मुलांच्या असंख्य समस्या होत्या. त्या समस्या दूर करण्यासाठी या ‘माय होम इंडिया’ने केलेले काम फार मोठे आहे. चीन, बांगलादेशकडून होणारी आक्रमणे, अतिक्रमणे आणि चोरटा व्यापार, घुसखोरीत इथल्या लहान मुलांचा केला जाणारा वापर हे फार मोठे धोके संपूर्ण देशाला होते. अमली पदार्थाचा प्रसार करण्यासाठी केला जाणारा लहान मुलांचा वापर आणि त्यांच्या शिक्षणाकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे असुरक्षितता इथे होती. अशा जनतेला ‘माय होम इंडिया’ने प्रेम दिले. तेथील मुलांचे शिक्षण, संगोपन, पुनर्वसन याचे कार्य केले. त्यामुळे ‘माय होम इंडिया’ या संघ परिवाराशी संबंधित असलेल्या संस्थेच्या विश्वासाचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. या संघटनेचे प्रमुख सुनील देवधर यांनी तो भाग पिंजून काढून देशाबद्दल प्रेम निर्माण करण्याचे काम केले, मनातील असुरक्षितता घालवली. त्याचा हा परिणाम आहे.बालकामगारांचा प्रश्नमुंबईसारख्या महानगरांतून आणि देशभरांतून हॉटेल, बारमध्ये गोरीगोमटी, बुटकी आणि अपु-या नाकांची मुले ही वेटर आणि सर्वप्रकारची कामे करताना दिसतात. त्यांच्या असुरक्षित जीवनामुळे त्यांना शिक्षण सोडून लहान वयात कामे करावी लागतात. ही लहान वयातील मुले बालकामगार असली तरी देशभरातील हॉटेलमधून दिसून येतात. त्यांना शिक्षण देऊन चांगल्या संधी देणे आवश्यक आहे. आई-वडिलांपासून कुटुंबीयांपासून ही तुटलेली मुले माय होम इंडिया आणि संघ परिवारातील अनेक प्रचारकांमुळे आपल्या सुरक्षित जीवनाचे धडे घेत आहेत. त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाबद्दल तिथे आपुलकीचे वातावरण तयार झालेले आहे. ईशान्येकडील राज्ये सुरक्षित जीवन जगण्याच्या आशेने भाजपच्या मागे उभी राहताना दिसत आहेत.भारताचा हातकमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या माणसाच्या सावलीकडे पाहिले तर त्याच्या हाताचा जसा आकार असेल तसे चित्र या ईशान्येकडील राज्यांकडे आणि त्यांच्या समूहाकडे पाहिल्यावर दिसते. आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय हा समूह पाहिल्यावर चीनचा डोळा या राज्यांवर आहे. भारताचा एक हात तोडून त्याला लुळा करायचे चीनचे असलेले स्वप्न आहे. त्यामुळे असुरक्षितता आणि अशांतता याठिकाणी नांदताना दिसत होती. माओवाद्यांचा उच्छाद आणि दहशतीमुळे या असुरक्षित वातावरणातून बाहेर पडण्यासाठी भाजपचा ईशान्य भारताला आधार वाटत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा