बुधवार, ७ मार्च, २०१८

यश अपयश पचवता आले पाहिजे

गेल्या दोन दिवसांपासून त्रिपुरामधून जे पुतळ्याचे राजकारण सुरु झालेले आहे ते फार घातक आहे. देशात दंगली आणि घातपात करायला आमंत्रण देणारा हा प्रकार आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार घटकांवर ताबडतोब सरकारने कारवाई करून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. ईशान्येकडील राज्यातील निवडणुकांनंतर या घटना घडू लागल्यामुळे यामध्ये सत्ता मिळवलेल्या अतिउत्साही आणि सत्ता गमावलेल्या नैराश्यातून हे प्रकार होताना दिसत आहेत. पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की यश आणि अपयश, हार आणि जीत या गोष्टी क्षणभंगूर असतात. त्याचा माज आणि उन्माद डोक्यात शिरू द्यायचा नसतो. ते दोन्हीही पचवता आले पाहिजे. ते पचवता येत नसल्यामुळेच अशा घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला वेठीला धरण्याचा प्रकार होत आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे. दोन दिवसांपूर्वी त्रिपुरात रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. त्याचा बदला म्हणून कोलकाता येथे जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचीही नासधूस करण्यात आली.  त्यापूर्वी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हे सत्र वेळीच थांबवले नाही तर ते देशभर पसरेल आणि त्याचा गैरफायदा वाईट शक्ती प्रवृत्ती घेतील. त्यामुळे याकडे ताबडतोब नियंत्रण सरकारने आणले पाहिजे. हे घडत आहे ते निश्चितच चांगले नाही. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणता आले पाहिजे. याची सुरुवात अर्थातच लेनीनच्या पुतळ्यापासून झाली. भाजपने नंतर कानावर हात ठेवत त्रिपुरामध्ये हा प्रकार आम्ही केलेला नाही असे सांगितले असले तरी ज्या पद्धतीने जेसीबी लावून तो पुतळा हालवला गेला आणि नंतर त्या पुतळ्याची जी अवस्था झाली ती अत्यंत निंदनीय आहे. हा पुतळ्याचा नाही तर लोकशाही मुल्यांचा खून घडला आहे. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे तो हल्ला परतवून लावताना त्याचे वाईट पडसाद उमटताना दिसत आहेत. पुतळे पाडून, गाडून, तोडफोड करून विचार कधीच मरत नसतात. तो विचार संपवायचा असेल तर त्यासाठी आपला विचार अधिक प्रभावी आणि समर्थपणे मांडता आला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी यातून काय साधले? हीच संस्कृती आपली आहे का? संपूर्ण देशाला संकटात टाकण्याचे काम यातून निर्माण झाले आहे. देशभर यामुळे दंगलीची छाया पसरली आहे. परिक्षांच्या दिवसात हे काय घडते आहे? पुराण आणि इतिहासावर भाजपचा जास्त विश्वास आहे. पुराणातील रामाच्या मंदीरासाठी १९९२ ला बाबरी मशिदीचे पतन केले गेले आणि मंदीर वही बनाऐंगे अशी घोषणा दिली. त्यामुळे तरूण पेटून उठून भाजपच्या मागे धावला. या पंचवीस वर्षात दोन पिढ्या झाल्या. ना मंदीर बनले ना त्यांचा निकाल काय येईल याची शक्यता. पण त्यानंतर जे पडसाद उमटले त्यात झालेल्या दंगलीत मात्र निरपराध लोकांचे नुकसान झाले, अनेकांना जीव गमवावा लागला. अशाच परिस्थितीचा फायदा घेत दाऊद सारख्या दहशतवाद्याने मुंबईत बाँम्बस्फोट घडवले. तोही अजून पकडला गेला नाही. याचा बदला म्हणून अनेक ठिकाणची पुरातन मंदीरे पाडली गेली. अशा प्रकारांमुळे एकेकाळी वैभवशाली असलेला अफगाणिस्तान बेचिराख झाला. तालीबानने २००१ मध्ये हजारो बुद्ध मुर्ती तेथे तोडून टाकल्या. आज श्रीलंकेत तेच घडत आहे. आपल्यात आणि तालिबानी संस्कृतीत विचारात काही फरक आहे की नाही?  लेनीनचा पुतळा हालवल्यामुळे कोलकातामधील टॉलीगंज येथे केवायसी पार्कमध्ये असलेला श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासून या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. मुखर्जी यांच्या पुतळ्याची नासधूस केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी तिथे एक पोस्टर लावले आणि लेनिनचा पुतळा तोडण्याचा बदला घेतल्याचे त्यावर लिहिले. हे प्रकार अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहेत. लेनीन हा एक विचार आहे. डावा,साम्यवादी विचार आहे. तो विचार आपल्याला पटत नसेल तर तो का पटत नाही हे सांगण्याची जबाबदारी उजव्यांमध्ये असली पाहिजे. विचारांचा लढा हा नेहमी विचारांनीच द्यायचा असतो. त्यासाठी घातपात, दंगेधोपे करून काहीही साध्य होत नाही. ज्या रामाच्या आदर्शवादाचा आग्रह भाजप धरते त्या भाजपच्या कार्यकर्त्यानी लक्षात घेतले पाहिजे की रावणवधानंतर रामाने रावणाच्या मृतदेहाचाही सन्मान केला होता. मरणानंतर वैर संपते असे सांगून आपले युद्ध रावणाशी नाही तर विचाराशी होते हे वाल्मिकी रामायणात सांगितले आहे, त्याचा विसर भाजपेयींना पडला का? रामाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणाºया आमच्या आदर्श छत्रपती शिवरायांनीही अफझलखानाच्या वधानंतर त्याच्या मृतदेहाचे व्यवस्थीत दफन केले होते. प्रतापगडावर शिवप्रतापाची साक्ष आजही आपल्याला दिसून येते. हे दोन मोठे आदर्श आपल्यापुढे असताना आपल्या विरोधकांच्या पुतळ्याची विटंबना करून तो हालवण्याचे काम भाजपचे ेकार्यकर्ते कसे करू शकतात. हेन्री फोर्ड हा उद्योजक आपल्या कार्यालयात एका फोटोला रोज हार घालून पूजा करायचा. तो फोटो कुणाचा आहे हे कोणालाही माहिती नव्हते. एका अभ्यागताने फोर्डला विचारले तेंव्हा फोर्डने सांगितले होते की, हा माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी होता. आम्ही दोघांनी एकाचवेळी बिझनेस सुरु केला. पण मी यशस्वी होत गेलो तो अपयशी होत गेला. आपल्याला अपयश येउ नये म्हणून मी त्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. त्यामुळे मी सावधपणे काम करून यशस्वी होतो आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चुका, अपयश हे सतत डोळ्यापुढे राहण्यासाठी त्यांचा फोटो, पुतळा समोर असणे गरजेचे असते. नाहीतर त्याच चुका करून आपलीही वाटचाल त्याच चुकीच्या दिशेने होण्याची शक्यता असते. यासाठी सर्वात प्रथम कोणतेही यश आणि अपयश हे पचवता आले पाहिजे. त्याचा उन्माद होता कामा नये. आज जे घडते आहे ते त्वरीत थांबवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: