मंगळवार, १३ मार्च, २०१८

खरी थप्पड बसली सेनेलाच!

अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चात सोमवारी जिंकले कोण, हरले कोण? याचा विचार करण्यापेक्षा आमच्या शेतक-यांना न्याय मिळाला आणि त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, हे फार महत्त्वाचे आहे. पण, नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेपासून भरकटलेल्या शिवसेनेने सरकारवर टीका करण्यात धन्यता मानली आहे.मुंबईवर धडकलेल्या शेतक-यांच्या लाल वादळाचा तडाखा असा जबरदस्त आहे. अर्थात त्याहीपेक्षा शेतक-यांनी कालबद्ध पूर्ततेच्या वचनासह लेखी आश्वासन द्यायला राज्यकर्त्यांना भाग पाडले हे त्याहीपेक्षा मोठे आणि दूरगामी यश आहे. शेतक-यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधा-यांच्या कायम स्मरणात राहील, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण, त्याच सरकारमध्ये आपण आहोत, त्यामुळे शेतक-यांची थप्पड जर सरकारला असेल तर त्या थपडीचे एक बोट सेनेलाही बसले आहे, याची कबुली उद्धव ठाकरे देणार का? हा मोर्चा शेतक-यांचा, किसान सभेचा होता. पण, उद्धव ठाकरे आव आणत आहेत तो शिवसेनेचा आहे. वास्तविक पाहता, किसान सभेने शिवसेनेकडे मदतही मागितली नव्हती किंवा त्यांना या मोर्चात सामील होण्यासाठी आमंत्रणही दिले नव्हते. पण, गर्दीत घुसून त्या गर्दीचा फायदा उठवण्याचा प्रकार शिवसेनेने केला, ही फार हास्यास्पद गोष्ट होती. या गर्दीत घुसत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या बाललीला दाखवून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. कोणी विचारले होते का, आम्हाला पाठिंबा द्या म्हणून? शिवसेनेने पाठिंबा दिला नसता, तर हा मोर्चा यशस्वी झाला नसता का? पण या मोर्चाची थप्पड आपल्याला बसू नये म्हणून सरकारमध्ये असतानाही शिवसेनेने हा पळपुटेपणा का केला? सरकारमध्ये असूनही शिवसेनेने शेतक-यांसाठी का काही केले नाही? सेनेच्या मंत्र्यांना मोर्चातील गर्दीत ऐनवेळी घुसायची नामुष्की का आली? ‘थप्पड की गुंज’ हा डायलॉग ‘कर्मा’ चित्रपटातील आहे. डॉक्टर डँग अनुपम खेरला दिलीपकुमार थप्पड मारल्यावर तो ‘थप्पड की गुंज’ची भाषा करतो. याचा अर्थ शिवसेना नक्की कोणाला डॉक्टर डँगप्रमाणे देशद्रोही समजते आहे? वाटेल ते आणि कुठेही काहीही डायलॉग बोलून शिवसेना आपले वैचारिक दारिद्रय़ दाखवत आहे. विरोधकांवर टीका करताना नेमके डायलॉग शोधावे लागतात. २००९ साली शिवसेनेचे उमेदवार पाडल्यावर ‘अमर अकबर अँथनी’मधील डायलॉग मारून राज ठाकरे यांनी ‘सॉलीड’ ठोसा मारला होता. ‘करण अर्जुन’मधील राखीचाही राज ठाकरे उल्लेख करायचे. त्यामागे राज ठाकरे यांचा अभ्यास होता. पण, इथे कसलाही अभ्यास न करता बरळण्याचा प्रकार शिवसेनेने केलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ‘ते’ यापुढे तरी करणार नाहीत. यामध्ये ते म्हणजे भाजप, भाजपचे सरकार असे त्यांना म्हणायचे आहे. पण, त्या ‘ते’मध्ये शिवसेनेचे काही मंत्री आहेत, हे सेना नेते सोयीस्कर विसरले आहेत. शिवसेनेची भूमिका म्हणजे, ‘तुझं ते माझं, अन् माझं तेही माझंच’ अशीच आहे. म्हणजे मोर्चाला गर्दी झाली त्याचे श्रेयही शिवसेना लाटते आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या त्याही आपणच मान्य केल्या असे भासवत आहे. यातले कुठलेच काम आधी का करता आले नाही? शेतक-यांना त्रास होतो आहे असे जर शिवसेनेला वाटत होते, तर तेवढे निमित्त करून शेतक-यांसाठी आम्ही सत्तेवर लाथ मारतो, असे सांगून आपल्या मंत्र्यांना राजीनामे का देण्यास सांगितले नाही? सरकारमधून शिवसेना का बाहेर पडली नाही? वर्षभरात दुस-यांदा शेतक-यांचे आंदोलन झाले आहे. दोन्हीवेळी शिवसेनेने या गर्दीचा फायदा उठवायचा केविलवाणा प्रयत्न केला. आता शिवसेनेच्या सभांना गर्दी होत नाही. त्यामुळे दुस-याने मिळवलेल्या गर्दीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला गेला, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही? आपण काय बोलतो, किती विसंगत वागतो याचे भान जरा तरी असायला पाहिजे होते. आपण सरकारमध्ये आहोत, आपले मंत्री सरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतक-यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. मग उद्धव ठाकरे म्हणतात तशी थप्पड सरकारला बसली असेल तर ती सेनेच्या मंत्र्यांनाही बसली असेल ना? मग शिवसेना नेत्यांना नेमके काय म्हणायचे आहे? शिवसेना या थपडीचा बदला घेणार असाच अर्थ यातून निघतो. थप्पड मारणारा नेमका कोण आहे, कुणाला थप्पड बसली आहे आणि या थप्पड बसलेल्या गालावर चोळणारा हात नेमका कोणाचा आहे हे शिवसेनेला सांगावे लागेल. आज परिस्थिती अशी आहे की, शिवसेनेला आपली नेमकी भूमिका काय आहे, हेच समजत नाही. सरकारमध्ये असूनही विरोधक म्हणून काम करतात. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री व्यवस्थित कामे करत नाहीत. नाणार प्रकल्प शिवसेनेचे उद्योगमंत्री कोकणात आणतात, त्या प्रकल्पाला सगळ्या मंजु-या शिवसेनेचेच मंत्री देतात आणि नंतर म्हणतात, आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. शेतकरी मोर्चात शिरतात, सरकारविरोधात बोलतात आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच येतात. मग तिथे एकनाथ शिंदे सरकारच्या खुर्चीवर बसण्याऐवजी शेतकरी शिष्टमंडळाच्या खुर्चीवर का बसले नाहीत? हा सगळा विनोद आहे. शेतक-यांना भरकटवण्याचा प्रकार आहे. शिवसेनेच्या भुलथापांना शेतकरी फसले नाहीत. त्यांनी आपल्या लाल बावटय़ांचा रंग जराही भगवा होऊ दिला नाही. कारण, शेतक-यांनी ओळखले होते की, हे संधीसाधू आहेत. हेच सत्तेत असूनही विरोधाचा आव आणत आहेत. हीच खरी शेतक-यांनी शिवसेनेला दिलेली थप्पड होती. मोर्चात मदत करण्यासाठी अनेक संघटना, सेवाभावी संस्था होत्या. त्यात मुस्लिम संघटना होत्या, शीख संघटना होत्या, महापालिका प्रशासन होते, स्वयंसेवी संस्था होत्या. त्याबरोबर शिवसेनेचे काही लोक होते. पण, खरी मदत करणा-या अन्य संघटनांनी प्रामाणिकपणे शेतक-यांना मदत केली. पण, शिवसेनेने त्यातही राजकारण आणून भाषणाची नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. त्याची शेतक-यांनी कसलीही दखल घेतली नाही. अनुल्लेखाने मारून शेतक-यांनी खरी थप्पड सेनेलाच मारली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: