तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू राष्टÑीय लोकशाही आघाडीवर नाराज आहेत आणि ते आघाडीतून बाहेर पडण्याचे वातावरण तयार झाल्यावर शिवसेनेने त्यावर लगेच संधीसाधुपणे टीका केली आहे. तेलुगू देसम पार्टी आणि भाजप दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधण्याची भूमिका घेतली आहे. आपली प्रतिक्रीया देताना शिवसेना म्हणते आहे की, एनडीएतील घटकपक्षांचे भाजपबरोबर सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. हळूहळू इतर पक्षही तक्रारी करू लागतील आणि एक-एक करून सर्व पक्ष एनडीएतून बाहेर पडतील, असा दावा शिवसेनेने केला आहे. पण शिवसेना तर फार पूर्वीपासून भाजपवर नाराज आहे. अगदी २०१४ ला राज्य विधानसभा निवडणुका लढवतानाच भाजप बरोबर न जाता सेनेने स्वबळाची भाषा केली आणि भाजपला राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करुन दिला. नंतर आपले आता काही चालणार नाही हे लक्षात आल्यावर नाराजी दूर करून पुन्हा एनडीएत येण्याचे धोरण आखले आणि राज्य सरकारमध्ये वाटा मिळवला. त्यामुळे बाकी कोणीही नाराज झाले आणि बाहेर पडले तरी शिवसेना ते करू शकत नाही. कारण तेवढी हिंमत आज तरी शिवसेनेत नाही. पण तरीही चंद्राबाबूंच्या नाराजीनंतर आपले मत नोंदवून शिवसेना मोकळी झाली. हा प्रकार म्हणजे दुसºयाच्या चपलेने विंचू मारण्याचा प्रकार आहे. असे प्रकार शिवसेना किती दिवस करणार आहे?तेलुगू देसम आणि भाजपमधील संबंध ताणल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा दावा केला. राऊत म्हणतात, एनडीएतील सर्वच घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे इतर पक्षांची नाराजी लवकरच बाहेर येईल. पण चंद्राबाबूंची नाराजी गेल्या काही दिवसांमधली आहे. त्यांनी लगेच राजीनामेही देऊन टाकले. शिवसेनेने तसे काहीच केले नाही. चार वर्ष नाराज असूनही पंतप्रधानांपुढे त्यांचे काहीच चालले नाही. राजीनामे खिशात ठेवून उपयोग नसतो. ते प्रत्यक्ष देण्याची हिंमत लागते. ती हिंमत शिवसेनेत आहे का? आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना नेतृत्व, संजय राऊत यांच्यासारखे नेते एक बोलतात आणि आमदार खासदारांना ते मान्यही नसते. त्यामुळे मंत्रिपदाचे राजीनामे खिशात ठेवल्याची वल्गना करूनही ते देण्याचे धाडस शिवसेनेत नाही. चंद्राबाबूंनी बोलून करुन दाखवले. शिवसेना असे करुन दाखवू शकते का? बाकीच्यांचे सोडा, स्वत:चे बोला असे आज मतदार, नागरिक उघडपणे बोलतात. त्यामुळे दुसºयाच्या पिपाणीत फुंकर मारून आवाज काढण्याचा प्रयत्न शिवसेनेने करु नये, आपले बिगुल वाजवून दाखवावे. तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू केंद्रातील भाजप सरकारमधून बाहेर पडतील, हे अपेक्षितच होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या तेलुगू देसम पक्षाने एनडीएपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असून त्याला उत्तर म्हणून भाजपचे मंत्रीही आंध्रप्रदेश सरकारमधून बाहेर पडले आहेत. ही क्रिया आणि प्रतिक्रीया आहे. पण शिवसेनेबाबत मात्र गरजेल तो पडेल काय अशी अवस्था झाली आहे. रिकामे कापसाचे ढग हवेत तरंगुन काही उपयोग नसतो. बाकीचे पक्ष नाराजी व्यक्त करुन लगेच कृतीत उतरत आहेत. पण चार वर्ष नाराज असूनही शिवसेनेने बाहेर पडण्याचे धाडस का दाखवले नाही? शिवसेनेचे कोणतेही मंत्री मग ते राज्यातले असोत वा केंद्रातले त्यांना सरकारमधून बाहेर पडण्याची बिल्कूल इच्छा नाही. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसेनेने भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाहीतील एकजुटीची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेत एकवाक्यता आहे का याचे अवलोकन केलेले बरे पडेल. आपली भूमिका नेमकी काय आहे? शिवसेनेची भूमिका ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपला विरोध करत राहणे या पलिकडे गेलेली नाही. त्यामुळेच गुजरात निवडणुकीतील निकालानंतर शिवसेनेला चेव चढला होता. संजय राऊत यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेवरचे प्रेम उतू जाऊ लागले होते. भाजप संपणार, मोदी लाट संपली असे सांगून राहुल गांधींचा उदोउदो त्यांनी सुरु केला होता. पण ईशान्येकडील भाजपच्या यशानंतर कोणतीही प्रतिक्रीया स्पष्टपणे देण्याचे धाडस सेनेला झाले नाही. ईशान्येकडील त्रिपुरातील डाव्यांची पाळमुळं उखडून काढल्यावर आणि तिथे भाजपचा भगवा रंग उमटल्यावर भगव्यावर प्रेम करणाºयांनी फारसा आनंद व्यक्त केला नाही. दिलदारपणे भाजपचे वर्चस्व मान्य केले नाही. मोदी लाट संपलेली नाही याबाबत एक अवाक्षर काढले नाही. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? स्वत:चा असा काही विचार आहे की नाही? किती दिवस दुसरे बाहेर पडतील आणि एनडीए खिळखिळी होईल याचे स्वप्नरंजन करत बसणार? भरधाव गर्दीच्या रस्त्यावरून रस्ता ओलांडताना झे्रब्रा क्रॉसिंग असले तरी ठामपणे रस्ता ओलांडताना घाबरणारे पादचारी आपण नेहमी बघतो. कोणीतरी गाडीवाला येईल आणि आपल्याला उडवेल अशी भिती बाळगणारे अनेक पादचारी अशा गर्दीत असतात. ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात आणि रस्ता ओलांडणारे अजून काही लोक येईपर्यंत थांबून राहतात. सगळीकडून माणसे जमल्यानंतर बरोबर मधून चालून बाकीच्या लोकांचा आधार घेऊन असे भित्र्या प्रवृत्तीचे लोक रस्ता ओलांडतात. कारण एकट्याने जाण्याची धमक त्या लोकांमध्ये नसते. आज शिवसेनेची नेमकी तशीच अवस्था झालेली आहे. संजय राऊत यांचे बाकीचे नाराज पक्षही बाहेर पडतील हे वक्तव्य म्हणजे अशाच भितीतून आलेले आहे. बाकीच्या गर्दीत घुसून रस्ता ओलांडण्यासाठी ते वाट पहात आहेत असेच यातून दिसते. विशेष म्हणजे अशी मनात भिती बाळगणारे आणि खिशात राजीनामे असल्याची भाषा करणारे स्वबळाची भाषा करत आहेत. रस्ता ओलांडायला ज्यांना आजूबाजूला चार माणसांचा आधार आहे का हे पहावे लागते ते स्वबळावर कसे काय लढू शकतील? त्यामुळे शिवसेनेने बाकीची स्वप्नरंजन करण्यापेक्षा आणि दुसºयाच्या चपलेने विंचू मारण्यापेक्षा स्वत:चे काहीतरी विचार प्रकट करावेत आणि मगच बोलावे, हे उत्तम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा