मंगळवार, २० मार्च, २०१८

विरोधी वातावरण तयार होतंय, पण...

सध्या केंद्रातील आणि राज्यातील सरकार विरोधात वातावरण तयार करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. हे वातावरण तयार करण्यासाठी बºयापैकी प्रयत्न होत आहेत. पण तरीही भारतीयांच्या मनात एक शंका सातत्याने आहे ती म्हणजे, २०१९ ला पंतप्रधानपदावरुन नरेंद्र मोदींना हटवायचे असेल तर विरोधकांकडे त्याला टक्कर देऊ शकेल असा कोणता चेहरा आहे? कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहात? नेमके कसे करणार ते सांगा. म्हणजे आपल्याकडे ग्राम्य भाषेत म्हणतात की, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. तशी अवस्था आज विरोधकांबाबत सामान्य जनतेची झालेली आहे. हा पंधरवडा तसा अनेकच घडामोडींचा गेला. मुंबईतील आदिवासी शेतकºयांचे आंदोलन, काँग्रेसचे ८४ वे नियोजनबद्ध आंदोलन आणि मुंबईतील पाडवा मेळाव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी केलेले शक्तीप्रदर्शन. प्रचंड गर्दी खेचून मुंबई आणि दिल्लीतील घडामोडींनी संपूर्ण देशाला चर्चेला विषय दिला. यातून विरोधकांचे सूर जनतेपर्यंत पोहोचले. जनतेच्या मनात काही प्रमाणात द्विधा मनस्थिती करण्याचा प्रयत्नही बºयापैकी यशस्वी झाला, पण नंतर जनता आपल्या मतावर पुन्हा रेंगाळली असे चित्र आहे. ते म्हणजे विरोधकांची ओरड खरी असेल तर तुम्ही हे कसे करणार? महाआघाडी, मोदी विरोधी म्हणा किंवा भाजपविरोधी आघाडी नेमकी कशी करणार? कोणाच्या नेतृत्वाखाली करणार? सर्वात मोठा पक्ष म्हणून ही नेतृत्वाची संधी काँग्रेसला दिली तर राहुल गांधींचे नेतृत्व आजतरी सर्वमान्य होणार नाही. मग हा कारभार कोण करणार? महाराष्टÑातही तीच परिस्थिती आहे. फडणवीस सरकारच्या विरोधात राज ठाकरे यांनी भरपूर गर्जना केली. अगदी मॉनिटर, सांबा अशी विशेषणे जोडून सरकारला दुषणे दिली. पण यातून साध्य काय होणार? राज्यात भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार? काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एक आले तरच हे सरकार कोलमडू शकते. हे एक आले तर त्यांचे नेतृत्व कोण करणार? शिवसेनेला बाहेर बसवले तर काँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसे अशी आघाडी केली तयार केली तर त्याचे नेतृत्व कोण करणार? या आघाडीत राज ठाकरे यांचे अस्तित्व ते काय असणार? राज ठाकरे यांचा वापर भाषणांपुरता आणि गर्दी जमवण्यासाठी करणार का? तशी आघाडी झाली तर मनसेच्या वाट्याला नेमक्या कुठल्या आणि किती जागा येणार? काँग्रेस आणि राष्टÑवादीकडे आज गर्दी जमवण्याची ताकद नसल्यामुळे सभेपूर्वी आॅर्केस्ट्रा लावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी चाललेले पहायला मिळतात. त्या तुलनेत मनसेचे नेते गर्दी खेचतात पण त्यांचे भाषण एक करमणूक म्हणून ऐकायला जमणारेही फार आहेत. ते फारसे मनावर घेतले जातेच असे नाही. त्यामुळे राहुल गांधी दिल्लीत बसून काय किंवा इथे राज ठाकरे मुंबईतील सभांमधून सरकारविरोधी वातावरण तयार करत असले तरी नेतृत्वाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या विरोधी वातावरण तयार करण्याचा काहीही फायदा नाही. केंद्रात आणि राज्यात पडती किंवा नमती बाजू घेण्याची क्षमता अनेकांमध्ये नाही. भाजपविरोधात महाआघाडी करायची झाली तरी ममता बॅनर्जींसारख्या नेत्या राहुल गांधींबरोबर येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी तिसºया आघाडीचे प्रयत्न सुरु करून भाजप विरोधात सर्वपक्षियांनी एकत्र येण्याचे काँग्रेसचे स्वप्न आज तरी शक्य वाटत नाही. सोनिया गांधीनी आपल्या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून वीस पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसत नाही. नुसतेच जेवायला जमल्यासारखे सगळे जमले पण त्यातून काही ठोस कृती बाहेर पडलेली नाही. जे पक्ष उपस्थित होते ते अत्यंत क्षीण अशा प्रकारचे आहेत. एकखांबी तंबूप्रमाणेच आहेत. त्यामुळे राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच त्यांना तिसºया स्वातंत्र्याचा लढा म्हणून या निवडणुकीकडे पहायचे असेल तर विरोधकांना आपली निषाणी, आपले झेंडे बाजूला ठेवून एका नव्या झेंड्याखाली यावे लागेल. डावे पक्ष, समाजवादी पक्ष आणि जनसंघासारखे विरोधी विचारांचे पक्ष आणिबाणीच्या काळात आपले झेंडे विसरुन जनता पक्षाच्या नांगरधारी शेतकरी या झेंड्याखाली एकत्र आले, तसे काहीतरी करावे लागेल. त्यावेळी फक्त नांगरधारी शेतकरी एवढेच माहित होते. जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व माहिती होते. म्हणून तर अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश अशी घोषणा त्या काळात आली होती. परंतु या आघाडीचे किंवा तत्कालीन जनता पक्षाचे नेतृत्व जरी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आलेले असले तरी त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिले नव्हते. ते ही जबाबदारी घेणारही नव्हते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे पानीपत झाल्यावर पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता वाढीस लागली होती. त्यावेळी जगजीवनराम, राजनारायण, चरणसिंग असे अनेक इच्छुक होते, पण मोरारजीभाई देसाई यांच्या नावावर एकवाक्यता झाली. कारण तत्कालीन परिस्थितीत ते अनुभवी होते. मंत्रिपदाचा अनुभव होता. वयाने ज्येष्ठ होते. आज मोदी भाजप विरोधात अशी ताकद विरोधकांना उभी करायची झाली तर शरद पवारांव्यतिरीक्त ज्येष्ठ नेतृत्व नाही. अनुभवी नेतृत्व दुसरे नाही. पण एकजुटीचा अभाव आहे. त्यामुळेच विरोधी वातावरण कितीही तयार झाले तरी नेतृत्वाअभावी विरोधक मागे पडणार आहेत. भाजपला रोखण्यासाठी खूप वातावरण ढवळून निघालेच आणि भाजपचे संख्याबळ जरी कमी झाले तरी विरोधकांना सत्ता स्थापन करण्या इतपत संख्याबळ मिळणे अवघड आहे. २४ पक्षांची आघाडी करूनही अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता, तेंव्हा बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे १३ दिवसांत राजीनामा देण्याची वेळ आली होती. तसाच काहीसा प्रकार पुन्हा होऊ शकतो. त्यासाठी जनता आता सजग झालेली आहे. मतदारांना कुठे तरी स्थैर्य हवे आहे. या पाच वर्षात मोदींनी जे काही केले आहे, त्याची फळे पुढील पाच वर्षात मिळतात का हे पाहण्याची तयारी अजूनही मतदारांची आहे. त्यामुळेच नेतृत्व घोषित नसल्यामुळे मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण करणे विरोधकांना शक्य नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: