मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

हे आता आम्ही स्वीकारले आहे

दरवर्षी १४ फेब्रुवारीला येणारा व्हॅलेंटाईन डे हा दिवस आता भारतीयांनी पूर्णपणे स्विकारला आहे. दहा पंधरावर्षांपूर्वी होत असलेला या दिवसाचा विरोध आता मावळल्याचे दिसत आहे. तसा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या दोन ख्रिश्चन हुतात्म्यांच्या नावाने साजरा करतात. पण गेल्या चार पाच वर्षांपासून कोणीतरी हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना मांडल्यामुळे व्हॅलेंटाईन डे या दिवसाला विरोध करण्यासाठी अनेकजण या दिवशी मातृदिन साजरा करतात. आपल्याकडे कोणताही सण म्हटले की त्यावरुन वाद निर्माण करणे हे आलेच. अनेक राजकीय पक्ष आणि संस्थांनी हा सण भारतीय संस्कृतीशी अनुरूप नसल्याचे सांगून यात अडथळे आणले आहेत. तरीही अडथळे असूनही, व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. याकडे आपण आता धार्मिक आक्रमण म्हणून न पाहता जागतिकीकरणाच्या रेट्यात आलेला परिणाम म्हणून पहायला शिकले पाहिजे. आपण अनेक प्रकारच्या संस्कृतींची देवाणघेवाण करतो. तशी ही संस्कृती आलेली आहे हे लक्षात घेवून त्यावरून या देशात, या देशातील व्यापारी, उद्योजग आणि तरुणाईला पिटण्यात काहीच अर्थ नाही. वीस वर्षांपूर्वी आम्ही चायनीज डीश कुठे खात होतो? कोपºयाकोपºयावर वडापाव, भेळ, पाणीपुरीचेच फेरीवाले, स्टॉलधारक होते. आता प्रत्येक कानाकोपºयात चायनीज खाण्याच्या स्टॉलची रेलचेल आहे. ते पदार्थ आम्ही अंगवळणी पाडून घेतले. तेंव्हा आमच्या वडापावला फटका बसेल का? याचा विचार आम्ही नाही केला. मग आता तरी या सणामुळे आमच्या सणांना धक्का बसेल का याची चिंता करायचे कारण नाही. सहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बजरंग दलाच्या सुभाष चौहान यांनी जोडप्यांना ताकीद दिली होती, की ते म्हणे सार्वजनिक ठिकाणी चुंबन किंवा मिठी मारू शकत नाही. तसे केल्यास आमच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण होईल. पण आता याचीही चिंता करायचे कारण नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्याचे प्रकार किंवा मिठी मारण्याचे प्रकार व्हॅलेंटाईन डे हा दिवस सोडून अन्य दिवशीही होताना दिसतात. मुंबईचाच विचार केला तर लोकल प्रवासात ऐन गर्दीच्या वेळी दरवाजाच्यामध्ये लागून असलेल्या सीटच्या पाठीमागे दोन हातांच्या मधोमध आपल्या प्रेमिका किंवा पत्नीला घेवून डोळ्यात डोळे घालून उभे राहणारे कालांतराने गर्दीच्या बहाण्याने इतक्या जवळ येतात की त्यांचे चुंंबन आणि मिठ्या हे प्रकार गर्दीतही सहीसलामत सुरु असतात. गिरगांव आणि जुहू चौपाटीवर वाळूमध्ये अगदी समुद्रकिनारी जाऊन जगाला विसरून सार्वजनिक ठिकाणी किती जोडपी चुंबन घेण्याचे आणि मिठी मारण्याचे प्रकार करत असतात हे मोजायचे ठरवले तर हाताची आणि पायाचीही बोटे कमी पडतील. त्यामुळे फक्त १४ फेब्रुवारीलाच कोणी मिठ्या मारेल आणि कोणी चुंबन घेईल म्हणून आमची संस्कृती बिघडली, संस्काराचे मातेरे झाले असे समजणे फारच भाबडेपणाचे ठरेल. हा भाबडेपणा आता सनातनवाद्यांनी सोडून दिला पाहिजे. बदल आणि विरोध करायचा तर अशा प्रकारांना कायमस्वरुपी करा, फक्त एका दिवसापुरता नको. त्यामुळे ही जीवनशैली आम्ही स्विकारली आहे, आमच्या अंगवळणी पडली आहे हे मान्य करायला हरकत नाही. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने या दिवसाला विरोध केला होता. पण त्यांचा विरोध फक्त राजकीय स्वार्थासाठीच राहिलेला आहे. विरोधात लढून सत्तेत येण्यासाठी भाजपला विरोध करणाºया शिवसेनेने भाजपला सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बिनशर्त पाठींबा जाहीर केल्यावर राजकीय व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागला होता. आता आम्हाला सरकारमध्ये घ्या म्हणून भाजपला मिठी मारावी लागली होती. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत शिवसेनेने केलेला विरोध हा कधी खरा नसतो. त्याचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी केलेली ही खेळी असते. त्यात सामान्य माणसांची टाळकी फुटतात, सामान्य तरूणांवर तोडफोडीमुळे खटले दाखल होतात. ते त्या प्रकरणात आयुष्यभर पोलीस स्टेशन आणि कोर्टाचे खेटे घालत राहतात आणि नेते मात्र नवा व्हॅलेंटाईन साजरा करायला धावतात. सध्या मोदी अमित शहांच्या भाजपमध्ये आपली डाळ शिजत नाही म्हणून आता त्यांनी काँग्रेसबरोबर व्हॅलेंटाईन सुरू केला आहे. त्या प्रेमातूनच गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे कौतुक सेनेने सुरू केले. आपण लढवलेल्या गुजरातमधील ४० जागा, बिहार, गोवा येथे लढवलेल्या जागांना यश सोडा तीन अंकी आकड्याचीही मते पडली नसताना भाजपच्या अपयशावर टीका करून काँग्रेसचे सुरु केलेले गोडवे हा राजकीय व्हॅलेंटाईनचा प्रकार होता. त्यामुळे शिवसेनेने अशा प्रकारे कधीकाळी विरोध केला असला तरी त्याचा काहीही फरक पडला नाही. व्हॅलेंटाईन डे ची संस्कृती महाराष्ट्रात रूजली. काही दशकांपूर्वी आपल्याकडे रक्षाबंधन या सणालाही मान्यता नव्हती. रक्षाबंधन हा सण रजपुतांचा आहे, आमच्याकडे भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी भाऊबीज साजरी केली जाते असे बोलले जात होते. अर्थात रजपूत हे भारतीय संस्कृतीचा घटक असल्यामुळे या सणाला विरोध झाला नाही. आम्ही नारळी पौर्णिमेबरोबरच हा सण साजरा करु लागलो. आता तो हिंदूधर्मियांचा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. अगदी राष्टÑीय स्वयंसेवक संघातही तो साजरा केला जातो. फक्त तिथे देशरक्षणासाठी स्वयंसेवकच एकमेकांना राख्या बांधतात. त्यामुळे माणसांना आनंद देणारे कोणतेही सण साजरे होत असतील तर त्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याची गरज नाही. नवे येणारे सण किंवा असे दिवस साजरे करण्यापूर्वी आम्ही आमचे सण बंद करत नाही ना हे पाहणे महत्वाचे असते. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा वाद निर्माण केला जातो. या वादातून आम्ही चर्चेत राहतो. अशा विचाराने अनेकजण सण, दिवस साजरा करण्यास विरोध करतात. पण आम्ही हा सण स्विकारला आहे हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: