शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

“ दास्यभक्ती” हा देवदर्शनाचा उंबरठा

 देवाचें दास्य करणें म्हणजे सातवी भक्ति होय. देवाच्या दाराशी त्याची सेवा करण्यासाठी असणे, देवाचे जे काम असेल ते आपण करणे. म्हणजे अर्थातच खर्‍या अर्थाने तो देवदर्शनाचा उंबरठाच म्हणावा लागेल. या दास्यभक्तीमध्ये  देवाच्या वैभवाचे रक्षण करणे, ते कमी होऊं न देणे, ते वाढेल तसे वाढवणे व वाढवण्याचा प्रयत्न करणे. ही जबाबदारी येते. त्यामुळे हे साक्षात करणे म्हणजेच देवदर्शनाचा तो उबंरठा आहे. आता फक्त देवाच्या जवळ पोहोचण्याची वाट पहायची आहे, इतक्या आपण या भक्तीतून जवळ पोहोचला आहोत. थोडीशीच उंबरठ्याची सीमा ओलंडण्याइतकी भक्ती करणे बाकी आहे. त्यासाठी काय काय केले पाहिजे हे समर्थ याठिकाणी सांगतात.  त्यासाठी भंगलेली देवालयें दुरुस्त करावीत. मोडलेले तलाव, पाण्याचे साठे दुरुस्त करावेत. सोपे, धर्मशाळा बांधाव्या. मोडल्या असतील तर त्यांचे नूतनीकरण करावे. या वास्तु नगररचनेतील वैभव असते. हे देवाचेच वैभव आहे  असे समजून त्यांचा जिर्णोध्दार करावा.जेणेकरून गरजू लोकांना त्याचा लाभ होईल आणि परमेश्वराची आपल्यावर कृपा होईल. त्यासाठी जुन्या मोडकळीसआलेल्या धर्मशाळा वगैरे बांधकामांचा जीर्णोद्धार करावा. देवाचे जे जे कार्य असेल ते ते लगोलग करीत जावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासनें, चौरंग, पालख्या, सुखासने, पलंग, डोलारे, विमानें वगैरे सर्व नविन करावें.  मेघडंबर्‍या, छत्रें, चौरें, अबदागिर्‍या, पुष्कळ निशाणें, या वस्तु साफ करुन निट जतन कराव्या.ही कर्म आपल्याला परमेश्वराच्या दाराकडे घेवून जातात. तो म्हणजे देवदर्शनाच उंबरठा असतो. प्रयत्नपूर्वक करावीत. घरें, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, पाण्यासाठी मोठी भांडी, पुष्कळ घागरी, अशा किमती वस्तु देवासाठी द्याव्या. ज्याचा लाभ इतरांना घेता येईल अशा सुविधा  निर्माण करणे म्हणजेच देवदर्शनाजवळ पोहोचणे. दास्यभक्तीत परमेश्वराचे काम केले जाते. ते निरपेक्षपणे केले जाते. त्यासाठी कसलाही मोबदला, वेतन, पगार, मजूरी मिळण्याची अपेक्षा नसते. या कामाचा लाभ घेणारा माणूस म्हणजे तो परमेश्वराने लाभ घेतला आहे असे ेसमजणे म्हणजेच परमेश्वराच्या दर्शनासाठी सिद्ध होणे. त्याच्या दर्शनाच्या उंबरठ्यापर्यंत जाणे असे असते. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे, बोगदे करावेत. त्यांना गुप्त दारे ठेवावीत.मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी कोठारे प्रयत्नपूर्वक करावीत. देवासाठी, त्याच्या उत्सवासाठी दागिने, भूषणें, उंची वस्त्रे, सुंदर रत्नें, अनेक धातुंची व सोन्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने मिळवावीत. फुलबागा, रानें, झाडांच्या राया, तयार कराव्या, त्यांना पाणीवगैरे देऊन त्यांची निगा राखावी. निरनिराळ्या जनावरांसाठी, तबेले, निरनिराळे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक वाद्ये, नाटकशाळा व रंगभूमी, पुष्कळ चांगले गायक,  स्वयंपाकघरे, जेवण्यासाठी पाकशाळा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठ्या, झोपण्यासाठी कोठ्या, सर्व कोठ्या मोठ्या ठेवाव्यात. हा सर्व सेवाभावी वृत्तीने करायचा प्रकार आहे. याचा उपभोग घेणारा परमेश्वर आहे हे समजून हे कार्य करायचे आहे. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तु ठेवण्यासाठी जागा, निरनिराळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ व फळे ठेवण्यासाठी जागा, पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा, प्रयत्नपूर्वक बनवाव्यात. निरनिराळ्या वस्तु ठेवण्याच्या जागा जर जुन्या झाल्या असतील अगर मोडकळीस आल्याअसतील तर नविन कराव्या, देवाचे वैभव वर्णन करुन सांगावे तेवढे थोडेच. त्यामुळे हे वैभव जपण्याची जबाबदारी या दास्यभक्तीत येत असते. म्हणजे साक्षात देव आपल्या जवळ आहे, त्याचे काम आपण करतो आहोत ही समजूत होणे म्हणजे देवाच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत.  देवाकडे येणार्‍या सर्व भक्तांविषयी आदर बाळगावा. त्यांची व भगवंताची सेवा करण्यास तत्पर असावे. आपल्या वाट्याचे काम लगेच करावे. देवाच्या जयंत्या, पर्वे मोठ्या वैभवाने करावेत की जे पाहून स्वर्गांतील देवसुद्धा थक्क होतील. देवाचे वैभव वाढवत ठेवावे. तसेच हलक्यांतील हलकी देवाची सेवा करण्यासही  नेहमी तयार असावे.  देवासाठी जें  जें आवश्यक असेल तें तें त्वरित द्यावे. अत्यंत आवडीने देवाची सर्व सेवा करावी. देवाचे पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधक्षता, वस्त्रे, अलंकार, आसनें, निरनिराळी फुलें, धूप, दीप, नैवेद्य तयार ठेवावा. हे सर्व आपण देवाने नेमलेले दास आहोत असे समजून निरपेक्षपणे करायचे असते. एका दासाला ज्याप्रमाणे त्याचा धनी भेटतो तसाच देव आपल्याला भेटणार आहे याची खात्री मनात बाळगायची असते. त्यामुळे दास्य भक्ती हा खर्‍या अर्थाने देवदर्शनाचा उंबरठा आहे. देवाला निद्रा घेण्यासाठी चांगल्या खोल्या, पिण्यासाठी गार पाणी, विडा, रागदारीने रसाळ गायन गावे. सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, निरनिराळी सुगंधी तेलें, पुष्कळ खाण्याचे पदार्थ, फळे,देवाच्या जवळच ठेवावीत व प्रसाद म्हणून लोकांना पण द्यावीत.  झाडलोट करावी, सडा घालावा, रांगोळ्या काढाव्या, पाण्याच्या भांड्यांत स्वच्छ पाणी भरुन ठेवावे, देवाचे कपडे, वस्त्रे स्वच्छ धुवून ठेववीत. देवाच्या दर्शनास येणार्‍या सर्वांचे आदरातिथ्य करावे. अशी ही सातवी दास्य भक्ती आहे. देवाच्या दासाचे बोलणे करुणेने भरलेले दयाद्र असावे, दुसर्‍याबद्दल व देवाबद्दल चांगले बोलावे की त्यामुळे सर्वांना समाधान वाटेल. अशी ही  भक्ती माझ्या अल्पबुद्धिने वर्णन केली. प्रत्यक्षांत सर्व करता आली नाही तरी मानसपूजेंत करावी, असे या भक्तीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. असे देवाचे व तसेच सद्गुरुचे दास्यत्व करावे. जरी प्रत्यक्ष करता आले नाही तरी मानसपूजेंत करावे.  हे सर्व आपणास देवदर्शन घडवणारे आहे. इथे असलेला सेवाभाव आपले मी पण, अहंकार नष्ट करून टाकणारा आहे. आपला स्वामी तो परमेश्वर, राम आहे हे समजून केलेले कार्य म्हणजेच मी पण संपणे. अहंकाराचा नाश जिथे होतो तिथे माझे काही रहात नाही. जे काही आहे ते त्या ईश्वराच्या, देवाच्या, रामाच्या कृपेने आहे हा भाव माणसाला देवदर्शन घडवतो. त्यामुळे दास्यभक्ती करणे म्हणजे देवदर्शनाच्या उंबरठ्यावरच पोहोचणे असे आहे.
    ॥ जय जय रघुवीर समर्थ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: