रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

नवा भस्मासूर

शासकीय नोकरभरतीच्या सोशल मिडीयावरून फिरत असलेल्या जाहीराती बोगस असल्याने आपली फसवणूक टाळावी असे आवाहन राज्य सरकारला करावे लागले. सोशल मिडीयाचा चांगल्या कामासाठी होणारा वापर कमी आणि त्याचे उपद्रव मुल्यच वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडीया हा नवा भस्मासूर ठरतो की काय असा प्रश्न निर्माण झालेली आहे.  सामान्य प्रशासन विभागात लिपिक, रोखपाल, शिपाई, वाहनचालक अशा विविध २२८ पदांसाठी भरण्यात येत असल्याची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पदभरतीबाबत फिरत असलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा बोगस जाहिरातीपासून सावध राहून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे. ही फार चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर सुशिक्षीत आणि बेरोजगारांची थट्टा करणारा हा क्रूर प्रकार आहे. हा प्रकार थांबला पाहिजे.सोशल मिडीयावरून बदनामी करणे, अफवा पसरवणे हे आता नित्याचेच झालेले आहे. अनेक नामांकीत व्यक्तिंच्या मृत्यूच्या बातम्या व्हॉटसअप आदी सोशल मिडीयावरून पसरवल्या गेल्याच्या घटना गेल्या चार दोन वर्षात अनेकवेळा पहायला मिळाल्या. यामध्ये अभिनेते कादरखान, शक्तीकपूर यांच्या अपघाती निधनाच्या बातम्यांनी तर उच्छाद मांडला होता. फक्त गॉसिपिंग करणे, अफवा पसरवणे या हेतुने अशा बातम्या व्हायरल केल्या जातात. पण हा व्हायरलचा रोग सोशल मिडीयाला मोठ्या प्रमाणात लागला आहे निश्चित. या रोगावर रामबाण उपाय काढायलाच पाहिजे. काय खरं काय खोटं असा संभ्रम अनेकवेळा यातून निर्माण केला जातो. अनेकांच्या चारित्र्य हननासाठीही या माध्यमाचा होत असलेला वापर ही चिंतेची बाब आहे. तरीही सध्या होत असलेल्या नोकरभरतीच्या जाहीरातींचा बोगसपणा ही फारच क्रूर थट्टा आहे. माध्यमांमधून फक्त व्हायरल करा. काहीही करा. हवेत गोळीबार करा. सतत सोशल मिडीयावर राहुन आपण चर्चेत राहिले पाहिजे असा अनेकांचा छंद झालेला आहे. या व्हायरल करण्याच्या नादात कित्येकवेळा न वाचता लाईक करणे, फारवर्ड करणे असले प्रकारही होताना दिसतात. हे अत्यंत धोकादायक आहेत. कित्येकवेळा सोशल मिडीयावरील काही पोस्ट या डिलीटही करता येत नसतात. त्या पुन्हा पुन्हा, ठराविक अंतराने सातत्याने फिरत राहतात. दररोज हजारो लोक या मिडीयाशी जोडले जात असतात. त्यामुळे नव्या लाईक बरोबर पुन्हा पुन्हा त्या व्हायरल होतात. त्यामुळे साथीच्या रोगापेक्षा भयंकर प्रकार हा घडताना दिसतो आहे.राज्य सरकारी नोकरभरतीच्या जाहीराती भविष्यात सरकारने काढल्या आणि त्या कोणी याच सोशल मिडीयावरून व्हायरल केल्या तर त्यामुळेही फार मोठा गोंधळ होवू शकतो. कारण सोशल मिडीयावरुन व्हायरल झालेल्या या जाहीराती बोगस असल्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्या सूचना पुन्हा पुन्हा सोशल मिडीयावरुन व्हायरल होवून अनेकांची दिशाभूल होवू शकते. त्यामुळे या सोशल मिडीयावर काही बंधने घालावी लागतील अशी परिस्थिती भविष्यात येवू शकते.याबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत सोशल मिडीयाचा वापर करून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. या मिडीयाचा प्रभावी वापर करुन आपली लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मिडीयाला जवळ केले. त्यामुळे हजारो लाखो गृप वेगवेगळ्या विचारांचे तयार झालेले पहायला मिळतात. यामध्ये जातीधर्मावर आधारीत गृपपासून, पोटजाती, गावे, विचारधारा, विरोधी गृप असे गृप तयार करण्याचा फंडा अनेकांनी सुरु केलेला दिसून येतो. त्यामुळे सामाजिक दरी, तेढ निर्माण करण्याचे प्रकारही घडताना दिसतात. कोणत्याही राजकीय घटनेचे पडसाद सर्वात प्रथम सोशल मिडीयावर उमटत असून त्यातून संघर्षमय वातावरण निर्माण करण्याचे प्रकारही घडताना दिसतात. जानेवारी महिन्यात घडलेल्या  भीमा कोरेगांव प्रकरणानंतरही सोशल मिडीयातून उठलेल्या प्रतिक्रीया या विचित्र आणि अनपेक्षित होत्या. हे सोशल मिडीयाचे विष आज समाज बिघडवण्याबरोबरच आपल्याच लोकांचे नुकसान करण्यात गर्क असलेले दिसते आहे. त्यामुळे हा सोशल मिडीयाचा भस्मासूर नव्या पिढीला क्रूर, हिंसक मनोवृत्तीत परिवर्तीत करत आहे असे चित्र आहे. यावर वेळीच नियंत्रण ठेवण्यासाठी हालचाली करण्याची गरज आहे.  -प्रफुल्ल फडके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: