गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

भजी-पकोड्यांच्या बदनामीचे राजकारण

खरे तर भजी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ. भरपेट जेवण झाले असेल, सुपारी खायची वेळ आली असेल तरीही समोर जर खुसखुशीत भजी आली तर ती तोंडात टाकण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. पावसाळ्यात तर टपरीवर गरमागरम भजी खाऊन कटिंग चहा पिण्याचा आनंद कोणाला आवडत नाही? तारांकित, पंचतारांकित हॉटेलमध्येही जरी भज्यांची फर्माईश केली तर ती आनंदाने पुरवली जाते. विशेष पार्टीत स्टार्टर म्हणूनही भजी-पकोडे आपली पाठ सोडत नाहीत. इतकी महत्त्वाची असूनही या भजी-पकोड्यांची मात्र राजकीय बदनामी सुरू आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल. या देशात भजी न आवडणारा माणूस सापडेल का? असे असताना त्या भज्यांचा धंदा करण्याचा सल्ला जर रोजगारासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुचविला तर त्यात एवढे झोंबायचे कारण काय आहे? विशेषत: काँग्रेसला ही भजी कोल्ह्याला द्राक्षं आंबट याप्रमाणेच झोंबलेली दिसतात. भज्यांबरोबर मिळणारी तिखट तळलेली आणि मिठात घोळवलेली मिरची जशी कधीकधी झोंबते तशी ही पंतप्रधान मोदींची भज्यांची कल्पना काँग्रेसला झोंबली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केलेल्या त्या वक्तव्याचा ऊहापोह राष्टÑपतींच्या भाषणावर बोलतानाही काँग्रेसने सुरूच ठेवला. त्यामुळे राजकारणातील हा भज्यांचा घाणा खूपच दिवस तळला जातो आहे. पण यामुळे आमची भजी मात्र बिचारी बदनाम होत आहेत.राजकारण म्हणजे शब्दांचा कीस काढण्याचा धंदा आजकाल होताना दिसत आहे. त्यामागच्या भावना समजून घेण्यापेक्षा शब्दश: अर्थांचा ऊहापोह करून हंगामा माजवला जात आहे. चार दिवसांपूर्वी डीएसकेंना अटक टाळण्यासाठी ५० कोटी ताबडतोब भरा असे सांगण्यासाठी न्यायालयाने, ‘भीक मागा, उसने घ्या, काहीही करा पण पैसे भरा’ असे सांगितले होते. त्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. त्यामुळे डीएसकेंना धनंजय मुंडे यांचा उंबरठा झिजवावा, अजित पवारांची मदत मिळतेय का पाहावी याची चाचपणी करता आली ना? न्यायालयाला म्हणायचे होते काहीही करा पण पैसे भरा, त्याशिवाय पर्याय नाही. या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. पण भावनाशून्य राजकारणात मथितार्थाला तिलांजली देण्याचा प्रकार होत आहे हे निश्चित. भजी-पकोड्याच्या राजकारणात हेच केले गेले. भजी तळणे हे गैरकाम आहे, ते अत्यंत टाकाऊ आणि कमी दर्जाचे काम आहे, असा आभास काँग्रेसकडून निर्माण करून आमच्या भजी-पकोड्यांना मात्र बदनाम केले. तमाम भारतीयांच्या हृदयावर खांद्यसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या या भज्यांना काँग्रेसने गांवकुसाबाहेर काढले.तरुणांनी कोणतेही काम करताना स्वत:ला कमी लेखता कामा नये, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार होता. आपण भले भजी तळण्याचा, विकण्याचा धंदा करत असलो तरी तो प्रामाणिकपणे केला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. ही भजी तळून, भजी विकून आपला उदरनिर्वाह होत असेल तर तोही एक प्रकारचा रोजगारच आहे, असे जर पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर हे काँग्रेसला इतके झोंबायचे कारण काय होते? भजी तळा, पकोडे तळा याचा अर्थ काहीही करून काम करा. उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी बाहेर पडा. मी अमूक एक गोष्टच करेन अशा स्वत:वर मर्यादा घालून घेऊ नका, हा त्यामागचा खरा अर्थ आहे. काम करताना आपण अमूक एक काम करणे हे वाईट आहे, कमी पणाचे आहे असा न्यूनगंड मनात बाळगू नये हे सांगण्याचा हा हेतू आहे. पण या भावनांचा चक्काचूर करून काँग्रेसने उकळत्या तेलात त्या भावनाच तळून काढल्या. यामध्ये भजी करणे, भजीपावचा धंदा करणे फार वाईट गोष्ट आहे हा संदेश सर्वत्र पसरवला. भजी-पकोड्यांची ही काँग्रेसकडून झालेली राजकीय बदनामी म्हणजे घसरत्या राजकारणाचा वाईट नमुना आहे. आज भजी, वडा, पकोडा यामागे होणारी आर्थिक उलाढाल पाहिली तर डोळे फिरतील. पाच-सहा दशकांपूर्वी कमलाबाई ओगलेंच्या कल्पकतेतून अवतरलेला बटाटा वडा ही आज भारताची पंचतारांकित ओळख बनली आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे वैभव बनले आहे. मुंबईचा वडापाव हा मुंबईच्या चौपाटी इतकाच अथांग आहे. त्या समुद्रावर उभ्या असलेल्या गेट वे आॅफ इंडियाच्या विशाल छातीप्रमाणेच हा वडापाव सर्वांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. इथल्या जागतिक कीर्तीच्या डबेवाल्यांप्रमाणेच तो सर्वांच्या पोटाचा वेध घेणारा आहे. त्यामुळेच हा प्रतिष्ठित उद्योग बनला आहे. अनेक व्यावसायिकांनी आपली मोठी दुकाने थाटून आपल्या नावापुढे वडेवाला म्हणून अभिमानाने मिरवले आहे. हे एक सिंबॉलिक उदाहरण आहे. भज्यांचा उल्लेख मोदींनी तशाच अर्थाने केला आहे. असा छोटासा धंदा करूनही तुम्ही चांगला रोजगार मिळवू शकता, हे त्यांच्या बोलण्याचे गमक होते. पण या उद्देशाला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने खवय्यांना प्रिय असलेल्या भजी-पकोड्यांना बदनाम केले. भजीवाले, पकोडेवाले हीन, दीन आहेत, असा आभास निर्माण केला, हे भजी-पकोड्यांच्या बदनामीचे राजकारण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: