मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

बेडूक फुगून फुगून किती फुगणार?

शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने आता पावले टाकण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे.गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा सेना लढवणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली आहे. आता ही शिवसेनेची भूमिका की संजय राऊत यांची भूमिका हे स्पष्ट झालेले नाही. नेते स्पष्ट मताचे नसले की बाकीचे बोलतात त्यातला हा प्रकार आहे. आता गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. हा प्रकार म्हणजे बेडकी फुगवून आपण मोठे पहिलवान आहोत हे दाखवण्याचा आव आणण्याचा प्रकार आहे. शेवटी बेडकी कितीही फुगली तरी ती काही बैलाएवढी होत नाही, तर त्या प्रयत्नात फुटून जाते. तसाच हा प्रकार आहे.शिवसेनेकडून होणारी वक्तव्ये ही अतिशय बालिश आणि उथळ होताना दिसत आहेत. संजय राऊत म्हणतात, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. पण महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला कोणी ओळखते का? अजून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करता आला नाही, मुंबई-कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्रात घुसता आले नाही. पश्चिम महाराष्ट्रात साता-यातील कार्यालयाचे भाडे भरले नाही म्हणून कार्यालय बंद करण्याची वेळ आलेल्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या सीमा कशा काय ओलांडता येतील? स्वबळावर लढताना लोकसभेसाठी राज्यात ४८ उमेदवार शिवसेनेला मिळू शकतात का? विधानसभेला २८८ उमेदवार उभे करता येऊ शकतात का, याचा अगोदर शिवसेनेने विचार केला पाहिजे. २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेला भाजप-शिवसेना यांची युती होती. तेव्हा जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रात सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेच्या वाटय़ाला गेली होती. त्यावेळी शिवसेनेकडे उमेदवार नसल्यामुळे ती जागा रिपब्लिकन पार्टीला देण्याची वेळ आघाडीत आली. अशा परिस्थितीत अन्य राज्यांत उमेदवार देण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे बेडकीने बैल होण्याचा अट्टाहास करून स्वत:चे शरीर फुगवण्याचा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने नियोजन करून देश पादाक्रांत केला आहे. काँग्रेस या मातीत अशीच पसरत गेली. तसे कोणतेच नियोजन शिवसेनेकडे नसताना केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या भूमिकेवर जगणा-या सेनेवर कोण विश्वास ठेवणार?गेल्या वर्षी २०१७च्या फेब्रुवारीत झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्या सगळय़ांच्या मतांची बेरिज करूनही एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचू शकणार नाही, अशी परिस्थिती तेव्हा सेनेवर ओढवली होती. असे असताना गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघणे ही हास्यास्पद बाब आहे. लोकशाही आहे म्हणून कोणीही मैदानात उतरतो. पण अस्सल कोल्हापुरी पहिलवानापुढे सुदाम पहिलवानाने षड्ड ठोकून उभे राहणे म्हणजे, त्याला विनोदच म्हणावा लागेल. तोच प्रकार आज शिवसेना करताना दिसते आहे. शिवसेना म्हणते आहे की, हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. हा तर फार मोठा विनोद आहे. हिंदू मतांचे विभाजन? निवडणुका म्हणजे काय धार्मिक स्पर्धा आहेत, असे शिवसेना समजते काय? भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण सगळे हिंदू काही भाजपच्या दावणीला बांधले गेलेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी असे ढीगभर पक्ष रिंगणात असतात. त्यातही हिंदू मतदार, उमेदवार असतात की. काँग्रेस हा पक्ष काही मुस्लिम लिग नाही. काँग्रेसला पडणारी मते फक्त बिगर हिंदूंची आहेत, असा विचार शिवसेना कशी काय करू शकते? हिंदू मतांच्या विभाजनाचा प्रश्न कसा काय शिवसेनेला पडला? धर्माच्या लोकसंख्येवर उमेदवार निवडून दिले गेले असते तर राजकीय पक्षांची नावे ही धर्माच्या नावानेच पडली असती. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे, असा उल्लेख सातत्याने केला जातो. तो लोकशाहीबाबत केला जातो. शिवसेनेला मतांच्या विभाजनाचा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे. राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष काढला तेव्हाही शिवसेनेला मराठी मतांच्या विभाजनाची चिंता लागली होती. हिंदू मते किंवा मराठी मते असा विचार शिवसेना करते इथेच त्यांच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडते. म्हणजे महाराष्ट्रात मराठी मते फक्त शिवसेना किंवा मनसेला मिळतात आणि अन्य पक्षांना काय बिगर मराठी मते मिळतात, असे शिवसेनेला वाटते काय? काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपाइं, शेकाप अशा अनेक पक्षांचे उमेदवार महाराष्ट्रात निवडून येतात, त्यांना पडणारी मते ही मराठी मते नसतात का? पण२००९ला मनसेचे १४ आमदार निवडून आले आणि सेनेला त्यांनी रोखले होते. त्यावेळी आपल्या या अपयशाचे खापर फोडताना मनसेमुळे मराठी मतात विभाजन झाले असे बोलून शिवसेना मोकळी झाली होती. त्यामुळे हिंदू मते, मराठी मते यांची काळजी करत आपण आजवर एकत्रित निवडणुका लढवल्या, अशी चिंता करणे शिवसेनेने सोडले पाहिजे. हिंदू मतांच्या विभाजनापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवल्या तर शिवसेनेला कोण निवडून देणार हाच प्रश्न असेल. कारण कसलेही स्पष्ट मत नाही, कसलेही धोरण नाही, कसलाही विचार नाही, अशा अवस्थेत सेना भरकटते आहे. धड सत्ताधारी नाही, धड विरोधक नाही, अशी ना घर का, ना घाट का अशा अवस्थेत हा पक्ष चाचपडत असताना राज्याबाहेर ताकद लावण्याचा प्रकार म्हणचे गल्लीतल्या क्रिकेटमध्ये त्रिफळाचीत झालेल्या आणि तिन्ही दांडय़ा उडालेल्या असताना आयपीएलमध्ये किंवा विश्वचषक सामन्यात खेळण्याचे स्वप्न बघण्याचा प्रकार आहे. पण अशाप्रकारे बेडकी फुगून फुगून किती फुगणार आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: