बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

मैदानात उतरण्यापूर्वीच काँग्रेसचा आत्मविश्वास गमावला

गुजरात निवडणुकीत वाढलेले संख्याबळ आणि राजस्थान पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेससह तमाम विरोधकांना आता लोकसभेचे वेध लागले आहेत. अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय, नोकरदार यांच्यासाठी काही सवलती जाहीर न केल्याने त्यांची नाराजी कॅश करण्याबरोबरच रालोआतील असुंताष्टांच्या धुसफुशीचा फायदा घेण्याचे धोरण विरोधकांनी आखल्याचे दिसते. त्यादृष्टीने आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही २०१९ ला भाजप मोठा पक्ष असेल हे सत्य नाकारण्याचे धाडस काँग्रेस करत नाही.  मैदानात उतरण्यापूर्वीच आपण सत्तेवर येणार नाही अशी कबुली देत काँग्रेसने गमावलेल्या आत्मविश्वासाचे दर्शन घडवले आहे.२०१९ मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार असेल असे ठामपणे न सांगता काँग्रेसने भाजप पुन्हा सत्तेत आला तरी मोदी पंतप्रधान नसतील, असे वक्तव्य केले आहे. हा संपूर्णपणे आत्मविश्वास गमावल्याचा प्रकार आहे. भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व मोठा भाउ या नात्याने जरी काँग्रेसने करायचे ठरले तरी काँग्रेसच नेतृत्वहिन असल्यामुळे ते शक्य होणार नाही. आघाडीचे नेतृत्व कमी संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीकडे अर्थात शरद पवारांकडे सोपवण्याचे मोठेपण काँग्रेसकडे असणार नाही. अन्य कोणत्याही नेतृत्वाला सर्वमान्यता मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपच पुन्हा सत्तेवर येणार अशी खूणगाठ काँग्रेसने मैदानात उतरण्यापूर्वीच बांधून ठेवली आहे.२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजप आणि निवडणूक जिंकली तरी, भाजपला २२० जागांवर विजय मिळेल, असा अंदाजही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त  केला. एनडीएतील घटक पक्षांसाठी पंतप्रधान म्हणून मोदी हेच एकमेव पर्याय नाहीत. त्यांच्या तुलनेत राजनाथ सिंह या पदासाठी उत्तम असल्याचे या नेत्याने सांगून टाकले आहे. यावरुन स्पष्ट झाले आहे की काँग्रेसने मैदानात उतरण्यापूर्वीच हार मानली आहे.योग्य नेत्यांना संधी ने देण्यामुळे आणि निष्क्रिय माणसांवर जबाबदारी सोपवण्यामुळे काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. केंद्रात आणि महाराष्टÑात दोन्हीकडे हीच परिस्थिती आहे. याउलट भाजपकडे अनेक पर्याय आहेत हे मान्य करुन काँग्रेसने आपल्याकडे कोणीच नाही हे मान्य केल्याचे दिसते आहे. भाजपकडे नेतृत्वाला कधीच तोटा नाही हे गेल्या २० वर्षांच्या भाजपच्या इतिहासावरुन दिसून आले आहे. तिथे कायमच मवाळ आणि जहाल असे नेतृत्व राहिले आहे. पण परस्परांनी एकमेकांचा आदरही केलेला दिसून आला आहे. १९९६ च्या निवडणुकीपूर्वी जेंव्हा काँग्रेसविरोधी विशेषता नरसिंहराव सरकारविरोधी वातावरण तयार झाले होते तेंव्हाही काँग्रेस नेतृत्वहीन झालेली होती. सोनिया गांधी राजकारणात आल्या नव्हत्या. नरसिंहरावांना पुन्हा  संधी मिळण्याची शक्यता नव्हती. १९९१ ला त्यांनी २३१ या अल्पमताचेच सरकार पाच वर्ष चालवले होते. त्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माधवराव सिंधिया, प्रणव मुकर्जी, शरद पवार यांची नावे येत होती. पण कोणत्याही नावाला सर्वमान्यता नव्हती. त्यावेळी भाजपने केलेल्या जाहीराती अतिशय बोलक्या होत्या. आमच्याकडे घराणेशाही नाही, आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयी असतील असे लालकृष्ण अडवाणी बोलत होते. तशी जाहीरातीतून पोस्टर्स येत होती. तर दुसरीकडे आमचे भावी पंतप्रधान अडवाणी असतील असे वाजपेयी सांगत आहेत अशी पोस्टर्स येत होती. यातून आमच्याकडे नेतृत्वाला तोटा नाही हे भाजपने बिंबवलेच होते. त्याचबरोबर आमच्याकडे व्यक्तिस्तोम नसतो. आमच्याकडे विचार महत्वाचा असतो हे ठसवले गेले होते. या जाहीरातींमधून भाजपने स्पष्टपणे नेतृत्वहिन काँग्रेसवर बोट ठेवले होते. पण तत्कालीन काँग्रेसचे धोरणी नेते शरद पवार यांनी आपली डाळा आता पंतप्रधानपदासाठी लागत नाही हे लक्षात घेवून माधवराव सिधिया नको अन प्रणव मुखर्जीही नको असे सुचवत सोनिया लाओ देश बचाओ असा नारा दिला. वास्तविक तो देश बचाओचा प्रश्न नव्हताच. काँग्रेस बचाओचा विषय होता. घराणेशाही आणि गांधी नावाशी निष्ठावंतांना ती सूचना आवडली आणि सोनिया गांधीना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधींचे ब्रँडिंगही उत्तम केले होते. धारवाडी काठापदराच्या अस्सल भारतीय थाटातील डोक्यावर पदर घेतलेल्या सोनियांचे पोस्टर प्रदर्शित केले गेले. जणू काही इंदिरा गांधीच अवतरल्या आहेत असे भासवले गेले. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला झाला. पण सत्तेवर येण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही. भाजपचे अपेक्षित संख्याबळ कमी झाले. त्यामुळे १३ दिवसांचे सरकार चालवून राजीनामा देण्याची परिस्थिती भाजपवर आली खरी. पण त्यामुळे भाजपचे पुढचे यश निश्चित केले गेले. काँग्रेसच्या पाठींब्यावर चालणार कोणतेही सरकार कधीच दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्याप्रमाणे भाजपने तयारी केली पण काँग्रेसला पुन्हा संधी मिळाली नाही. भाजपने नेतृत्वाअभावी २००४ पर्यंत काँग्रेसला रोखले होते. आता मात्र कोणतेच नेतृत्व आपल्याकडे नाही हे काँग्रेसला पूर्णपणे ज्ञात झाल्याचे दिसते. त्यामुळे आता काँग्रेसने भाजप विरोध सोडून मोदी विरोध सुरु केला आहे. मोदी पंतप्रधान नसतील तर भाजप आम्हाला चालणार आहे असे अप्रत्यक्ष सांगून काँग्रेसने मैदानात उतरण्यापूर्वीच पराभव मान्य केलेला दिसतो. आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसने त्यामुळेच राजनाथसिंहाना पसंती देवून टाकल्याचे दिसते. - प्रफुल्ल फडके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: