रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

परदेशी पर्यटकांना खुणावतोय भारत

ं२०१७ या वर्षात परदेशी पर्यटकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीपेक्षा २० टक्के पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. यामुळे आपल्याला १ लाख ७५ हजार कोटींची कमाई करता आल्याची आकडेवारी प्रसिध्द झाली आहे. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ही बाब समाधानकारक अशीच आहे.भारतातील निसर्गामध्ये विविधता आहे. कश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्य हे पर्यटनाला अनुकूल असे राज्य आहे. त्यामुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपल्या देशात आहे. पर्यटन विकासाची पार्श्वभूमी तेव्हाच तयार होते, जेंव्हा देशात सुरक्षितता आणि शांतता आहे असे जागतीक पातळीवर दिसून येते.भारतात होणारे दहशतवादी हल्ले हे पर्यटन व्यवसायाला मारक ठरले होते. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे या देशात येणाºया पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु गेल्या तीन चार वर्षात देशात शांततेचे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध देशांना भेटी देवून भारतातील सुरक्षीततेचे चित्र जगाला दाखवत आहेत. भारत हा आगामी काळातील महासत्ता होण्याचे चित्र जागतीक पातळीवर निर्माण करण्यात सरकारला यश येत असल्यामुळे या देशात पर्यटनासाठी येणाºयांची संख्या वाढत आहे.भारतीय पर्यटनामध्ये सागरी किनारे, थंड हवेची ठिकाणे ही जितकी परदेशी पर्यटकांना आवडतात तितकीच येथील जुन्या वास्तू, मंदीरे हे फार मोठे आकर्षण पर्यटकांसाठी आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाची नवी क्षेत्रं विकसीत करणे ही सरकारची जबाबदारी असेल. त्यामुळे नवनवीन रोजगाराच्या संधी तयार होतील. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात धार्मिक पर्यटनस्थळांसाठी हेरिटेज सिटी ही कल्पना सरकारने जाहीर केली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर प्रत्येक गावांतून जत्रा होत असतात. पुशी जत्र, चैत्री जत्रा, माघी उत्सव, उरूस असे सतत कुठे ना कुठे तरी सुरु असते. या जत्रा आणि उत्सवांना एक ग्लोबल चेहरा देवून इथल्या संस्कृतीचे पर्यटकांना आकर्षण वाटेल असे वातावरण आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाला ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा चेहरा आहे त्याप्रमाणे वर्षानुवर्ष जाणाºया आळंदी ते पंढरपूर पायी यात्रेचे एक वैभव आहे. या उत्सवांचे आकर्षण परदेशी पाहण्यांना आहे. ते अधिक कसे वाढेल. या महोत्सवातून होणाºया कला, सांस्कृतिक कार्यक्रम यांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. आज महाराष्टÑातून वीणा वर्ल्ड, केसरी टूर्स अशा असंख्य कंपन्या सिंगापूर, दुबई, थायलंड, चीन, युरोप अशा पर्यटनाच्या यात्रा काढतात. त्या त्या देशातून त्यांचे असणारे संपर्क हे तेथील व्यापार, हॉटेल व्यवसाय यांना प्रोत्साहन देणारे आहेत. त्याप्रमाणे भारतातील विविध उत्सव, यात्रा, जत्रा यांच्यासाठी विशेष पर्यटनाच्या सुविधा केल्या तर हा उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार उभा करू शकेल.महाराष्टÑात अनेक चांगले किल्ले, डोंगर आहेत. त्यांचा विकास करून पर्यटकांना भारतात काय काय ऐतिहासिक वास्तू, मंदीरे आहेत याची माहिती दिली तर मोठ्या प्रमाणात रोजगाराला चालना मिळेल. यापुढच्या काळात पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी चांगल्या प्रकारे निर्माण होतील. यामध्ये विविध भाषा शिकणारे दुभाषी म्हणून, गाईड म्हणून चांगल्या रोजगाराची संधी निर्माण करू शकतात. हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ व्यवसाय हा, स्थानिक पारंपारीक वस्तुंची निर्मिती, हस्तकला यांना चांगली बाजारपेठ मिळू शकते. त्यामुळे पर्यटन व्यवसाय विकसीत करून देशाचे उत्पन्न वाढेलच. पण यातून रोजगाराला चालना मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: